अब की बार किसकी सरकार? आज फैसला

0
186

लोकसभा निवडणूक प्रचाराच्या प्रदीर्घ व कडव्या रणधुमाळीनंतर अखेर देशात सरकार कोणाचे याचा फैसला आज होणार आहे. सात टप्प्यांत झालेल्या मतदान प्रक्रियेच्या समाप्तीनंतर आज सकाळी ८ वाजल्यापासून देशभरातील मतमोजणी केंद्रांवर लोकसभेच्या ५४२ जागांसाठी मतमोजणी सुरू होणार असून रात्री उशिरा अधिकृत निकाल स्पष्ट होणार आहे. काही राज्यांच्या विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणीही आज होणार आहे.

देशातील अनेक संस्थांनी या निवडणुकीचे एक्झिट पोल अंदाज जाहीर केले असून त्यापैकी बहुतेकांनी पुन्हा एकदा केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार सत्तेवर येणार असल्याचे अंदाज वर्तविले आहेत. मात्र विरोधकांनी हे अंदाज फेटाळून लावताना भाजपला पराभव पत्करावा लागेल असा दावा केला आहे. देशातील वाढती बेरोजगारी, शेतकर्‍यांमधील असंतोष तसेच आर्थिक मंदी अशा कारणांमुळे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळणार नसल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.
यावेळी लोकसभेसाठी ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान ७ टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी ६७ टक्के एवढे मतदान झाले. ५४२ जागांसाठी ८०४९ उमेदवार नशीब अजमावत आहेत.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले होते. त्यांच्या पारड्यात मतदारांनी २८२ जागा टाकल्या. तर कॉंग्रेसचा सफाया करताना मतदारांनी त्यावेळी त्यांच्या पारड्यात सर्वात कमी म्हणजे ४४ जागा टाकल्या. २००९ च्या निवडणुकीत कॉंग्रेसला २०६ जागा मिळाल्या होत्या.

यावेळची लोकसभा निवडणूक भाजप – कॉंग्रेस व अन्य पक्षांमध्ये कधी नव्हे एवढी त्वेषपूर्ण पद्धतीने लढली गेली. चौकीदार चोर है, भ्रष्टाचारी नं. वन, खाकी अंडरवेयर अशा अवमानास्पद शाब्दीक कोट्यांमुळे या निवडणुकीच्या प्रचाराने अत्यंत खालची पातळी गाठली असल्याची सर्वसामान्यांची भावना झाली.

दरम्यान सुमारे २२ विरोधी पक्षांनी मंगळवारी ईव्हीएम छेडछाडीबाबत चिंता व्यक्त केली. तसेच मतमोजणीवेळी पारदर्शकता राखण्याची मागणी त्यांनी केली. लोकसभेच्या एकूण ५४३ जागांपैकी ५४२ मध्ये मतदान झाले आहे. तर वेल्लूर मतदारसंघाची निवडणूक प्रचंड प्रमाणात पैशाच्या वापरामुळे रद्द करण्यात आली आहे.

दिग्गजांचे भवितव्य पणास
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी, युपीएच्या नेत्या सोनिया गांधी, सपाचे अखिलेश यादव, अनेक केंद्रीय मंत्री यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य पणास लागले आहे.

चार ते पाच तास
मतमोजणीस विलंब शक्य
लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोग यावेळी प्रथमच ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यांची मतांची जुळणी करणार आहे. देशातील १०.३ लाख मतदान केंद्रांपैकी २०,६०० मतदान केंद्रांवरील मतांची अशी जुळणी केली जाणार आहे. त्यावेळी कोणतीही तफावत आढळल्यास कागदी स्लिपांवरील निकाल हा अंतिम मानला जाणार आहे. या प्रक्रियेमुळे मतमोजणीस आणखी चार ते पाच तास जादा वेळ लागणार आहे, असे निवडणूक अधिकार्‍यांनी सांगितले. टपाली मतदान मोजणीसाठीही सुमारे दोन तास जादा वेळ लागेल, असे सांगण्यात आले. ही मतमोजणी हाताने करावी लागेल.

गोव्यातील विधानसभा पोटनिवडणूक
निकालावर गोमंतकीयांची नजर

लोकसभेच्या दोन आणि गोवा विधानसभेच्या चार पोट निवडणुकीतील मतमोजणीला आज गुरुवार २३ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. मतदानानंतर ईव्हीएममध्ये सीलबंद झालेल्या उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल लागणार आहे. चारही पोट निवडणुका अटीतटीच्या झालेल्या आहेत. शिरोडा आणि मांद्रे या दोन मतदारसंघातील लढतीकडे जास्त लक्ष लागले आहे. तसेच, लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी चुरशीची लढत झालेली आहे. विधानसभेच्या पोट निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तापालट होईल, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. तर, आघाडी सरकारकडून पोट निवडणुकीनंतर आघाडी सरकार आणखी भक्कम होईल असा दावा केला जात असल्याने निवडणूक निकालाकडे नागरिकांचेे लक्ष लागले आहे.
आल्तिनो पणजी येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारात उत्तर गोवा लोकसभा, गोवा विधानसभेच्या पोट निवडणुकीतील मांद्रे, म्हापसा आणि पणजी मतदारसंघातील मतमोजणी केली जाणार आहे. तर, बोर्डा मडगाव सरकारी आयटीआयच्या आवारात दक्षिण गोवा लोकसभा आणि विधानसभेच्या शिरोडा मतदारसंघातील पोट निवडणुकीची मतमोजणी केली जाणार आहे. निवडणूक निकालाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

गुरूवारी सकाळी ७ वाजता मतदान यंत्र ठेवण्यात आलेले स्ट्रॉंग रूम उमेदवारांच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहे. त्यानंतर ८ वाजल्यापासून पोस्टल मतपत्रिका आणि ईव्हीएममधील मतांच्या मोजणीला सुरुवात केली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांच्या देखरेखीखाली मतमोजणी केली जाणार आहे.

उत्तरेत ११ सभागृहांमध्ये
मतमोजणीची व्यवस्था
उत्तर गोव्यातील मतमोजणीसाठी ११ सभागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्तर गोव्यातील मतमोजणी दोन टप्प्यात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पणजी, सांताक्रुझ, मांद्रे, मये, डिचोली, हळदोणा, कळंगुट, शिवोली, पर्ये, म्हापसा या विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी केली जाणार आहेत. तसेच मांद्रे, म्हापसा आणि पणजी या तीन विधानसभा पोट निवडणुकीतील मतमोजणी केली जाणार आहे.
दुसर्‍य टप्प्यात ताळगाव, सांतआंद्रे, पेडणे, साखळी, कुंभारजुवा, पर्वरी, साळगाव, वाळपई, थिवी आणि प्रियोळ विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी करण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीनंतर पाच मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची मोजणी करून ईव्हीएमच्या मताशी जुळवणी केली जाणार आहे.

गोव्यातील पोटनिवडणूक निकालावर लक्ष
शिरोडा आणि मांद्रे मतदारसंघातील मतदार पक्षबदल केलेल्या अनुक्रमे सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांना साथ देतील की त्यांना धडा शिकवून पैंगिणची पुनरावृत्ती करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. म्हापसा मतदारसंघात मतदार घराणेशाहीची परंपरा चालू ठेवतील की, बदल घडवून आणतील याकडे लक्ष लागले आहे. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पश्‍चात भाजप पणजी या बालेकिल्ल्यावर आपले वर्चस्व कायम राखतो, की भाजपचा बालेकिल्ला कॉंग्रेस ताब्यात घेतो, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.