– सौ. देवकी राजेश नाईक
आ ठवणींचा अगणित ठेवा उराशी कवटाळून प्रत्येकजण जगत असतो. कधीतरी तिन्हीसांजेला मनकप्प्यातील आठवणींचा ठेवा वर उफाळून येतो अन् मन भूतकाळात डोकावते. आपलं बालपण प्रत्येकाला हवहवसं वाटणारं अन्, आजच्या फेसबुकच्या जमान्यात तर सर्वच पालकांना ते तीव्रतेने हवहवसं वाटणारं! नाताळाची सुटी पडली अन् आमचे चिरंजीव पहिल्याच दिवशी कंटाळा येतो ही रट लावून बसलेला. खरं सांगू? खूपच दया येते मला आजच्या मुलांची. आमच्या बालपणात आम्ही जे बालपण उपभोगलंय त्याच्या निम्यातसुद्धा ही मुलं उपभोगत नाहीत. मोबाइलवरची गाणी, टी. व्ही. वरचे कार्यक्रम, कॉप्म्युटर, लॅपटॉप, फेसबुक हेच आजच्या मुलांचं जणू विश्व झालंय.
आठवतंय? आपण शाळेतून घरी आल्यानंतर जेवण उरकून हातांवर पाणी पडलं की घरातून धूम ठोकायची. शिकवण्या नाही, नृत्याचे वर्ग नाही की खेळवर्ग नाही. पण सगळ्यात प्रगती उत्तम असायची! तसंच घरकाम, शेतीकाम यातही हातखंडा असायचाच. याच आठवड्यात माझा मुलगा रुद्रेशचं स्नेहसंमेलन झाले. ‘थिम होता गोवा.’ मुलांनी गोव्यात साजरे होणारे सगळे उत्सव सादर केले होते. त्यातील नाताळ, शिमगा, धालो, फुगडी, देखणी, नरकासूर वध पाहून बालपणी आम्ही साजरे केलेले उत्सव, नाच, यांची प्रकर्षाने आठवण होत राहिली.
हल्लीच्या युगात साजरे होणारे उत्सव हे फक्त समितीवाल्यांपुरतेच मर्यादित असतात. समाजातील प्रत्येक घटकांचा त्यात कुठे सहभाग असतो? मी बालपणी सगळे उत्सव उमेदीने, उत्साहाने साजरे केलेत. शाळेत शिकताना नाताळाच्या आधी आम्हांला ‘ख्रिसमस ट्री’ स्पर्धा असायची. त्या झाडावर प्रत्येक वर्गातील मुलांनी छान छान सुविचार लटकवायचे. लहान खेळणी, गिफ्टस, हस्तकला, नक्षीकाम इत्यादी वस्तूंनी झाड सजवले जायचे. तसेच एक महत्त्वाची गोष्ट. प्रत्येक मुलाला एका लहान चिटोर्यावर स्वत:चं नाव लिहून द्यावं लागत असे. मग वर्गशिक्षिका त्या चिठ्या टेबलावर टाकत असे. ज्याला कुणाचं नाव मिळालेलं असेल त्यानं त्या मुलासाठी नेहमी देवाजवळ प्रार्थना करावी, अन् त्याच्यातला फरक टिपावा. खरंच खूपच सुंदर संकल्पना होती ती. मला अजूनही आठवतं – मी ज्याच्यासाठी प्रार्थना करत होते, त्याला एकदा खेळात मोठं बक्षीस मिळालं. शिकायला खूपच आळस करायचा. पण खेळात हुशार होता. त्यादिवशी मलाच त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद झाला होता. हे आता कुठं चालतं माहीत नाही. पण ती माझ्या एका शिक्षिकेची सुंदर संकल्पना मनाला खूपच भावायची. स्वत:च्या हिताबरोबर दुसर्याचंही हित जपावं हीच शिकवण त्यातून मिळत गेली. एकप्रकारचं बाळकडूच होतं ते.
कधी कधी शाळेत नाताळासाठी ‘गोठा’ केला जायचा. ख्रिममसचा कार्यक्रम असायचा. खूपच मजा यायची. गावातील ख्रिश्चन बांधव घरोघरी जाऊन कॅरोल गाणी म्हणायचे. सांताक्लॉज येऊन चॉकलेट्स वाटायचा. नाताळाच्या दिवशी ख्रिश्चन बांधवांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा द्यायचो. नाताळ पार पाडला की गावात धालोत्सव साजरा व्हायचा. २ – ३ दिवस धालो मांडावर जाऊन तिथला आनंद लुटायचा. स्त्रियांनी म्हटलेली धालोगीते, फुगड्या कानाला खूप गोड वाटायची अन् मुगाची खिचडीची चव दुप्पट व्हायची. आता शहरात हे धालोत्सव, फुगड्या स्नेहसंमेलनापुरतेच राहतील की काय ही खंत वाटत राहते.
त्यानंतर वाजत गाजत यायचा शिमगोत्सव. विविध रंग खेळायला सगळे गावकरी सज्ज व्हायचे. अस्नोडा गावात असताना शिमग्याला वाड्यावरील मुले डोक्यावर शिवाजी टोपी घालून तोंडावर विविध मुखवटे चढवून घरोघरी जाऊन ‘शबैची बाहुली तारीकडे पावली, शबै शबै’ असं गाणं म्हणायची. काही मुले पारंपरिक, ऐतिहासिक पोशाख करून यायची. काही भाषणे, गाणी सादर करायची. घरातील मंडळी त्यांना पैसे व रताळी (कणगा) द्यायची. काही मुली एक कपडा घेऊन दोन्ही बाजूला तो पकडून, पसरून गाणी म्हणायची. त्याला ‘गौरीचा बाळ’ म्हटला जाई. ते गाणंही सुंदर होतं –
‘‘गौरीचा बाळ बाये, आंब्या तुझा टाळ,
आमी भुरगी आयल्या, गौरी तुझा बाळ’’
मग त्यांच्या त्या कपड्यात रताळी किंवा पैसे टाकले जात. आता काळाच्या ओघात सगळं लुप्त होत चाललंय. गावकर्यांच्या उत्साहाला उधाण यायचं ते रोमटामेळानेच. ढोल, ताशे, कासाळे ही गोवेकरांची शान! त्यांच्या तालावर कुणीतरी ठेका धरावा. रंगपंचमी म्हणजेच गावातील ‘धुळवड’ पाहण्याजोगी. संपूर्ण गावात एक वेगळाच उत्साह संचारलेला असे. धुळवडीला रोमटामेळ, काकड नाच (एका लोखंडी सळईला दोन्ही बाजूने कापड गुंडाळून ते पेट्रोलमध्ये बुडवून पेटवतात. नंतर ते घेऊन नाच करतात.) तत्पूर्वी, गावातून तरंगा नेली जातात. एकमेकावर रंग उधळत तरंगा देवळात नेतात. मुलींवर रंग उधळू नये ही गोष्ट कटाक्षाने पाळली जाते. ढोल, तासो, कासाळे ही वाद्ये वाजविण्यासाठी तरुणांची चढाओढ चाललेली असे.
गावात गणेश चतुर्थी, हनुमान जयंती, शांतादुर्गा देवीचा कालोत्सव, दत्तजयंती, सगळं कसं समाजातील प्रत्येक घटकाला सामील करून साजरे केले जात. तिथं गावाचा एकोपा दिसे. तसेच सरकारी शाळेचे शारदोत्सवही धूमधडाक्यात साजरे केले जात. आम्हां लहान मुलांना हे सगळे उत्सव म्हणजे मोठी पर्वणीच असायची. मुलांना संपूर्ण गावात फिरायला मोकळीक असे. पण हल्ली जमाना बदललाय. घरातून पाऊल बाहेर टाकताना आईवडील सोबत असणे गरजेचे असते. दिवसाढवळ्या अपहरणाचे प्रकार वाढत चाललेत. त्यामुळे नाइलाजानेच आपण आपल्या मुलांचा आत्मविश्वास गमावण्यात हातभार लावतो.
दोन्ही पालक नोकरी करणारे. सुटीत घरात मुलांना लॉक करून पालक कामाला जातात किंवा त्यांना पाळणाघरात ठेवतात. पूर्वीसारखं आता काहीच राहिलेलं नाही. गावाकडून माणसे शहरात स्थायिक झाल्यामुळे प्रत्येक सणाला गावाकडे जाणं होत नसतं. त्यामुळे नवीन पिढीला त्याचा आनंद उपभोगायला मिळत नाही. बालपणी खेळलेले विटी – दांडूचे खेळ, आट्यापाट्या, ओली कोशिंबीर, लंगडी, लगोर्या, चोर–पोलीस, अंताक्षरी, पतंग उडवणे, दोरी उड्या, कबड्डी, भातुकलीचा खेळ – तो खेळताना बांधलेली खरी झोपडी, अन् चहा करताना झोपडीला लागलेली आग अन् त्यानंतर उडालेली तारांबळ अजूनही सगळं कसं हवहवंस वाटणारं….!
चतुर्थीसाठी सगळ्या मुलींनी मिळून मेंदी तयार करणे व ती एकमेकींच्या हातावर घालणे, याला हल्ली बाजारात मिळणार्या तयार कोनाची सर नाही येणार. आम्ही मुलींनी स्वत: तयार केलेल्या मेंदीची लाली अजूनही मनात रंगतेय व तिचा तो गंध–सुगंध अजूनही आठवणींच्या संगे दरवळतोय. अन् नकळत ओठांवर शब्द उमटतात –
‘‘मेंदीच्या पानावर मन झुलतंय ग…’’