दिल्लीत दंगल

0
180

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आणि समर्थनार्थ दिल्लीत सुरू असलेल्या निदर्शनांनी शेवटी सरळसरळ जातीय दंगलीचे रूप धारण केले. ईशान्य दिल्लीमध्ये उसळलेल्या हिंसाचारात वीसहून अधिक ठार, तर शेकडो जखमी झाले आहेत. घरेदारे, वाहने, दुकाने जाळली गेली, नंग्या तलवारी, पिस्तुले घेऊन जमाव बेभान होऊन फिरताना, दिसेल त्यावर हल्ला चढवताना दिसून आला. पत्रकारही त्यातून सुटले नाहीत. दिल्लीत जे घडले ते भयावह आहे. ८४ च्या शीखविरोधी दंग्यांची कटू आठवण करून देणारे आहे. या घडीला गरज आहे ती दिल्लीतील ही आग त्वरेने आटोक्यात आणण्याची आणि हा वणवा देशाच्या इतर भागांत पसरू नये याची खबरदारी घेण्याची. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली शांत करण्यासाठी एकत्र आले, स्वतः राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल सीलमपूर, उस्मानपूर, जाफराबाद, शाहदरा आदी दंगलग्रस्त भागांत पहाटे तीन वाजेपर्यंत स्वतः फिरले, काल संध्याकाळी दंगलग्रस्त भागाला त्यांनी पुन्हा भेट दिली आणि दोन्ही समुदायांमध्ये सलोखा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, हे अतिशय कौतुकास्पद आहे. पोलीस प्रशासन अधिक सक्रिय झाल्याने काल तुलनेने थोडी शांतता दिसून आली, परंतु तोपर्यंत दिल्ली पोलिसांना परिस्थिती नीट हाताळता आली नव्हती हे तर स्पष्टच आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतभेटीमुळेही पोलिसांना सुरवातीला संयम पाळण्याचे निर्देश दिलेले असणे शक्य आहे, परंतु त्यामुळे परिस्थिती झपाट्याने आटोक्याबाहेर चालली होती. काल परिस्थिती थोडी निवळताना दिसून आली. या जातीय दंगलीचा फायदा उठवण्यासाठी समाजकंटक सक्रिय झाल्याचे दंगलीदरम्यान दिसून येत होते. त्यामुळे प्रशासनाने कठोरपणे परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. दंगलग्रस्त भागांतील दोन्ही प्रमुख समुदायांच्या नेत्यांचीही खरे तर ही कसोटी आहे. परिस्थिती शांत करण्यासाठी आपली सारी ताकद आणि प्रभाव वापरून त्यांनी योगदान देणे अपेक्षित आहे. दुर्दैवाने परिस्थिती शांत करण्याऐवजी ती अधिक भडकावी अशी विधाने राजकीय नेत्यांनी करणे हे गैर आहे. सोनिया गांधींची कालची विधानेही निव्वळ राजकीय स्वरूपाची व अस्थानी होती हे नमूद केले पाहिजे. या दंगलीत कित्येक वाहने, दुकाने, घरे यांची जाळपोळ, नासधूस झाली, कित्येकांच्या जिवावर बेतले, शाळा बंद आहेत, परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत, पोलिसांवर गोळीबार, ऍसिड हल्ले करण्यापर्यंत काही दंगेखोरांची मजल गेलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये ‘ते आणि आम्ही’ ची भाषा होता कामा नये. शेवटी या दंगलीतून होरपळ होणार आहे ती सामान्य माणसांची. हा सगळा हिंसाचार थांबवण्यासाठी दंगलग्रस्त भागातील सर्व समाजघटकांनी समंजसपणे पुढे आल्याखेरीज हा वणवा पूर्णतः विझणे शक्य नाही. समाजकंटकांना मोकळे रान मिळता कामा नये. उत्तर प्रदेशमध्ये अशाच प्रकारे हिंसाचार माजवण्याचा जेव्हा प्रयत्न झाला, तेव्हा तेथील प्रशासनाने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार्‍यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे कठोर पाऊल उचलताच परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आली होती. दिल्लीमध्येही अशा खमकेपणाने परिस्थिती हाताळावी लागेल, अन्यथा हा वणवा देशभरात पसरणे कठीण नाही. सोशल मीडियावरून प्रसृत केले जाणारे दंगलीचे व्हिडिओ, छायाचित्रे यातून अफवा आणि गैरसमज वार्‍याच्या वेगाने पसरत चालले आहेत. प्रसारमाध्यमांनीही जबाबदारीने वार्तांकन करणे अशा वेळी अपेक्षित असते. मात्र ‘इंडियन एक्स्प्रेस’ सारख्या प्रतिष्ठित वर्तमानपत्रातील बातम्या पाहिल्या तर विशिष्ट समाजघटकाला लक्ष्य केले जात असल्याच्या एकतर्फी बातम्या त्या समुदायाच्या नावानिशी प्रसिद्ध केल्या जात असल्याचे दिसते. ही कसली पत्रकारिता आहे? अशाने दंगलीचा वणवा शांत होण्याऐवजी अधिक भडकेल. दोन समुदायांमध्ये जेव्हा दंगल भडकते, तेव्हा दोन्हींमधील जाणत्या, समंजस लोकांना शांतता समित्यांच्या माध्यमातून एकत्र आणून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे ही प्रशासनाची जबाबदारी असते. हिंसाचारावर उतरणार्‍या दंगेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्यातही कुचराई होता कामा नये. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता दंगल आटोक्यात आणण्यास प्राधान्य देऊन प्रशासनाने पावले उचलली तरच परिस्थिती नियंत्रणाखाली येऊ शकेल. दिल्लीचा तिढा असा आहे की तेथील प्रशासन राज्य सरकारच्या हाती, तर पोलीस दल आणि कायदा सुव्यवस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे समन्वयाचा अभाव हेही परिस्थिती चिघळण्याचे कारण असू शकते. मात्र, आता केंद्र व राज्य प्रशासन एकत्र आलेले असल्याने कालच्या शांततेप्रमाणे लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल आणि पूर्णतः शांत होईल अशी आशा करूया. जातीय सलोखा आणि एकात्मतेला बाधा पोहोचू नये आणि देशद्रोही शक्तींना या दंगलीचा लाभ घेण्याची संधी मिळू नये हे पाहणे ही प्रशासन, पोलीस, प्रतिष्ठित नागरिक, प्रसारमाध्यमे आदी सर्वांचीच जबाबदारी आहे हे विसरले जाऊ नये. हा राजकारण करण्याचा विषय नव्हेच नव्हे!