देशाच्या उन्नतीस हातभार लावणारा बायोगॅस

0
5
  • शशांक मो. गुळगुळे

पुणेस्थित ‘सिस्टेमा.बायो’मध्ये वर्षाला 1 लाख बायोगॅस संयंत्रांचे वार्षिक उत्पादन होईल. 2023 अखेरपर्यंत देशातील 21 राज्यांतील 50 हजारहून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळेल. यामुळे भारतातील 6 लाख लोकांची जीवनशैली बदलून त्यांना स्वच्छ स्वयंपाक व रसायनमुक्त शेती करता येईल.

बायोगॅस देशाच्या उन्नतीत महत्त्वाची भूमिका बजावतो. स्वयंपाक करण्यासाठी जर ‘एलपीजी’ (लिक्विड पेट्रोलियम गॅस) वापरला तर याचे उत्पादन भारतातील मागणीइतके होत नसल्याने तो आयात करावा लागतो. वाहनांचे इंधन, गॅस आपण फार मोठ्या प्रमाणावर आयात करतो. यामुळे आपले परकीय चलन खर्च होते. बायोगॅस हा गाई, म्हशी, रेडा, बैल यांच्या शेणापासून तयार होतो, त्यामुळे ग्राहकांना तो स्वस्तही पडतो. देशाचे परकीय चलन वाचावे, बायोगॅस फार मोठ्या प्रमाणावर वापरात यावा म्हणून हा उत्पादित करण्यासाठी व वापर करणाऱ्यांना सरकार ‘सबसिडी’ देते. खेडोपाडी, ग्रामीण भागांत झाडे तोडून- त्याची लाकडे वापरून- स्वयंपाक केला जात असे. या बायोगॅसमुळे झाडे तोडणे कमी होईल.

झाडे तोडणे म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास. झाडे तोडण्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडते व ते बिघडल्यामुळे निसर्ग कधीकधी रौद्ररूप धारण करतो. यामुळे मनुष्यहानी, वित्तहानी होऊ शकते. अर्थात बायोगॅसमुळे याचे प्रमाण कमी होणार. तसेच लाकडे जाळून जो धूर येतो त्याने स्वयंपाक करणाऱ्या महिलांना दमा, क्षयरोग वगैरेंसारखे फुफ्फुसाचे रोग होतात. बायोगॅस वापरल्यामुळे महिलांचे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. आपल्या पंतप्रधानांनी जगाला आश्वासन दिले आहे की, भारत 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर आणेल व त्यांनी दिलेले हे आश्वासन पूर्ण होण्यासाठी बायोगॅस महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

‘सिस्टेमा.बायो’ निर्यात वाढविणार
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आयातीपेक्षा निर्यात जास्त हवी तरच त्या देशाची अर्थव्यवस्था सुदृढ समजली जाते. पुणेस्थित ‘सिस्टेमा.बायो’ने जगातील सर्वात मोठी बायोगॅस संयंत्रनिर्मिती सुविधा निर्माण केली आहे. यात 150 दशलक्ष रुपयांची गुंतवणूक करून आशिया व आफ्रिका खंडांतील देशांना आपल्या देशातर्फे ‘सिस्टेमा.बायो’ बायो गॅस पुरविणार आहे. यामुळे 2030 पर्यंत जागतिक ग्रीन हाऊस गॅसमध्ये 1 टक्का कपात होईल. परिणामी, आपल्या देशाला कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठणे शक्य होईल.
येथे वर्षाला 1 लाख बायोगॅस संयंत्रांचे वार्षिक उत्पादन होईल. 2023 अखेरपर्यंत देशातील 21 राज्यांतील 50 हजारहून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळेल. यामुळे भारतातील 6 लाख लोकांची जीवनशैली बदलून त्यांना स्वच्छ स्वयंपाक व रसायनमुक्त शेती करता येईल. ‘सिस्टेमा.बायो’ ही कंपनी नसून ती ख्यातनाम जागतिक सामाजिक संस्था आहे. या संस्थेची नावीन्यपूर्ण बायोगॅस तंत्रज्ञानामध्ये खासियत आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या संस्थेने चाकण येथे सर्वात मोठ्या बायोगॅस संयंत्र निर्मिती सुविधेचे अनावरण केले. याची एक लाख पूर्वरचित बायोगॅस संयंत्रांची वार्षिक उत्पादन क्षमता आहे. या सुविधेतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक स्मार्ट बायोगॅस युनिटमधून शेतकऱ्यांना प्रभावी जीवन, चांगले आरोग्य व हवामानाची चांगली स्थिती हे फायदे मिळू शकतील. ‘सिस्टेमा.बायो’कडे बायोगॅस अणुभट्टी व मेम्ब्रेन टेम्पलेटसाठी क्रांतिकारी बायोगॅस तंत्रज्ञानाचे पेटंट आहे. भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने डिसेंबर 2022 मध्ये ‘सिस्टेमा.बायो’च्या आधुनिक आणि नावीन्यपूर्ण बायोगॅस तंत्रज्ञानाला मंजुरी दिली आहे. ही संस्था एनजीओ, सहकारी व खाजगी डेअरी तसेच ग्रामीण विकास संस्थांमार्फत ‘सिस्टेमा.बायो’ लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवते. या संस्थेचे मुख्य कार्यालय मॅक्सिको शहरात आहे. ही संस्था शेतकऱ्यांना संयंत्रांची स्थापना, प्रशिक्षण आणि सर्वसमावेशक विक्रीपश्चात समर्थनसेवाही देते. ‘सिस्टेमा.बायो इंडिया’ हा एक सामाजिक उपक्रम असून ही संस्था गरिबी, अन्नसुरक्षा व हवामानबदल यासाठी प्रयत्नशील आहे. ही संस्था शेणापासून जैवखतही उत्पादित करते. ही खते नैसर्गिक असतात. परिणामी शेती उत्पादन वाढते.

बायोगॅस म्हणजे जैविक प्रक्रियांमधून बाहेर पडणारा वायू. जर एखादी जैविक प्रक्रिया ऑक्सिजनविरहीत वातावरणात झाली तर बायोगॅसची निर्मिती होते. पुन्हा पुन्हा वापरता येण्याजोग्या ऊर्जास्रोतांपैकी एक म्हणजे बायोगॅस. या जैविक वायूचा उपयोग घरगुती तसेच शेतीकामांसाठी होतो. यात मुख्यतः हायड्रोकार्बन्स असतात. ते ज्वलनशील असल्याने जळताना उष्णता आणि ऊर्जा उत्पन्न करतात. एका जैवरासायनिक क्रियेमधून हा वायू उत्पन्न होतो. या प्रक्रियेच्या दरम्यान काही विशिष्ट प्रकारचे जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया जैविक कचऱ्याचे रूपांतर उपयुक्त अशा बायोगॅसमध्ये करतात. जैविक प्रक्रियेमुळे हा वायू उत्पन्न होत असल्याने याला ‘बायोगॅस’ असे म्हणतात. मिथेन हा वायू बायोगॅसचा मुख्य घटक असतो.

बायोगॅस संयंत्रांसाठीचा मुख्य कच्चा माल म्हणजे गाईगुरांचे शेण. फक्त शेणापासून उत्पादित होणाऱ्या गॅसला ‘गोबर गॅस’ म्हणतात. बायोगॅसमध्ये शेणाखेरीज कुक्कुटपालनामधील कचरा, शेतामधील कचरा, वाहून नेला जाणारा मैला यांचाही वापर कच्चा माल म्हणून होतो. हे पर्यावरण मित्रत्वपूर्ण इंधन आहे. बायोगॅस निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल खेडोपाडी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. या प्रक्रियेत बायोगॅसखेरीज द्रवस्वरूप स्लरीदेखील तयार होते. स्लरीमध्ये पोषणमूल्ये भरपूर असतात. परिणामी हिचा खत म्हणून वापर केला जातो. बायोगॅसद्वारे निर्माण होणारे वायू प्रदूषण नैसर्गिक वायूप्रमाणेच असते.