काँग्रेस पक्षाच्या नावे जनतेत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

0
4

>> काँग्रेस उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांचा आरोप

>> विविध समाजातील नेत्यांचा खलप यांना पाठिंबा जाहीर

काँग्रेस पक्षाच्या नावाखाली भाजपाकडून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असून भारतीय राज्यघटना धोक्यात आली आहे, असा इशारा उत्तर गोव्याचे इंडिया आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी दिला. म्हापसा येथे अनुसूचित जाती-जमाती, बिगर ख्रिश्चन व अल्पसंख्याक समाजातील विविध गटांच्या बैठकीत ते बोलत होते.

ॲड. विकास वाघमारे यांनी यावेळी अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आदी समाजातील विविध लोकप्रतिनिधींनी खलप यांना पाठिंबा द्यावा व सत्ताधारी पक्षाच्या मतांसाठी प्रलोभनाला बळी पडू नये, तसेच ही निवडणूक लढविणाऱ्या भाजपच्या बी टीममुळे मतांचे विभाजन होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

खलप म्हणाले की, भारताची राज्यघटना सर्वोच्च असून नागरिकांनी राज्यघटनेतील तत्त्वांचे पालन केले पाहिजे. आपण उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा मला संविधानाची शपथ घ्यावी लागली. उद्या खासदार झाल्यावर मला पुन्हा संविधानाची शपथ घ्यावी लागेल. आता राज्यघटनेतील तत्त्वे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे सर्वांनी सावध राहावे असे आवाहन खलप यांनी केले.

आपण सर्वशक्तिमान ईश्वराची निर्मिती असलेल्या पृथ्वीची आणि निसर्गाची उपासना करतो. या उपासनेद्वारे आपण निर्मात्याची उपासना करतो. मला देवळात आणि चर्चमध्ये देव सापडतो. हीच आमची एकता असून हाच आमचा भारत आहे. आपल्या राजकीय पक्षांनी या देशाचे व ऐक्याचे रक्षण करण्याची शपथ घेतली पाहिजे, असे खलप म्हणाले.
आमच्या रक्ताचा रंग एकच आहे. मात्र, आम्ही जातीच्या आधारावर भेदभाव करतो. पण रक्तदान करताना व रक्त घेताना आम्ही या आधारावर भेदभाव करत नाही. दुर्दैवाने काही राजकीय पक्ष यात गुंतलेले आहेत. जाती-धर्माच्या आधारे भेदभाव करत आहेत, अशी टीका खलप यांनी केली.
सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर म्हणाल्या की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भंडारी समाज, एसटी समाज, मराठा समाज, मंदिर व्यवस्थापन, खाण समुदाय आदींमध्ये फूट पाडली असून ते भ्रष्टाचार करून जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप त्यांनी
केला.
या बैठकीत संघराज्य, राज्य आणि स्थानिक पातळीवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना मान्यता व प्रतिनिधित्व आणि चर्च आणि ख्रिश्चन समुदायाला सुरक्षा प्रदान करणे या मुद्द्यांवर चर्चा झाली. केंद्रातील भाजपने ख्रिश्चन संघटनांची अनेक एफसीआर खाती गोठवली आहेत, असेही या बैठकीत सांगण्यात आले.