अजातशत्रू

0
114

‘मूर्ती लहान, पण कीर्ती महान’ असे ज्यांच्याविषयी म्हणता येईल असे सदा हसतमुख, सज्जन, सुसंस्कृत राजकारणी प्रा. सुरेंद्र सिरसाट कोणाच्या ध्यानीमनी नसताना अल्प आजाराअंती आपल्यातून एकाएकी निघून गेले आहेत. पत्रकार, लेखक, शिक्षक, प्राचार्य, नाट्यकलाकार, संघटक, सहकार व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ता, राजकीय नेता अशा अनेक रूपांत वावरलेल्या प्रा. सिरसाट यांची उणीव गोव्याच्या सार्वजनिक क्षेत्राला निश्चितपणे भासत राहील. सामाजिक जीवनातील त्यांचा सदाप्रसन्न वावर, दिलखुलास हास्याचा खळखळाट, समोर कोणीही असले तरी त्याला सहजपणाने आपल्या समपातळीवर घेऊन सन्मानाने आणि आपुलकीने वागवणे, राजकारणात असले तरी त्यांच्यापाशी असलेले अजातशत्रुत्व हे सगळे गुणविशेष तमाम गोमंतकीयांना जवळून ज्ञात आहेत. एकदा सभापती असताना आपल्या वाढदिवसानिमित्त मगोच्या मंत्री व आमदारांना घरी भोजनासाठी बोलावले असता रवी नाईक यांनी पक्षांतर्गत फूट व पळवाटा यासंदर्भातील खाचाखोचा आपल्याकडून गप्पा मारता मारता कशा जाणून घेतल्या आणि पुढे त्यांचाच फायदा उठवत मगो पक्षाला रामराम कसा ठोकला त्याचा किस्सा स्वतः सिरसाट सरांनी नवप्रभेतील ‘वळणवाट’ सदरात एकदा लिहिला होता. त्यांच्या दिलदार स्वभावापोटीच हे राजकीय संकट मगो पक्षावर तेव्हा ओढवले होते. भारतीय जनता पक्षाशी युती करण्यास संमती देण्यात पक्षाध्यक्ष या नात्याने सिरसाट यांचे मोठे योगदान होते, ज्यातूनच पुढे भाजपची गोव्यात राजकीय घोडदौड सुरू झाली. सिरसाट यांचा स्वभाव असा दिलदार होता. काही समकालीन नेत्यांसारखा धूर्त कावेबाजपणा त्यांना कधी जमला नाही.
प्राचार्य सिरसाट यांचा वावर विविध क्षेत्रांत जरी राहिला असला तरी त्यांची सर्वांत प्रमुख ओळख राहिली ती त्यांनी भूषविलेल्या विधानसभा सभापतीपदामुळे. नव्वदच्या दशकात जेव्हा ते सभापती बनले, तो सारा काळ गोव्याच्या राजकारणातील कमालीच्या अस्थिरतेचा आणि तत्त्वहीन तडजोडींचा होता. अशा काळात सभापतीपदावर वावरणे निश्‍चितच सोपे नव्हते. सत्तालोलुप आमदारांच्या कोलांटउड्या, रातोरात बनणारी, पाडली जाणारी अनीतीमान सरकारे, राजकीय पक्षांतील फाटाफुटी ह्या सार्‍या पार्श्वभूमीवर सभापतीपदासारखे संवैधानिक पद त्यांना प्राप्त झाले. या दरम्यान अनेक आव्हानात्मक गोष्टी त्यांच्यासमोर उभ्या ठाकल्या. रत्नाकर चोपडेकर व संजय बांदेकर यांना अपात्र ठरविताना दोघांनी त्याची पूर्वकल्पना आल्याने उच्च न्यायालयात धाव घेऊन अंतरिम स्थगिती मिळविली होती. तेव्हा सिरसाट यांनी न डगमगता आपल्या सभापतीपदाच्या अधिकाराचा मान राखण्यासाठी रातोरात आपल्या आल्तिनोवरील निवासस्थानी सुनावणी घेतली. त्या दोघांना पक्षातील फूट सिद्ध करता आली नसल्याने अपात्र तर ठरवलेच, शिवाय पक्षांतरबंदी कायद्याच्या सातव्या परिशिष्टानुसार विधिमंडळ अध्यक्षाच्या कारभारात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही अशी कणखर भूमिकाही घेतली. फुटीच्या आधारे मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या रवी नाईक यांना अपात्र घोषित करणारा सिरसाट यांचा निवाडा तर पुढची अनेक वर्षे गाजत राहिला आणि न्यायालयांनीही त्यावर आपली मोहोर उठवली. सिरसाट सरांना त्याविषयी अभिमान वाटे. कॉंग्रेसने सादर केलेल्या अपात्रता याचिकेवर अपक्ष आमदार कार्मो पेगादो यांनीही सही केल्याने सभापती सिरसाट यांनी तांत्रिक कारणाखाली तो फेटाळून लावला तेव्हा त्या अर्जावर सही करणार्‍या अपक्ष आमदार कार्मो पेगादोंविरुद्ध काशिनाथ जल्मींनी सादर केलेल्या अपात्रता अर्जावर निष्पक्ष निवाडा देताना सिरसाट यांनी पेगादोंनी कॉंग्रेस प्रवेश केल्याचे आपल्याला कळवले नसल्याच्या सबबीवर त्यांना अपात्रतेपासून वाचवणारा निवाडा देऊन इतरांची नाराजी ओढवून घेतली होती. विशेष म्हणजे पेगादो यांना यावेळी अपात्र ठरवले असते तर मगो व गोवन पीपल्स पार्टीचे संयुक्त सरकार कोसळले नसते, परंतु अपात्रता याचिकांवर निवाडा देताना पक्षहित न पाहता आपल्या त्या पदाला न्याय देत पक्षांतरबंदी कायद्याचा कसून अभ्यास करून, त्यासंबंधीचे अन्य राज्यांच्या सभापतींनी दिलेले निवाडे, न्यायालयीन निवाडे आदी स्वतः जातीने अभ्यासून सिरसाट यांनी आपले निवाडे दिले. त्यामुळे त्यांनी दिलेले निवाडे उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयांनीही पुढे उचलून धरले हा सिरसाट यांच्या अभ्यासूवृत्तीचा गौरव म्हणावा लागेल.
‘‘विधिमंडळ पक्षांतील फूट हीच मूळ पक्षातील फूट आहे असा अन्वयार्थ लावणे चुकीचे आहे. ही चूक अपात्रता प्रकरणात टाळायला हवी. विधिमंडळ पक्षात पाडलेली फूट हीच मूळ पक्षात पडलेली फूट आहे. त्यामुळे मूळ पक्षातील फूट वेगळी दाखवण्याची आवश्यकता नाही. हा दावा सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केला आहे.’’ अशी सुस्पष्ट भूमिका सिरसाट मांडत आले होते, आजच्या काळातही अपात्रता याचिकांसंदर्भात ती विचारात घ्यावी लागेल. सिरसाट यांची आठवण त्यानिमित्ताने गोव्याला होत राहील.