रविवारच्या भूकंपाने अर्धाअधिक देश हादरला. किल्लारी आणि गुजरातच्या आठवणी त्याने ताज्या केल्या. त्या दोन्हींच्या तुलनेत सिक्कीममध्ये केंद्र असलेल्या परवाच्या भूकंपाची तीव्रता जरी कमी असली, तरीही मोठी हानी झालेली आहे. सिक्कीमची भौगोलिक डोंगराळ रचना लक्षात घेता मृतांची आणि जखमींची संख्या वाढणार तर आहेच, परंतु भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन, रस्त्यांपासून संपर्क यंत्रणेपर्यंत सर्व व्यवस्थांची फेरउभारणी हे फार मोठे आव्हान असेल. या भूकंपाचे हादरे जवळजवळ संपूर्ण उत्तर व ईशान्य भारतात बसले. सिक्कीमप्रमाणेच नेपाळ, तसेच पश्चिम बंगालच्या जलपायगुडी आणि बिहारच्या नालंदा, दरभंगा जिल्ह्यांमध्येही हानी झाल्याच्या बातम्या आहेत. आधीच दूरस्थ असल्यामुळे दुर्गम मानल्या जाणार्या सिक्कीममध्ये मदत आणि पुनर्वसनाचे आव्हान आता केंद्र आणि राज्य सरकारला पेलायचे आहे. या भूकंपानंतर दिलासादायक अशी एक बाब घडली ती म्हणजे संध्याकाळी सहाच्या सुमारास भूकंप आला आणि अवघ्या एक – दोन तासांत मदतसामुग्री घेऊन केंद्रीय मदतपथके भारतीय हवाई दलाच्या पाच विमानांनी सिक्कीमकडे रवाना झाली होती.
ही तत्परता भारतीय प्रशासकीय व्यवस्थेची एकंदर स्थिती पाहाता प्रशंसनीय आहे. अर्थात, काही वर्षांपूर्वी गठित करण्यात आलेल्या ‘नॅशनल डिफेन्स रिस्पॉन्स फोर्स’ किंवा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलामुळेच ही तत्परता दाखवणे शक्य झाले आहे. सीमा सुरक्षा दल, इंडो – तिबेटन सीमा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दल या केंद्रीय निमलष्करी दलांमधून प्रत्येकी दोन बटालियन एकत्र आणून हे सुसज्ज दल स्थापन करण्यात आले आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांत दहा ठिकाणी त्यांची पथके तैनात आहेत. चेन्नईजवळच्या अरक्कोणमपासून उत्तरेतल्या चंडीगडपर्यंत आणि भुवनेश्वरजवळच्या मुंडालीपासून आपल्या पुण्यापर्यंत एनडीआरएफची केंद्रे आहेत. हे केवळ लष्करी प्रशिक्षण घेतलेले जवान नाहीत, तर त्यामध्ये अशा प्रकारच्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीला तोंड देऊ शकणारे तंत्रज्ञ, अभियंते, वैद्यकीय अधिकारी, श्वानपथके असा मदतकार्यास उपयुक्त ठरू शकणार्या त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग असतो. सिक्कीममधील मदतकार्यात एनडीआरएफचे हे तज्ज्ञ नक्कीच महत्त्वाची भूमिका आता बजावणार आहेत. देशात गेल्या तीन – चार वर्षांमध्ये ज्या ज्या मोठ्या आपत्ती आल्या, त्यामध्ये फार चांगल्याप्रकारे मदतकार्य करून या दलाने आपला ठसा उमटवलेला आहे. केवळ नैसर्गिक वा मानवनिर्मितच नव्हे, तर रासायनिक, जैविक आणि आण्विक आपत्तीचा मुकाबला करण्याच्या दिशेनेही या जवानांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. डोंगराळ भागात मदतकार्यासाठी प्रशिक्षित असलेल्या इंडो तिबेटन सीमा पोलिसांच्या मुख्यालयांचे परवाच्या भूकंपात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांची यंत्रणा विस्कळीत झालेली असताना एनडीआरएफचे तेथे पोहोचणे सिक्कीमवासीयांना दिलासादायक आहे. रविवारचा भूकंप संध्याकाळच्या वेळेस झाला. रस्ते उद्ध्वस्त होणे, दळणवळण यंत्रणा बंद पडणे, वीजपुरवठा खंडित होणे अशा गोष्टी अशा भूकंपानंतर होत असतात. त्यामुळे तेथे सर्वत्र हलकल्लोळ माजला होता. अशा वेळी तेथे पोहोचणे हेच मोठे आव्हानात्मक काम होते. जरी विमाने पाठवली गेली तरी बागडोगरासारख्या विमानतळावर रात्रीच्या वेळी विमाने उतरवण्याची वा उड्डाण करण्याची सोय नाही. अशावेळी वायूसेनेने नव्यानेच घेतलेली सी १३० जे ही सुपर हर्क्युलिस विमाने मदतीला आली. ही अत्याधुनिक विमाने अंधारातही उतरवली जाऊ शकतात. त्यांच्यामुळेच एनडीआरएफचे तज्ज्ञ व जवान सिक्कीममध्ये काही तासांत उतरू शकले. नैसर्गिक आपत्ती सातत्याने येतच असतात, परंतु आपण त्याला तोंड कसे देतो हे महत्त्वाचे असते. किल्लारीचा भूकंप असो अथवा गुजरातचा भूकंप असो, तेव्हा प्रारंभी सरकारी मदतकार्य अत्यंत विस्कळीत स्वरूपात होते. देशविदेशांतून आलेल्या मदतीच्या ओघाचे वाटप करणेही सरकारला दुरापास्त झाले होते. त्यावेळी स्वयंसेवी संघटना भूकंपग्रस्तांच्या मदतीला धावून गेल्या होत्या. यावेळी मात्र, सरकारी पातळीवरील प्रतिसादात कमालीची तत्परता दिसून आली आहे. सिक्कीम या आपत्तीतून वेगाने सावरावा ही या संकटाच्या घडीस अपेक्षा करूया.