आसाम-मेघालयमध्ये १४४ कलम कायम

0
10

आसाममधील वनरक्षकांनी लाकडांची बेकायदा वाहतूक करणारा ट्रक मंगळवारी सकाळी अडवल्यानंतर हिंसाचार उसळला होता. यामध्ये मेघालयातील सहा आदिवासी गावकरी आणि आसाममधील एका वनरक्षकाचा मृत्यू झाला होता. यानंतर आसाम-मेघालयदरम्यानच्या आंतरराज्य सीमेवरील वादग्रस्त भागात झालेल्या हिंसाचारानंतर लागू करण्यात आलेले कलम १४४ पाच दिवस उलटल्यानंतरही कायम ठेवण्यात आले आहे. मेघालय सरकारने पश्चिम आणि पूर्व जयंतिया हिल्स, पूर्व खासी हिल्स, री-भोई, इस्टर्न वेस्ट खासी हिल्स, वेस्ट खासी हिल्स आणि दक्षिण पश्चिम खासी हिल्समधील मोबाइल इंटरनेट सेवा खंडित केली आहे. हे निर्बंध आणखी ४८ तासांसाठी वाढवून सोमवार सकाळी साडेदहापर्यंत तसेच राहतील, अशी माहिती गृहविभागाचे प्रधान सचिव शकील अहमद यांनी दिली. एका आदिवासी संघटनेने शनिवारी ‘रेड फ्लॅग डे’ पाळण्याची; तसेच शिलॉंगमध्ये आसाम आणि मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांचे पुतळे जाळण्याची घोषणा केली आहे. आसाम आणि मेघालयमधील आंतरराज्य सीमेवर असलेल्या १२ भागांत दीर्घकाळ वाद सुरू आहे. हिंसाचार झालेले ठिकाण त्यांपैकीच एक आहे.