दिव्या दिव्या दिपत्कार…!!!

0
103

 

  • दीपा ज. मिरींगकर,(फोंडा)

कित्येक वेळा वीज गेली की ती होती हे लक्षात येते. विजेवर आपले सगळेच व्यवहार अवलंबून असतात. पण हे सारे इतके सहज असते कीे त्याला वेगळे काही व्यवस्थापन असते याची जाणीव ङ्गारच कमी जणांना असते. त्यांच्या अविरत आणि मोलाच्या अशा कार्याला सलाम !!!

 

१९६० पूर्वी आणि १९६० ते १९८५ या काळात जन्मलेल्या पिढीसाठी ही प्रार्थना आणि परवाचा हा तीन्हीसांजेचा नित्यपाठ होता. आजही काही भाग्यवान घरांत काही स्तोत्रं म्हटली जातात. यामध्ये दिव्याचं महत्व खूप वेगवेगळ्या तर्‍हेने व्यक्त होतं.

‘‘दीपाचीये अंगी नाही दुजाभाव | धनी चोर साव सारखेची॥

संत तुकारामांनी ३५० वर्षांपूर्वी आपल्या अभंगात ’दीप’  या प्रकाश तत्वाचे असे वर्णन केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात, दीप हे प्रकाश तत्व सर्वांना समान न्याय देतं, अर्थात,  मालक-चोर अथवा सज्जन-दुर्जन  यांच्यामध्ये ङ्गरक करत नाही. हाच दिवा चराचरातील अंधार नष्ट करतो  म्हणूनच याचं संवर्धन आवश्यक आहे. हेच ‘दीप’ तत्व ‘वीज’ या आधुनिक प्रकाश तत्वाला तंतोतंत लागू होतं.

मा. पंतप्रधान यांनी दि.०५.०४.२०२० रोजी रात्री ९.०० वाजता ०९ मिनिटांसाठी विजेचे दिवे बंद करून ‘दीप’ या प्रकाश तत्त्वाचा अवलंब करण्यासाठी आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून संपूर्ण भारतासह वेगवेगळ्या देशातील भारतीय दूतावासातसुद्धा याची आनंदाने अंमलबजावणी करण्यात आली. परंतु ज्यावेळी संपूर्ण राष्ट्र दिव्याचा आनंद घेत होते त्यावेळी भारतातील ऊर्जा मंत्रालय व प्रत्येक राज्यातील विद्युत अभियंते मात्र वीज वितरण व्यवस्था सांभाळण्यासाठी कार्यरत होते.

अशा या अभूतपूर्व प्रसंगात संपूर्ण भारतात टाळेबंदी असल्यामुळे, अगोदरच औद्योगिक व वाणिज्य विद्युत भार विद्युत वापर बंद असताना, घरगुती वापरही ०९ मिनिटासाठी बंद करायचा होता, त्यामुळे सिस्टीम वरील लोड एकदम कमी जास्त होणार असल्यामुळे काही गंभीर परिस्थिती उद्भवू नये म्हणून भारत सरकारचे ऊर्जा मंत्रालय व त्यांची यंत्रणा संपूर्ण देशातील विद्युत कंपन्यांना मार्गदर्शन करत होती. त्यानुसार विद्युत अभियंते कामाला लागले होते. याचे गांभीर्य कदाचित सर्वसामान्य जनतेच्या आकलनाच्या पलीकडे असल्यामुळे त्याचा मानसिक तणाव विद्युत अभियंत्यावर होता. परंतु आधुनिक तंत्रज्ञान व वीज अभियंत्यांच्या सुव्यवस्थित नियोजनामुळे ऐतिहासिक दीपोत्सव विनाव्यत्यय पार पडला.

कालच्या ऐतिहासिक घटनेमुळे भारतामधील पिक लोड ११४४०० मेगावॅट पासून  घसरुन ८५७९९ मेगावॅट पर्यंत म्हणजेच ३१०८९ मेगावॅट पर्यंत खाली आला होता. म्हणजेच देशपातळीवर त्या ०९ मिनिटांमध्ये २५% घट झाली होती.

कशी गंमत असते पाहा, कोणत्याही गोष्टीचं महत्व, ती  गोष्ट समोर असताना असते, किंवा वाटते. परंतु ‘वीज’ ही एकच गोष्ट आहे की ती नसताना तिचं महत्व जाणवतं. कारण ही विद्युत शक्ती दिसत नाही, आणि ती पुरवणारे पण. अशाच प्रकारे संपूर्ण भारतातील नव्हे जगातील वीज कर्मचारी पडद्यामागे राहून वीज पुरवठा अखंडीत राहावा म्हणून अविरत  प्रयत्न करत असतात, त्यांची ही  नोंद यानिमित्ताने आपण घेऊयात.

गोव्यात जरी विजनिर्मिती यंत्रणा/वीज निर्माण होत नसली तरी वितरणव्यवस्था आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्याकडून आपण विज घेतो. त्यामुळे यासाठी दोन्ही राज्यातील यंत्रणा आणि जवळ जवळ पूर्ण देशाचा समन्वय असण्याची आवश्यकता होती.  आणि म्हणूनच या पूर्ण व्यवस्थेतील सर्व अभियंते आणि कर्मचारी रात्री ८ पासून आपल्या सबस्टेशनमध्ये कार्यरत होते. रात्री १० वाजता ही इमर्जन्सी संपली. प्रत्येकाला याचा ताण आला होताच. या प्रकारची व्यवस्था हाताळायचा कोणताही अनुभव नसतानाही हे काम यशस्वी झाले. विद्युत खात्याचे मंत्री आणि अभियंते कर्मचारी यासाठी एकत्र आले होते.

संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असली तरीही याही परिस्थितीत आपले विद्युत अभियंते आणि कर्मचारी आपल्याकडील संसाधने बरोबर विजपुरवठा नियमित व्हावा/राहावा यासाठी नेहमीच कार्यरत होते.

वीज ही अत्यावश्यक सेवा आहे आणि तिचे दृश्य स्वरूप नाही. कदाचित त्यामुळेच त्याचे महत्व लक्षात येत नाही. किंबहुना वीज असणारच असे गृहीत धरले जाते. कित्येक वेळा वीज गेली की ती होती हे लक्षात येते. विजेवर आपले सगळेच व्यवहार अवलंबून असतात. पण हे सारे इतके सहज असते कीे त्याला वेगळे काही व्यवस्थापन असते याची जाणीव ङ्गारच कमी जणांना असते.

जगात  असलेला अदृश्य करोना विषाणू, त्यामुळे कमीत कमी कर्मचारी वापरून खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करायचा हा नियम. बाहेरच्या उन्हाच्या झळा झेलत हे काम चालू आहे, अखंडपणे. त्याचबरोबर मान्सूनपूर्वी करायची कामे काहीशा कमी वेगात पण सुरु झाली आहेत. लॉकडाऊनमुळे सामान मिळत नाही, पुरेशा कर्मचार्‍यांना बोलावता येत नाही. गोव्यातील बरेच ङ्गीडर जंगलातून कुळागरातून जातात. ङ्गांद्या तोडणे आवश्यकच. तरीही काजू आंबे ङ्गणस या पिकाचे नुकसान होऊ न देता मेहिन्यापूर्वी हे काम केले पाहिजे याची जाणीव ठेवत याची निगराणी चालू आहे. देवघरातील नंदादीपासारखे हे काम अखंड चालू राहते. कुणी याची दखल घेतो किंवा नाही याची पर्वा न करता. न थांबता !!

घरात बसलेल्या प्रत्येकाने इतर अत्यावश्यक सेवा म्हणजे आरोग्य कर्मचारी डॉक्टर, पोलीस, सङ्गाई कामगार यांच्याबरोबर वीज आणि पाणी या अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या लोकांचीसुद्धा दखल घ्यावी आणि उल्लेख सुद्धा व्हावा अशी अपेक्षा या वेळी करणे चुकीचे आहे का?. त्यांच्या अविरत आणि मोलाच्या अशा कार्याला सलाम !!! या निमित्ताने वीज आणि त्यासंबधी काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचेही  महत्व लक्षात यावं एवढच…