अवकाळी पाऊस व ऋतुचर्या

0
57
  • डॉ. मनाली महेश पवार

हा पाऊस योग्य काळजी न घेतल्यास बरेच आजार पसरवू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार हितकर आहार-विहाराकडे लक्ष द्यावे व आचरण करावे. योग्य अशा ऋतुचर्या- दिनचर्येचे पालन केल्यास आपल्याला आजारांचा संसर्गसुद्धा होऊ शकत नाही.

सूर्याच्या संतापाने तप्त झालेली धरणीमाता ‘त्राहिमाम’ म्हणत असताना ओढ लागते ती पावसाची… आंब्या-फणसांचा आस्वाद घेता-घेता मे महिना कधी संपतो हे कळतच नाही. उन्हाळ्याची झळ सोसत मे महिना कसातरी पार पडतो व ओढ लागते ती जून महिन्याची व येणार्‍या पावसाची. आसमंतात तजेला व प्रसन्नता आणणारा हा पाऊस बालगोपालांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच सुखावून जातो. पण अर्ध्या मे महिन्यात या अवकाळी पावसाळ्याला काय म्हणायचे? ही तर आजारांना आमंत्रण देण्याची पहिली घंटाच आहे.

आयुर्वेद शास्त्राप्रमाणे प्रत्येक ऋतूचा साधारण कालावधी सांगितलेला असला तरी ऋतू सुरू झाल्याची लक्षणे जसजशी बाह्य वातावरणात दिसायला सुरुवात होतील तसतसा एक ऋतू संपून दुसरा सुरू होत आहे हे जाणावे. नुसते कॅलेंडरनुसार ऋतू ठरवू नयेत, तर निसर्गात होणारे बदल पाहून त्यानुसार राहण्यात, खाण्यापिण्यात, वागण्यात, व्यायामात आवश्यक ते बदल करावेत. या बदलत्या परिस्थितीला आयुर्वेद शास्त्रामध्ये ‘ऋतुसंधी’ म्हणतात. संपणार्‍या ऋतूचा शेवटचा सप्ताह व सुरू होणार्‍या ऋतूचा पहिला सप्ताह अशा १४ दिवसांच्या मधल्या कालावधीला ऋतुसंधी म्हणतात.

ज्याप्रमाणे ऋतू क्रमशः बदलत जातो, त्याप्रमाणे ऋतुचर्येतील बदलही सावकाश, क्रमाक्रमानेच करावेत. अचानक एका दिवसात हे बदल करू नयेत. ऋतुसंधीचा काल हा सर्वाधिक काळजी घेण्याचा असतो. कारण शरीराला बाह्य वातावरणातील बदलांशी जुळवून घ्यायचे असते.

पूर्वीच्या ऋतुमानातील वातावरणाचे शरीरास थोडेफार सात्म्य झालेले असते. अशावेळी वातावरणात होणार्‍या बदलाचा परिणाम शरीरावर फार चटकन होत असतो. याचवेळी आहार-विहारावर फारच नियंत्रण ठेवावे लागते. म्हणजेच उन्हाळ्यात योग्य असलेला आहार पुढील ऋतूत म्हणजे पावसाळ्यात कदाचित अपथ्यकर होऊ शकतो. पण असे असले तरी आहार व विहारातील बदल हा अचानक कधीच करू नये. ज्याचे सात्म्य झालेले असते असा आहार हळूहळू कमी करून पुढील ऋतूसाठी योग्य असणारा आहारही हळूहळू सात्म्य करून घेतला पाहिजे. जर क्रमाक्रमाने हा बदल घडवून आणला तरच आरोग्य टिकून राहते; अन्यथा असात्म्यज, संसर्गजन्य असे विविध रोग होण्याची अधिक शक्यता असते.
या अवकाळी पावसामुळे बाह्य तापमानही ५०-२० डिग्री अंशाने कमी होते व अचानक वातावरणात गारवा येतो. पावसाने थंड झालेल्या वातावरणामुळे तसेच गार वार्‍यामुळे शरीरात वातदोष वाढतो. तर आधीच्या उन्हाळ्यातील उष्णतेमुळे तप्त झालेल्या जमिनीवर पावसाचे पाणी पडल्यामुळे येणार्‍या गरम वाफांमुळे शरीरात पित्तदोष साठावयास सुरुवात होते. अग्नी मंद झाल्याने पचनही खालावते. गढूळ पाण्यामुळे जंतुसंसर्गही फार लवकर होतो व संसर्गजन्य रोग वाढीला लागतात. त्यातही कोरोना महामारीचा धोका पूर्णपणे टळला असेही म्हणता येत नाही. जंतुसंसर्ग तो कधीही होऊ शकतो. त्यामुळे बदललेल्या वातावरणाच्या परिणामाचा विचार करता प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

अवकाळी पावसामुळे होणारे आजार

  • अवकाशी पावसामुळे श्‍वसनमार्गाचे, पचनसंस्थेचे तसेच जंतुसंसर्गाचे आजार चटकन वाढीस लागतात.
  • सर्दी, खोकला, दम्याचा त्रास, ताप असे श्‍वसनसंस्थेचे आजार काळजी न घेतल्यास साथीसारखे पसरतात.
  • त्याचबरोबर भूक न लागणे, पोट जड होणे, उलट्या-जुलाब, जंत, कावीळसारखे पचनसंस्थेचे आजारही उद्भवू शकतात.
  • डेंग्यू, मलेरिया, स्वायनफ्लू, कोरोना इत्यादीसारखे जंतुसंसर्गजन्य आजार लगेच पसरू शकतात.
  • थकवा, निरुत्साहसारखे मानस आजारही काही प्रमाणात दिसतात.

घरच्या घरी उपचार

  • वाढलेला वात कमी होण्यासाठी सर्वांगास नेहमी तेलाचा अभ्यंग करावा.
  • शरीरशक्तीनुसार बाष्पस्वेद घ्यावा.
  • पंचकर्मापैकी वातशामक तेलाची बस्ती (एनिमा) घ्यावी. यासाठी वैद्याचा सल्ला घ्यावा.
  • जुलाब होत असल्यास चमचाभर आल्या-लिंबाचा रस घ्यावा व दिवसभर फक्त ताक-भात किंवा मुगाचे कढण घ्यावे.
  • उलट्या होत असल्यास चमचाभर आल्या-लिंबाचा रस, त्याबरोबर साळीच्या लाह्या कोरड्याच खाव्यात. डाळिंबाचा रस खडीसाखर टाकून थोडा-थोडा पीत राहावा व लंघन करावे.
  • सर्दी, घसा दुखणे, तापासारखे वाटणे असा त्रास होत असल्यास तुरटी, मिरे, अडुळशाचे एक पान, कांदा, लवंग इत्यादी घालून तयार केलेला काढा दिवसातून दोन वेळा सलग एक आठवडा घ्यावा.
  • तसेच सीतोफलादीचूर्ण गरम पाण्याबरोबर सकाळ-संध्याकाळ वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यावे.
  • लहान मुलांना पाव चमचा सीतोपलादी चूर्ण दुधाबरोबर किंवा तुपातून सकाळ-संध्याकाळ द्यावे.
  • पोट जड होऊन फुगल्यासारखे वाटणे, गॅसेस होणे, अपचन या सर्व तक्रारींवर पाव चमचा हिंग्वाण्टक चूर्ण जेवणाच्या सुरुवातीलाच घासभर भात आणि तुपाबरोबर मिसळून खावे व नंतर जेवावे.
  • मलावरोध, मूळव्याधपैकी त्रास वाढत असल्यास जेवणानंतर अविपत्तीकर चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावे.
  • खोकला, दमा असणार्‍यांनी विशेषतः छातीत कफ साचून राहिला असल्यास वासावलेह सकाळ-संध्याकाळ चाटून खावा.

आहारातील बदल

  • ताजे, गरम आणि हलके अन्न सेवन करावे.
  • पचायला जड व तेलकट पदार्थ टाळावेत. दही, चीज, पनीर किंवा मिठाई खाऊ नये.
  • दुपारी साधे जेवण जेवून रात्री मुगाचे कढण, रव्याची पातळ लापशी, भाज्यांचे सूप असा द्रवाहार करावा.
  • या काळात विविध संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता वाढत असल्याने बाहेरील तसेच उघड्यावरच्या खाद्य-पेयांचा वापर करू नये.
  • आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स टाळावेत.
  • मंद झालेल्या अग्नीला प्रज्वलित करण्यासाठी भाजी, आमटी बनवताना हिंग, जिरे, धणे, दालचिनी, तामलपत्र, आले, हळद अशा मसाल्यांचा वापर करावा.
  • या काळात आले व त्यापासून तयार केलेली सुंठ वापरावी. भाज्या, आमटी किंवा सूप करतानाही तिखटापेक्षा आले किंवा सुंठीचाच वापर करावा.
  • दुधात चिमूटभर सुंठीचे चूर्ण टाकावे.
    आहाराची पथ्ये पाळल्यास औषधाची गरजच राहत नाही. योग्य आहार घेतला नाही तर औषधाचा पुरेसा परिणाम दिसून येत नाही. अशा काळात आहाराचे पथ्य कटाक्षाने पाळणे आवश्यक ठरते.

या काळात कसे वागावे?

  • पाऊस हा सध्या कसाही व केव्हाही येऊ शकतो, त्यामुळे काम नसताना शक्यतो बाहेर पडू नका.
  • बाहेर जाताना छत्री किंवा रेनकोट अवश्य जवळ बाळगावा. मजेखातरसुद्धा या पावसात भिजू नये.
  • दमट हवा एकंदरीत तंतुपोषक व त्यामुळे विविध प्रकारच्या इन्फेक्शन्सना कारण ठरत असल्याने सकाळ-संध्याकाळ हवा शुद्ध करण्यासाठी वेखंड, सुंठ, ओवा, कडुनिंबाची सुकवलेली पाने, धूप घालून धूपन करावे.
  • शारीरिक श्रमांचा अतिरेक करू नये. पण साधा व कमी प्रमाणात घरातल्या घरात व्यायाम करावा.
  • रात्री जागरण करू नये, तसेच दुपारी झोपू नये.
  • हवेत गारवा व शरीरातही वातदोष वाढत असल्याने कोमट पाण्यानेच स्नान करावे. साबणाऐवजी उटण्याचा उपयोग करावा.
  • तसेच पिण्यासाठी पाणी वापरताना ते पाणी निवळून, गाळून व उकळून मगच वापरावे. शुद्ध केलेले पाणी न वापरता साधे वापरलेले पाणी अनेक साथींच्या आजारांना निमंत्रण देऊ शकते.

या अशा अवकाळी पावसाची सध्या कोकण प्रांतात सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हा पाऊस योग्य काळजी न घेतल्यास वर सांगितल्याप्रमाणे बरेच आजार पसरवू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार हितकर आहार-विहाराकडे लक्ष द्यावे व आचरण करावे. योग्य अशा ऋतुचर्या- दिनचर्येचे पालन केल्यास आपल्याला आजारांचा संसर्गसुद्धा होऊ शकत नाही.