>> भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वानथी श्रीनिवासन यांचा आरोप
कोविड महामारीच्या काळात आम आदमी पक्षाने नवी दिल्लीतील जनतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वेळीच हस्तक्षेप करून दिल्लीतील जनतेला महामारीच्या तडाख्यातून वाचवले. आपच्या दिल्लीतील सरकारने लोकांना अनेक गोष्टी मोफत देण्याच्या नादात करवाढीच्या चक्रात अडकवल्याचा आरोप काल भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वानथी श्रीनिवासन् यांनी पणजीत केला.
रविवारी पणजीत झालेल्या भाजपच्या महिला मोर्चाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन सचिव सतीश धोंड, महिला मोर्चाच्या राज्य प्रभारी सुलक्षणा सावंत, प्रदेशाध्यक्ष डॉ. शीतल नाईक आदी नेते मंडळी यावेळी उपस्थित होती.
पुढे बोलताना श्रीनिवासन् यांनी, महिला मोर्चाने केंद्र व राज्यातील भाजप सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोचवण्याचे काम करायला हवे असे सांगितले.
भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस सुखप्रित कौर यांनी यावेळी बोलताना कॉंग्रेस पश्चिम बंगाल, बिहारमध्ये संपली आहे. गोव्यातही उरली सुरली कॉंग्रेस या निवडणुकीत संपणार असल्याचा दावा केला.