कर्णिका व आंग्रिया जहाजांवरील खलाशी लवकरच गोव्यात दाखल

0
169

मुंबई बंदरात गेल्या कित्येक दिवसांपासून असलेल्या कर्णिका आणि आंग्रिया दोन जहाजावरील गोमंतकीय खलाशी येत्या काही दिवसात गोव्यात दाखल होण्याची शक्यता राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे.

या दोन्ही जहाज कंपन्यांच्या व्यवस्थापनाने गोमंतकीय खलाशांना क्वारंटाईऩ करून ठेवण्यासाठी हॉटेलची निवड केली आहेत. त्यामुळे या दोन्ही जहाजावरील गोमंतकीय खलाशांना उतरवून घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, अशी माहिती समितीच्या बैठकीत देण्यात आली आहे. गोमंतकीय खलाशांना आणताना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या दिशानिर्देशाचे पालन करण्याकडे लक्ष देण्याची सूचना राज्य कार्यकारी समितीने केली आहे.

दरम्यान, मुंबई बंदरातील गोमंतकीय खलाशी असलेली कर्णिका आणि आंग्रिया ही दोन्ही जहाजे गोव्यातील मुरगाव बंदरात आणून गोमंतकीय खलाशांना उतरवून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

श्रीलंकेत अडकलेल्या सुमारे १५० नागरिकांना आणण्यासाठी जहाजाची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे, असेही केंद्रीय मंत्री नाईक यांनी सांगितले.