>> पाकच्या पाणी कोंडीसह घेतले 5 कठोर निर्णय
>> आज होणार सर्वपक्षीय बैठक
>> हल्ल्यात पाचजणांचा सहभाग उघड
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने कडक पावले उचलली आहेत. यात पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा मिळणार नाही, सिंधू पाणी कराराला स्थगिती, पुढच्या 48 तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचे आदेश, अटारी बॉर्डर बंद तसेच पाकिस्तान हायकमिशनच्या पाच अधिकाऱ्यांना हटवणे अशा निर्णयांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल बुधवारी झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (सीसीएस) बैठक झाली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेली सीसीएस बैठक अडीच तास चालली. त्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, एनएस अजित डोभाल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पाच प्रमुख निर्णय घेतले आहेत.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सीसीएसने पाच प्रमुख निर्णय घेतले आहेत. त्यात पाकिस्तानसोबतचा 1960 चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. पाकिस्तान सीमापार दहशतवादाला विश्वासार्ह आणि अपरिवर्तनीयपणे पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत हा करार स्थगित करण्यात आला आहे.
अटारी एकात्मिक तपासणी नाका तात्काळ बंद करण्यात येत आहे. ज्यांनी वैध परवानगी घेऊन या मार्गाने सीमा ओलांडली आहे ते 1 मे 2025 पूर्वी त्याच मार्गाने परत येऊ शकतात.
पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पूर्वी जारी केलेले सर्व व्हिसा अवैध मानले जातील. सध्या या व्हिसावर भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत देश सोडावा लागेल.
नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई दल सल्लागारांना पर्सना नॉन ग्राटा घोषित करण्यात आले आहे. त्यांना भारत सोडण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
भारत इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून त्यांचे संरक्षण, नौदल आणि हवाई दल सल्लागार मागे घेत आहे. संबंधित उच्चायोगांमध्ये ही पदे रद्द मानली जातील.
जशास तसे उत्तर ः राजनाथ सिंह
जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली असून दहशतवाद्यांना संपवा अशी मागणी केली जात आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. धर्माच्या आधारे पर्यंटकांची हत्या करणे, निर्दोषांना ठार करणे हे कृत्य निंदनीय आहे. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, त्यांना जशास तसे उत्तर दिले जाणार अशा इशारा सिंह यांनी दिला. दहशतवाद्यांसोबतच पडद्यामागे जे कोणी यामध्ये सहभागी असतील त्यांना संपवले जाईल असेही राजनाथ सिंह म्हणाले.
संशयितांचे रेखाचित्र जारी
सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांनी पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केले आहेत. त्यांची नावे आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा असल्याचे सांगण्यात आले आहे. हल्ल्याचा मास्टरमाइंड लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्ला खालिद आहे, जो पाकिस्तानात उपस्थित आहे. प्राथमिक तपासात या हल्ल्यात 5 दहशतवादी सहभागी असल्याचे समोर आले आहे. यापैकी दोन स्थानिक आणि तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सहभाग आहे. केंद्र सरकारने या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
आज सर्वपक्षीय बैठक
सरकारने गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. दुसरीकडे, पहलगामच्या बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी श्रीनगर ते दिल्ली अशा अनेक बैठका झाल्या. पहलगाम हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. बैसरन खोऱ्यात मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित असताना हा हल्ला झाला. मृतांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील पर्यटकांचा समावेश आहे. नेपाळ आणि युएईमधील प्रत्येकी एक पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचाही मृत्यू झाला.
संशयितांचा कसून शोध
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर आला आहे. या दहशतवाद्यांचे स्केचही जारी करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर आता या दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे. पहलगामधील घनदाट जंगलांत हा शोध चालू आहे. पुढचे काही दिवस ही शोधमोहीम चालूच राहणार आहे.
1500 लोक ताब्यात
पहलगाम हल्ल्यानंतर आता जम्मू काश्मीरमधील तब्बल 1500 लोकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी ज्यांचा दहशतवादी कारवायांशी संबंध आला होता किंवा जे संशयित आहेत, अशा लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या दहशतवाद्यांना ज्यांनी आश्रय दिला होता, त्यांचादेखील शोध सुरक्षा एजन्सीकडून सुरू आहे. दहशतवादी कारवाया मागील स्लिपर सेलचा देखील शोध सुरू आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये बंद
या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काल जम्मू – काश्मीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. पहिल्यांदाच जम्मू – काश्मीरमध्ये असे चित्र दिसून आले असून काश्मीर खोऱ्यातील अनेक भागांमध्ये या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भारताने घेतलेले पाच निर्णय
पाक दिल्ली दूतावास कर्मचारी कपात
48 तासांत पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा
सिंधू जल करार स्थगित अटारी बॉर्डर बंद
पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला भारतातील व्हिसा रद्द
हल्ल्यात पाचजणांचा सहभाग
सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांनी पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केले आहेत. त्यांची नावे आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा असल्याचे सांगण्यात आले आहे. गुप्तचर सूत्रांनी सांगितले की, हल्ल्याचा मास्टरमाइंड लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्ला खालिद आहे, जो पाकिस्तानात उपस्थित आहे. प्राथमिक तपासात या हल्ल्यात 5 दहशतवादी सहभागी असल्याचे समोर आले आहे. यापैकी दोन स्थानिक आणि तीन पाकिस्तानी दहशतवादी होते.
जवानांना पर्यटक
समजले दहशतवादी
पहलगाम हल्ल्यानंतर, जेव्हा भारतीय लष्कराचे जवान बैसरन खोऱ्यात पोहोचले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या पर्यटकांनी त्यांना दहशतवादी समजले. कारण गोळीबार करणारे दहशतवादीही गणवेशात होते. सैनिकांना पाहून महिला आणि मुले हात जोडून रडू लागली. यानंतर सैनिकांनी सांगितले की आम्ही भारतीय सैन्यात आहोत. त्यांनी पर्यटकांना सुरक्षिततेची हमी दिली.
मास्टरमाइंड सैफुल्ला खालिद
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला खालिद असल्याचे सूत्रांनी सांगितले. या हल्ल्याचा कट पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधून रचला गेला. त्याचे स्थान रावळकोट असल्याचे सांगितले जाते. सैफुल्लाहने महिन्याभरापूर्वीच हल्ल्याचा इशारा दिला होता. 2019 मधील याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये सैफुल्लाह याने काश्मीर प्रश्न थंड होऊ देऊ नये असे म्हटले होते. त्याला सैफुल्लाह कसुरी म्हणूनही ओळखले जाते. सैफुल्लाह हा लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख आहे. तो लष्करचा संस्थापक दहशतवादी हाफिज सईदचा खूप जवळचा मानला जातो.