दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जम्मूत पुन्हा 5 जवान शहीद

0
3

जम्मू आणि काश्मीरच्या राजौरीमध्ये शुक्रवारी भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांनमध्ये चकमक झाली. या चकमकीत भारतीय लष्कराचे पाच जवान शहीद झाले. राजौरीच्या जंगलात दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली. त्यामुळे आता संपूर्ण राजौरीमध्ये इंटरनेटची सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान, या चकमकीत काही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले असून, मात्र त्यांचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही.

मुसळधार पाऊस आणि दृश्यमानता कमी झाल्याचा फायदा घेत 20 एप्रिल रोजी अतिरेक्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. या प्रकरणातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याकरता 3 मेपासून मोहीम हाती घेण्यात आली.
राजौरी जिल्ह्यातील कांडी भागातील केसरी हिल येथे दहशतवाद्यांचा एक गट लपून बसला असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी काल शोधमोहीम राबवली. काल जम्मूमध्ये मसुळधार पाऊस पडत होता. या मुसळधार पावसातच लष्कराची शोधमोहीम सुरू होती. राजौरी जिल्ह्यात भारतीय जवानांनी दहशतवाद्यांवर गोळीबार केला, त्यानंतर दहशतवाद्यांनीही गोळीबार केला. तसेच वाहनावर ग्रेनेड हल्ला केला. त्यात 2 जवान जागीच शहीद झाले, तर चारजण जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारांसाठी हेलिकॉप्टरने रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु चार जखमींपैकी तिघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 5 वर पोहोचला. दरम्यान, ही चकमक अजूनही सुरू असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले.