अवलिया मित्राची एक्झिट

0
65

डॉ. कुमार सप्तर्षी
(युवक क्रांती दलाचे संस्थापक व ज्येष्ठ समाजवादी नेते)

अनिल अगदी ‘जगावेगळा’ होता. मनात येईल त्या गोष्टीत मग्न होऊन जाणं हा त्याचा स्वभावपिंड होता. जबाबदार्‍या त्याला गद्य वाटायच्या. साधी राहणी हे त्याचं जीवनसूत्र होतं. कारण अत्यंत निरपेक्ष मनानं तो आयुष्य जगला. किंबहुना त्याची ती फिलॉसॉङ्गीच बनली की, माणसानं स्वच्छंदी जगावं. प्रत्येक क्षण जिवंत जगायचा. कुतूहल हा अनिलचा सर्वांत मोठा प्लस पॉईंट होता. यातूनच त्याच्या लेखनकलेला बहर आला.

डॉ. अनिल अवचट हा माझा गेल्या ५० वर्षांपासूनचा मित्र. आम्हा दोघांचेही वडील डॉक्टर. अनिल माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान. १९६२ मध्ये आम्ही बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून अनिल अवचट आणि कुमार सप्तर्षी ही जोडी लोकांच्या मनात ठसली. आमचं स्वतंत्र नाव घेतलंच जायचं नाही इतकी ही मैत्रीची वीण घट्ट होती. त्यावेळी सायकल हेच मुख्य वाहन असायचं. स्कूटर अजून बाजारात आली नव्हती. त्यामुळे सायकलवर बसून तो मला सोडायला यायचा, मी त्याला सोडायला जायचो असा तो काळ. अनिलची पत्नी सुनंदा हीदेखील माझी वर्गमैत्रीण. आम्हा सर्वांचा त्यावेळी एक ग्रूपच होता. आम्ही तिथूनच एमबीबीएस झालो. पुढं युवक क्रांती दलाच्या स्थापनेमध्येही आम्ही साथीदार होतो. युक्रांदचा कलात्मक भाग अनिलचा होता; तर वैचारिक भाग माझा होता. १९७२ पर्यंत अनिल युक्रांदमध्ये सक्रिय होता. त्यानंतर त्यानं मला एकदा सांगितलं की, मला युक्रांदचे नैतिक परिणाम, विचारधारा आदी सर्व गोष्टी मान्य आहेत; पण त्यातून निर्माण होणारी जी जबाबदारी आहे, संघटना, माणसं… यांमध्ये माझं मन रमत नाहीये. यावर मीही ठीक आहे म्हणून त्याला मुक्त केलं. युक्रांदमधून बाजूला झाला असला तरी आमच्यात अंतर कधीच आलं नाही. ‘युक्रांद’च्या चळवळीची पार्श्वभूमी त्याला सामाजिक विषयांवर लेखन करण्यासाठी उपयोगी पडली. कारण या चळवळीत काम करत असताना त्याला तळगाळातल्या समूहांचे दर्शन घडले. त्याच्या लेखनामध्ये या चळवळीच्या प्रेरणा आहेत, हे विसरून चालणार नाही.

युक्रांदची स्थापना होण्यापूर्वी आम्ही साप्ताहिक दवाखाने चालवायचो. त्यासाठी सुनंदा आणि अनिल यांना नांदेडसारख्या भागात आम्ही पाठवायचो. त्यातूनच त्यांच्यातलं प्रेम जुळलं आणि पुढं ते एकमेकांचे जीवनसाथी बनले.

अनिलच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, त्याला जबाबदारी ङ्गार गद्य वाटायची. त्या-त्या क्षणाला ज्यामध्ये मग्न व्हावंसं वाटतंय त्यात समरसून जायचं हा त्याचा स्वभावपिंड होता. ही बाब उमगल्यानंतर त्याला आम्ही सांगितलं की, तुला जे आवडतं ते तू कर. विशेषतः यामध्ये सुनंदाचा वाटा ङ्गार मोठा होता. तिनं त्याला सांगितलं की तुला ज्यामध्ये मग्न व्हायचं आहे त्यात तू मग्न राहा. बाकी आर्थिक, कौटुंबिक जबाबदार्‍या मी सांभाळते. मग त्यानं शिल्पकला, चित्रकला, ओरीगामी या आधीपासूनच त्याच्यात असणार्‍या कलांना नवं आकाश दिलं आणि त्या बहरत गेल्या. चौकटी ङ्गोडून आकाशात उडणारा पक्षी हा युवक क्रांती दलाचा सिम्बॉल अनिलनंच तयार केलेला आहे. आजही आमच्या पत्रकांवर तो आम्ही वापरतो.
अनिलचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही गोष्ट मग्न होऊन, मनापासून ओतून देऊन करायची. त्यामुळंच त्याच्या लेखणीलाही तेज होतं. यदुनाथ थत्ते ‘साधना’चे संपादक असताना त्यांनी आम्हाला युक्रांदतर्ङ्गे एक सदर चालवा असं सांगितलं होतं. ‘वेध’ नावाचं हे सदर अनिलच चालवायचा. यातून आमच्या विचारांचा प्रसारही होत असे. १९६८ ते १९६९ अशी वर्षभर ही लेखमाला चालली. भवताली दिसणार्‍या छोट्या-छोट्या विषयांवर तो लिहायचा. त्याचं लिखाण दुर्बोध नव्हतं. सोप्या शैलीत लिहायचा; पण थेट काळजाला हात घालणारी शैली हे त्यातलं वेगळेपण होतं. मला आठवतं, ‘वेध’मधला पहिला लेख ‘स्वच्छ पुणे की सुंदर पुणे’ हा होता. त्यावरून बरीच चर्चाही झाली होती. पुढं जाऊन अनिल ‘साधना’चा संपादकही बनला. पण राजा ढाले यांचा एक लेख ‘साधना’मध्ये प्रकाशित झाला आणि त्यातील काही मुद्द्यांवरून वादंग निर्माण झाले. साधनेवर मोर्चे काढले गेले. या सर्वांमुळे तो या परिघाबाहेर गेला. पण या प्रसंगामुळे त्याच्या लक्षात आले की माणसांचा खेळ ङ्गार अवघड आहे. म्हणून आपल्याला जे वाटतं ते करायचं. किंबहुना त्याची ती ङ्गिलॉसॉङ्गीच बनली की, माणसानं स्वच्छंदी जगावं. प्रत्येक क्षण जीवंत जगायचा असं त्याचं तत्त्वज्ञान होतं. एखाद्या भाषणाला जरी तो गेला तरी चित्र काढत बसायचा, ओरीगामी करत राहायचा. या छंदांमधून, कलागुणांमधूनच त्याला परदेश दौर्‍यांची संधी मिळाली आणि या कलांना व्यापकत्व आलं.
एकदा मी त्याला विचारलं की, तुझ्या नेतृत्वाखाली मी जर एखादा सत्याग्रह सुरू केला आणि त्याच दिवशी जर भीमसेन जोशींचा गाण्याचा कार्यक्रम असेल तर तू काय करशील? तो पटकन म्हणाला, मी गाणं ऐकायला जाईन! साहजिकच संघटनेमध्ये असं चालत नाही. म्हणून मग आम्ही आनंदानं वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण आमची मनं सदैव जोडलेलीच राहिली. मध्यंतरी माझ्या मुलाचं लग्न झालं. त्यासाठी त्याला निमंत्रण दिलं होतं; पण तो आला नाही. दुसर्‍या दिवशी आला, आणि त्यानं माझ्या सूनबाईंना बासरी वाजवून दाखवली, चित्रं काढून दाखवली. असं त्याचं आगळंवेगळं व्यक्तिमत्त्व होतं आणि मी ते स्वीकारलं होतं. त्यानंही माझं व्यक्तिमत्त्व स्वीकारलेलं होतं. माझं चित्र तो रोमन सैनिक म्हणून काढायचा.

आणखी एक प्रसंग मला सांगावासा वाटतो, ज्याचा अनिलच्या लेखनावर दूरगामी परिणाम झाला. एस. एम. जोशींनी मला एकदा विचारलं की, बिहारमधील अत्यंत मागासलेला असलेल्या पूर्णिया जिल्ह्यामध्ये भूमिमुक्ती आंदोलनासाठी जायचं आहे, कुणाला पाठवशील? त्यावेळी मी अनिलला जायला सांगितले. तिथल्या विदारक, दाहक वास्तवाने तो हादरून गेला. पुण्याला परतल्यानंतर त्याने बर्‍याच दिवसांनी तिथले अनुभव लिहायला घेतले. ‘माणूस’मध्ये ते छापून आले. त्यावरून ‘पूर्णिया’ हे त्याचे पहिले पुस्तक आकाराला आले. सोपी भाषा, सुटसुटीत वाक्ये, ङ्गोटोग्राङ्गिक मेमरीने ते अनिलने लिहिले. बाबा आढाव यांच्या ‘एक गाव एक पाणवठा’ चळवळीत त्याने सहभाग घेतला होता. हमाल पंचायतीच्या कामात सहभागी झाल्यानंतर त्याने हमालांवर एक ङ्गार सुंदर लेख लिहिला. तो वाचून हमाल त्यांचे प्रश्‍न घेऊन अनिलला भेटायला गेले. तेव्हा त्याने सांगितले की, मी आता तिखट कांडप करणार्‍या महिलांच्या क्लेशाबद्दल लिहितो आहे. असा हा अवलिया. त्याच्या नशिबाने त्याला त्या-त्या क्षणी जे वाटते ते करायला मिळाले! भवतालच्या आर्थिक, भौतिक जबाबदार्‍या कुणी ना कुणी पाहत गेलं! यामुळे त्याला आपले एक वेगळे व्यक्तिमत्त्व आकारता आले आणि वेगवेगळ्या कलांमधून ते ङ्गुलत गेले. या सर्वाचा केंद्रबिंदू म्हणजे त्याचे साधे राहणे. त्याच्या अपेक्षा काहीच नसायच्या. सच्चा निरपेक्ष म्हणून त्याची ओळख होती. अनिलचा भाऊ सुभाष अवचट हादेखील भावाच्या पावलावर पाऊल टाकत चित्रकलेमध्ये आला; पण तो कमर्शिअल आहे. अनिलला कलेची प्रेरणा घरातून मिळाली. त्याची आई मोठमोठ्या रांगोळ्या काढायची.

कुतूहल हा अनिलचा सर्वांत मोठा प्लस पॉईंट होता. यातूनच त्याच्या लेखनकलेला बहर येण्यास वाव मिळाला. ‘पूर्णिया’, ‘माणसं’, ‘कोंडमारा’, ‘धागे आडवे उभे’, ‘प्रश्न आणि प्रश्न’, ‘संभ्रम’, ‘धार्मिक’ अशी जवळपास ३८ पुस्तके अनिलने लिहिली. लेखनातून तो सर्वांचा लाडका झाला. कारण ही सर्वच पुस्तके नुसती वाचनीय नव्हती तर अंतर्मुख करायला लावणारी होती. जगण्यातील गुंतागुंत दर्शवणारी होती.

साधारण महिन्याभरापूर्वी अनिलचं आणि माझं बोलणं झालं होतं. ङ्गोनवर तो म्हणाला होता, ‘‘अरे आपण आता अशा टप्प्यावर आहोत की कधीही निरोप घ्यावा लागू शकतो. तेव्हा आपण भेटलं पाहिजे.’’ मीही तात्काळ सांगितलं की, ‘‘अरे नक्कीच! पण मला तुझ्याकडचे जिने चढता येत नाहीत.’’ यावर तो म्हणाला, ‘‘अरे मग मी येतो.’’ पण ती भेट झालीच नाही.