जम्मू-काश्मीरात आतापर्यंत १६७ अतिरेकी ठार

0
9

>> गृहमंत्रालयाची माहिती, विविध संघटनांचे १३७ दहशतवादी सक्रिय

जम्मू आणि श्रीनगरमध्ये यंदाच्या वर्षी आतापर्यंत १६७ अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. त्यात ४१ परदेशी व १२६ स्थानिक अतिरेक्यांचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. त्याचसोबत जम्मू काश्मिरातील सक्रिय परदेशी अतिरेक्यांचा आकडा वाढला आहे. त्यात केंद्रशासित प्रदेशात सद्यःस्थितीत वेगवेगळ्या संघटनांचे तब्बल १३४ अतिरेकी सक्रिय असून, त्यात ८३ परदेशी व ५१ स्थानिक आहेत.

काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रेंज विजय कुमार यांनी, यंदा कंठस्नान घातलेल्या परदेशी अतिरेक्यांची संख्या गतवर्षीच्या संख्येच्या दुप्पट असल्याचे सांगितले. २०२१ मध्ये २१ परदेशी अतिरेकी ठार झाले होते. तर यंदा आतापर्यंत ४१ अतिरेकी ठार झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबईत झालेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या बैठकीत गृहमंत्रालयाने काश्मीर खोर्‍यात पुन्हा हिंसाचार वाढला असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, जम्मू काश्मीरच्या पुलवामाच्या अवंतीपोर्‍यात मंगळवारी सुरक्षा दलांनी ३ अतिरेक्यांना कंठस्नान घातले. त्यात लष्करचा कमांडर मुख्तार भटचा समावेश होता.

तो खोर्‍यातील काश्मिरी पंडित व स्थलांतरितांवर हल्ले करत होता. त्याच्यासोबत पुलवामाचा सकलैन मुश्ताक व पाकिस्तानी अतिरेकी मुश्फिकही ठार झाला आहे.
‘तो’ घुसखोर आपलाच
नागरिक; पाकची कबुली
बीएसएफने २८ ऑक्टोबर रोजी शेरपुरा पोस्टजवळ एका पाकिस्तानी घुसखोराला भारतीय हद्दीत प्रवेश केल्यानंतर मारले होते. घुसखोराविषयी पाकिस्तानसोबत फ्लॅग मीटींग करण्यात आली. पाक रेंजर्सनी ओळख पटवण्यासाठी बीएसएफ अधिकार्‍यांकडे त्याचा फोटो मागितला होता. पडताळणीनंतर तो घुसखोर मुनीब आसिफ पुत्र मोहम्मद आसिफ असल्याची ओळख पटली. आणि भारत-पाकिस्तान सीमेवर मारला गेलेला हा घुसखोर आपलाच नागरिक असल्याची कबुली पाकने दिली आहे. फ्लॅग मीटींगनंतर बीएसएफच्या अधिकार्‍यांनी घुसखोराचा मृतदेह पाकिस्तानी रेंजर्सकडे सोपवला. हा घुसखोर श्रीगंगानगरच्या अनुपगडमधील शेरपुरा पोस्टजवळ मारला गेला होता.

यापूर्वीही पाकिस्तानातून भारतातर घुसखोर शिरल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. अनेकदा या घुसखोरांना मारण्यात आले आहे. मात्र पाकिस्तानने कधीही ते आपले नागरिक असल्याची कबुली दिली नव्हती. पाकिस्तानी रेंजर्स कायम मृतदेह घेण्यास नकार देत राहिले आहेत. बीएसएफ अधिकार्‍यांनी आणि पोलिसांनी मृतदेह सोपवण्यापूर्वी त्याला पुष्पांजली वाहिली. नंतर मृतदेह पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात देण्यात आला.