Home बातम्या आंदोलन करा पण कायदा हातात घेऊ नका ः मुख्यमंत्री

आंदोलन करा पण कायदा हातात घेऊ नका ः मुख्यमंत्री

0

राज्यात नाताळ आणि नववर्षानिमित्त पर्यटकांचे स्वागत आहे. म्हादई प्रश्‍नावरून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणार्‍याची गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. म्हादईच्या प्रश्‍नावरून प्रोग्रेसिव्ह फ्रंटने येत्या ३१ डिसेंबरला आंदोलन करणार्‍याचा इशारा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आंदोलन करणार्‍यांनी योग्य पद्धतीने आंदोलन करावे. कायदा हातात घेण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. कायदा हातात घेणार्‍याची गय केली जाणार नाही, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.
राज्यात येणार्‍या पर्यटकांनी सावधगिरीने वागण्याची गरज आहे. पर्यटकांना रस्त्याची माहिती नसल्याने चुकीच्या पद्धतीने दुचाकी वाहन चालविली जातात. त्यामुळे बर्‍याचवेळा पर्यटकांना अपघातात होतात. या अपघातात काही वेळा पर्यटकांना जीव गमवावा लागतो, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यात वाहतूक पोलिसांकडून बर्‍याच वेळा चुकीच्या पद्धतीने वाहन चालविणार्‍या पर्यटकांना अडवून अपघात होऊ नये म्हणून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे, पर्यटकांची सतावणूक केल्याचा आरोप पोलिसांवर केला जातो, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्यातील किनारी भागातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे. या नवीन सुरक्षा व्यवस्थेमुळे पर्यटकांच्या बॅग चोरीच्या प्रकरणावर नियंत्रण ठेवले जाऊ शकते, असे बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले.