राज्यातील खाण बंदीमुळे गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात खाण अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना पर्यायी रोजगाराची संधी उपलब्ध करण्याची गरज आहे, अशी मागणी एनएसयूआय या कॉंग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटनेने पत्रकार परिषदेत काल केली.
गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातून दरवर्षी ७० विद्यार्थी खाण अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करतात. गतवर्षी २०१७ मध्ये अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या एकाही विद्यार्थ्याला खाणीवर रोजगार मिळाला नाही. मागील तीन वर्षात केवळ १० टक्के जणांना खाणीवर रोजगार मिळाला, अशी माहिती एसएसयूआयचे राज्य अध्यक्ष अहराज मुल्ला यांनी दिली.
तसेच खाणीवर बी.कॉम, एम.कॉम., बी.बी.ए.चे शिक्षण घेतलेल्यांना रोजगार उपलब्ध होतो. खाण बंदीमुळे रोजगाराची समस्या वाढणार आहे. राज्य सरकारने रोजगार निर्मितीच्या प्रश्नाकडे गंभीरपणे लक्ष द्यावा, अशी मागणी मुल्ला यांनी केली.