ताण, तणाव आणि आपण

0
63
  • गिरिजा मुरगोडी

तुम्ही करत असलेल्या कामावर जर तुमचं प्रेम असेल आणि तुम्हाला माणसांची आवड असेल तर कुठलीच गोष्ट अवघड, असाध्य वा तणावपूर्ण वाटत नाही. प्रत्येक समस्येतून तुम्ही मार्ग काढू शकता. खरंच, काम आवडत असेल तर शीण येत नाही.

दैनंदिन ताण-तणावांचं नियोजन कसं करावं याविषयीच्या एका व्याख्यानाला गेले होते. अभ्यासपूर्ण विश्‍लेषण आणि मुद्देसूद मांडणीमुळे ते प्रेझेंटेशन उत्तमच झाले. नंतरचा प्रश्‍नोत्तराचा भागही यामागचा विचार अधिक उलगडणारा झाला.

त्यावेळी एका नुकत्याच एम.बी.ए. होऊन काम सुरू केलेल्या युवकानं विचारलं की, कामाच्या वेळा इतक्या दीर्घ आणि अनिश्‍चित असतात की तणावाला सामोरे जाण्याचे तुम्ही सुचवलेले उपाय करायचे कसे? म्हणजे कसं असतं की तुम्ही लॅपटॉप उघडता, लॉगइन करता आणि ते कितीही तास, रात्री कितीही उशिरापर्यंतही चालतं. अशावेळी सगळा मेळ घालायचा कसा?
त्यावर मार्गदर्शक म्हणाले, ‘अगदी बरोबर! हे कामाचं जे वातावरण आहे ते आपण बदलू शकत नाही, म्हणून तर या उपायांनी स्वतःला सदैव सज्ज ठेवायचं. हे सगळं आपल्या आयुष्याचा भाग बनलं पाहिजे. तात्पुरता उपाय नव्हे.’

खरं तर त्यांनी ज्या अनेक छोट्या-छोट्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्या करणं तसं अवघड नाहीत, पण कामाच्या रेट्यापुढे आपण प्रयत्न करत नाही. ज्या क्षणी तणाव, दडपण अति असल्याचं जाणवू लागतं तेव्हा क्षणभर थांबून तुमच्या त्या वेळच्या भावना नेमक्या काय आहेत याकडे लक्ष वेधा. आजूबाजूची माणसं, वातावरण यांचा तुमच्या भावनांवर सकारात्मक परिणाम होत आहे की नकारात्मक? याचा विचार करा. परिस्थितीची साधकबाधकता समजून घ्या, सहकार्‍यांचं मत जाणून घ्या. सर्वांच्या सहकार्याने कोणत्याही निर्णयाप्रत येण्याचा प्रयत्न करा.
आणि महत्त्वाचं, जर नियोजनानुसार एखादी गोष्ट घडली नाही तर ‘ऋरळश्र’ म्हणजे ‘ऋळीीीं ईंींशािीं खप ङशरीपळपस’ हे लक्षात ठेवा. ही सगळी शिकत जाण्याची प्रक्रिया असते हे विसरू नका. या आणि अशा अनेक गोष्टी… ज्या अनुसरणं खरंच कठीण नाही.

नीट विचार केला तर हे सर्व घरापासून नोकरी-व्यवसायापर्यंत, कुटुंबापासून समाजापर्यंत सर्वत्र लागू पडणारं आहे. स्वतःचा आणि भोवतालच्या माणसांचा ताण यामुळे निश्‍चितच कमी होऊ शकेल.
प्रश्‍नोत्तरानंतर आयोजकांनी सुचवलं की, इथे जमलेल्या ज्येष्ठांनी आपापल्या अनुभवातून गवसलेलं काही थोडक्यात सांगावं. त्यावेळी इथले यशस्वी उद्योजक श्री. कारे म्हणाले की, मला दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या वाटतात. तुम्ही करत असलेल्या कामावर जर तुमचं प्रेम असेल आणि तुम्हाला माणसांची आवड असेल तर कुठलीच गोष्ट अवघड, असाध्य वा तणावपूर्ण वाटत नाही. प्रत्येक समस्येतून तुम्ही मार्ग काढू शकता.

मला हे खूपच पटलं आणि भावलंही. खरंच, काम आवडत असेल तर शीण येत नाही. आणि लोकसंग्रहामुळे नेहमीच भावनिक आधार मिळत राहतो.
कामावर प्रेम असेल तर उत्साह आणि आनंद टिकून राहतो, याची अनेक उदाहरणं आठवू लागली. आसपास, समाजात, वाचनात आलेल्या व्यक्तींच्या जीवनात अशी अनेक… पण कुटुंबातलं जवळचं उदाहरण म्हणजे आयटी क्षेत्रात कार्यरत असलेली माझी सून. तिला तिचं काम इतकं प्रचंड आवडतं की कामाच्या अतिरिक्त आणि अनियमित वेळा तासन् तास संगणकासमोर; एकातून दुसरं, दुसर्‍यातून तिसरं असं चालणारं काम, ताळमेळ, त्यातली आव्हानं… या सर्वांचं तिला कधी वैषम्य वा ओझं वाटत नाही. काहीतरी शिकत राहिल्याचा, साध्य करता आल्याचा आनंद असतो तो वेगळाच. क्षमता उत्कृष्ट, कळकळ मनापासूनची… तासन् तास सलग आणि थकवणारं इतकं काम करून आल्यानंतरही घरी पोचताच ती खळाळत्या उत्साहानं त्याबद्दल बोलत असते. आल्यानंतर भराभर घरातली जी कामं असतात ती उरकते आणि पुन्हा लॅपटॉप उघडून घरातलं ऑफिस सुरू करते. कारण कंपनीचे क्लायंटस् परदेशातले. तिथे तर दिवस सुरू झालेला असतो. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत तिचे काम सुरू असते. सध्या तर काय, कोरोना महामारीमुळे ऑफिस घरीच आहे.

अर्थात ताण, तणाव, डेडलाईनची दडपणं, कधी सहकार्‍यांशी, कधी वरिष्ठांशी तर कधी क्लायंट्‌सशी होणार्‍या चर्चा, कधी वाद या सर्वांचा सामना तर करावा लागतच असतो. पण या सर्वाला सामोरं जाणंही चांगल्या प्रकारे साध्य होऊ शकतं ते त्या कामाची आत्यंतिक आवड आणि मिळणारा आनंद यामुळेच.

मलाही आयुष्यात आवडत्या कामातून मिळणारा आनंद खूप अनुभवायला मिळाला. अनौपचारिक शिक्षणपद्धती असलेल्या शाळेत शिक्षिका होते. तिथलं वातावरण इतकं प्रेरक आणि छान होतं की शिक्षणविषयक अनेक प्रयोग मला करता आले. स्वतःमधल्या अनेक सुप्त क्षमतांचा शोधही लागला, वावही मिळाला. अनेक प्रयोगांना यश, प्रशंसा आणि त्यामुळे समाधानही लाभलं. म्हणूनच काम उदंड असलं तरी कधी ओझं वाटलं नाही. अत्यंत चैतन्यमय आणि समृद्ध असा तो काळ जगता आला.

आयुष्यातला प्रत्येक क्षण आपण जगू शकत नसू तर पैसा, यश, नाव, कशालाच अर्थ नाही. जे करत असू त्यात मजा वाटत असेल तर क्षणन् क्षण जगत असतो आपण.

त्यांनी सांगितलेला लोकसंग्रहाचा मुद्दा पण तितकाच महत्त्वाचा आणि अनेकदा अनुभवलेला. आयुष्यात आकस्मिक उद्भवलेले अनेक प्रसंग निभावता आले ते जोडलेल्या माणसा-नात्यांमुळेच. अशा वेळी रक्ताची नाती दूर असतात आणि ही जवळची माणसे धावून येतात. सर्वतोपरी आधार देऊन त्या प्रसंगातून अलगद बाहेर पडायला मदत करतात. प्रेषितांसारखी. याचं मोल शब्दातीत असतं.

एकंदरित सर्व प्रकारचे तणाव हलके करण्यासाठी मार्गदर्शकांनी सुचवलेल्या अनेक उपायांबरोबरच हे दोन मार्ग सर्वोत्तम. आवडत्या क्षेत्राची निवड आणि माणसांची, लोकसंग्रहाची आवड!