देशभरातील शाळांमध्ये सरकारतर्फे लवकरच रोपवाटिका उपक्रम ः प्रकाश जावडेकर

0
121

पर्यावरण मंत्रालय लवकरच देशभरातील शाळांमध्ये रोपवाटिका उपक्रम सुरू करणार असून यामध्ये शालेय विद्यार्थी बियाणे पेरतील, त्याची देखभाल करतील आणि वार्षिक निकालाच्या दिवशी हे रोपटे बक्षीस म्हणून स्वीकारतील असे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. या उपक्रमात स्थानिक वन विभाग आवश्यक सहकार्य पुरवेल. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला शालेय विद्यार्थी आणि रोपट्यांमध्ये एक कायमस्वरूपी नाते विकसित करायचे आहे असे जावडेकर म्हणाले.
जावडेकर यांनी नवी दिल्लीत पर्यावरण मंत्रालयाच्या आवारात वृक्षारोपण केले. यावेळी पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, प्रसिद्ध क्रिकेटपटू कपिलदेव, हिंदी चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुडा आणि ख्यातनाम गायिका मालिनी अवस्थी उपस्थित होते. या सर्वांनी पर्यावरण रक्षण आणि झाडे लावण्याचा महत्त्व विषद करणारा संदेश दिला. जावडेकर यांनी सर्वांना या अभियानात सहभागी होण्याचे आणि रोपट्याबरोबर काढलेला सेल्फी समाज माध्यमावर टाकण्याचे आवाहन केले.

यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पर्यावरण समस्या सोडवण्यासाठी लोक सहभाग हा अविभाज्य घटक असून पर्यावरण रक्षण ही लोक चळवळ व्हावी असं सांगितले. मनुष्याला जगण्यासाठी जेवढा प्राणवायू आवश्यक आहे, त्यासाठी त्याने संपूर्ण आयुष्यात किमान ८ ते १० झाडे लावावीत यावर त्यांनी भर दिला.
देशात हजारो किलोमीटर पसरलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला १२५ कोटी झाडे लावण्याच्या संकल्पाप्रति केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या वचनबद्धतेची त्यांनी प्रशंसा केली.

जागतिक पर्यावरण दिन जगभरातील सर्व सरकारे, उद्योग, समाज आणि नागरिकांना शहरे आणि प्रांतातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीकरणीय उर्जा, हरित तंत्रज्ञानाच्या नव्या संधी शोधण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करतो. पर्यावरणाचे संवर्धन करण्याची संधी यानिमित्ताने आपल्याला मिळते. दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.

यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद चीन भूषवत असून वायू प्रदूषण ही यंदाची संकल्पना आहे. सध्या वायू प्रदूषण हा पर्यावरण दृष्ट्या आरोग्याला सर्वात मोठा धोका आहे. भारताने गेल्या वर्षी जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद भूषवलं होतं, तेव्हा प्लॅस्टिक प्रदूषणाला आळा घालण्यावर भर देण्यात आला होता.
भारताने राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम सुरू केला आहे. हे दीर्घकालीन राष्ट्रीय धोरण आहे. वायू प्रदूषण रोखणे आणि हवेच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणं हा यामागचा उद्देश आहे.