राज्यात काल रात्री वाजतगाजत आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चतुर्थीच्या उत्साहावर पाणी फेरले, तरीही भाविकांनी गणरायाची मनोभावे सेवा केली. काल सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत दीड दिवसांच्या गणपतींचे नद्या, तलाव, ओढे आणि समुद्रात विसर्जन करण्यात आले.
बहुतांश भाविकांकडून दीड दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यानुसार काल गणरायाला निरोप देण्यात आला. विसर्जनावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पणजी परिसरातील गणेशमूर्तींचे मिरामार, करंजाळे, पाटो, फेरी धक्का पणजी, रायबंदर, चिंबल, सांताक्रूझ यासह अन्य अनेक ठिकाणी विसर्जन करण्यात आले.