- रमेश सावईकर
गोव्याच्या नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होत चाललाय. ही आपत्ती नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे हे स्पष्ट आहे. वाढते भू-उत्खनन, जलसंपत्तीचा ऱ्हास, राने-वने नष्ट करण्याचे सत्र, यामुळे वन-जल-भू संपत्तीवर भले मोठे संकट ओढवले आहे. आधुनिकीकरणाच्या व विकासाच्या नावाखाली आम्ही निसर्गावर घाला घातल्याने त्याचा विपरीत व मारक परिणाम पर्यावरणावर झाला आहे. आपण वेळीच सावध व्हायला हवे!
विसाव्या शतकातील मुक्तीपूर्व गोवा आणि आजचा एकविसाव्या शतकातील गोवा याची तुलना करता हा प्रदेश आपले नैसर्गिक सौंदर्य हरवत चालल्याचे प्रतीत होते. कवी बा. भ. बोरकरांनी वर्णन केलेला गोवा त्यांच्या ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ या कवितेतून शब्दरूपाने अनुभवता येत होता, कारण तो प्रत्यक्षात होताही तसाच! पण आजचा गोवा पाहता बाकीबाब हयात असते तर त्यांना त्यांच्याच कवितेचे विडंबन करून दुसरी कविता लिहावी लागली असती.
त्याकाळी गोवा हे भारताचे दुसरे काश्मीर आहे असे म्हणण्याइतपत या प्रदेशाचे सौंदर्य मानवीमनाला भुरळ पाडणारे होते. पोर्तुगीजांनी गोव्यावर साडेतीनशे वर्षे राज्य केले. त्या काळात त्यांनी हिंदूंचे सक्तीने धर्मांतर केले, गोव्यातील हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करून त्यांचा छळ केला ही गोष्ट खरीच आहे. परंतु गोव्याचे सौंदर्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. उलट झाडांची लागवड करणे आणि वनसंपत्तीचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला, हे सत्य नाकारता येणार नाही.
गोव्याच्या नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होत चाललाय, त्यामुळे नैसर्गिक सौंदर्य धोक्यात येत चाललेय. ही आपत्ती नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. वाढते भू-उत्खनन, जलसंपत्तीचा ऱ्हास, राने-वने नष्ट करण्याचे सत्र, यामुळे वन-जल-भू संपत्तीवर भले मोठे संकट ओढवले आहे. नैसर्गिक संपत्तीवर आधुनिकीकरणाच्या व विकासाच्या नावाखाली आम्ही घाला घातल्याने त्याचा विपरीत व मारक परिणाम पर्यावरणावर झाला आहे. पर्यावरण संतुलन बिघडत चालल्याने त्याचा परिणाम हवामान, ऋतुमान, मानव-वन्यप्राणी जीवनावर झालेला आहे. यास आपणच जबाबदार आहोत. फक्त जबाबदारीचे खापर एकटा दुसऱ्यावर फोडून मोकळा होतोय, एवढाच फरक आहे!
लोकसंख्या वाढ, नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास, वाढते प्रदूषण यामुळे वसुंधरेचे तापमान वाढत चालले आहे. गोव्याची परिस्थिती तर भयानक अवस्थेतून पुढे जात आहे. पर्यटन व्यवसाय व खाण व्यवसाय म्हणजे गोव्याचा आर्थिक कणा आहे असे आवर्जून सांगितले जाते. पण ही सबब फजूल व धादांत दिशाभूल करणारी आहे.
पर्यटन व्यवसायाला गती देण्याचे निमित्त साधून जे धोरण गोमंतकीयांनी स्वीकारले आणि अंमलबजावणीत आणले त्यापासून अनेक गैरव्यवहारांना उत्तेजन मिळाले. पर्यटनामुळे गोव्याची जी खरी हिंदू सनातन संस्कृती आहे तिचे संवर्धन नाहीच; उलट ती नष्ट होण्याकडे कल वाढला आहे. जागतिक स्तरावर गोव्याची प्रतिमा खा, प्या आणि मजा करण्याचे उत्तम ठिकाण अशी बनली आहे. पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांचे आकर्षण अधिक. त्याचा फायदा उठवीत श्रीमंत होण्याचे उद्दिष्ट ठेवून ‘शॅक्स’ उभारणे, पार्लर खोलून तिथे मसाजच्या नावाखाली अनैतिक व्यवसायाला अप्रत्यक्ष प्रोत्साहन देणे, ड्रग्स म्हणजे अमली पदार्थांचा व्यवसाय पर्यटक करतात नि गोव्याची तरुणपिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडून जीवन उद्ध्वस्त करून घेत आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु पर्यटन व्यवसाय टिकला तरच गोव्याचे उत्पन्न वाढेल अशी लोकांना गोड समजूत करून दिली जात आहे. यातून अनैतिक कृत्ये वाढीस लागली आहेत. अगदी क्षुल्लक न्यायासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे लोकांना भाग पडत आहे. ही परिस्थिती घातक अन् विदारक आहे.
साधारणतः गेल्या पन्नास वर्षांपूर्वी गोव्यातील कोलवा, कलंगुट, मिरामार किनाऱ्यांवर फिरायला गेल्यावर तेथील नाजूक-साजूक रेतीचा हळुवार स्पर्श पावलांना व्हायचा. फेसाळत्या लाटांचे तांडवनृत्य, शरीराचा थकवा घालविणारा थंडगार वारा अनुभवताना वेळ कशी निसटून जायची कळत नसे. मात्र आताचे चित्र फार वेगळे आहे. मऊशार वाळूच्या कणात ढीगभर काचांचा थर, त्यामुळे किनाऱ्यालगत अनवाणी चालणे सोडाच, चप्पल-बुटांत चालणाऱ्यांच्या पायांना काचांमुळे जखमा होण्याचीच भीती अधिक. स्वतःला भिकारी म्हणविणाऱ्या मुलांचा घोळका तुम्हाला गराडाच घालतो. इकडे-तिकडे नजर टाकावी तर उघडे-नागडे हिप्पी लोक ‘सनबाथ’ घेताना दृष्टीस पडतात. हे आपल्या मुलांना दाखविण्यासाठी समुद्रकिनाऱ्यांवर पालक कसे काय घेऊन जाऊ शकणार? अशी विचित्र परिस्थिती आहे.
तांबडी-सुर्ला येथील कदंबकालीन महादेव मंदिर हा शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना, आजूबाजूचा परिसर निसर्गसौंदर्याने प्रसन्न करणारा असे दृश्य 1970-80 च्या दरम्यान अनुभवास येत होते. पण आता पर्यटनस्थळ म्हणून तथाकथित विकासाने ‘नको तिथे जाणे!’ होते अशी सद्यस्थिती आहे. आता आणि म्हणे ग्रामीण भागातूनसुद्धा पर्यटनाला वाव देण्याचा मानस आहे. म्हणजे मग गोमंतकीयांना निसर्गाच्या सान्निध्यात श्वास घ्यायला, मनाला शांती-समाधान मिळवण्याला आता ठिकाणेच राहणार नाहीत. वनसंपत्ती लुटण्याच्या प्रकाराने राने-वने ओसाड झालीत. डोंगर नागडे झालेत. वन्यप्राण्यांचे अधिवास उद्ध्वस्त करण्याचे दुष्कृत्य मानवजातीने केल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीत घुसत आहेत. हे संकट मानवाने स्वतःच ओढवून घेतले आहे. वन्यप्राण्यांनी जावे- राहावे तरी कोठे?
वनसंपत्ती नष्ट होत असल्याने त्याचा आपसूक परिणाम जलस्रोतांवर झाला आहे. विहिरी पाण्याविना, नदी पाण्याच्या प्रवाहाविना, तळी-झऱ्याचे ना संवर्धन, त्यामुळे नळाला पाणी आले तर ठीक, नाहीतर नळ कोरडे नि माणसांचे घसेही कोरडे हा नित्याचाच अनुभव.
हवा, पाणी, भूमी प्रदूषणयुक्त. श्वास घ्यायलासुद्धा हवा नाही, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही आणि खाण्यासाठी शुद्ध अन्न नाही. मग सांगा, जगायचे कसे?
गोव्यात वाहनांची संख्या भरमसाठ वाढली आहे. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात 13 लाखांहून जास्त वाहने आहेत. डिझेल, पेट्रोलवर चालणारी अधिक. त्यामुळे हवेत कार्बन मोनोक्साईड मिसळण्याचे प्रमाण जास्त. यामुळे हवेचे प्रदूषण वाढले आहे. खनिजपट्ट्यात तर ट्रकांची संख्या खूप. धूरविरहित शुद्ध हवाच नाही. त्यामुळे टी.बी., सायनस्सारख्या रोगांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे.
पर्यावरणप्रेमी लोक संपूर्ण जागतिक पातळीवर एकत्र येऊन पर्यावरण संतुलन-संवर्धनासाठी जागृती करण्याचे काम करतात. 22 एप्रिल हा ‘जागतिक वसुंधरा दिन’ म्हणून पाळला जातो. पृथ्वीच्या परिसंस्थेचे आणि तिच्या नात्याचे रक्षण करण्याकरिता जागृतीनिमित्त विविध उपक्रम राबविले जातात. 22 एप्रिल 1970 मध्ये पहिल्यांदा जागतिक वसुंधरा दिन पाळण्यात आला. 1992 साली संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकास परिषदेचा पाया रचला गेला. 2010 मध्ये 193 राष्ट्रांतील लोक पर्यावरण जागृती मोहिमेत सामील झाले. वाढते प्रदूषण, वन-जल-भू संपत्तीचा ऱ्हास, प्लास्किटचा अधिकाधिक वापर, त्यांची विल्हेवाट न लावल्याने होणारे प्रदूषण, प्राणीहत्या, हरित धोरणाकडे दुर्लक्ष यामुळे संपूर्ण जगातील मानव व प्राणीजातीवर महान संकट भविष्यात ओढवण्याचा धोका आहे.
जागतिक तापमानवाढीमुळे निसर्गाचा तोल ढळत चालला आहे. पर्यावरण संतुलन बिघडलंय. हरितगृह वायू (जीएचजी) तटस्थता साध्य करण्यासाठी उपाययोजना राबविणारे मोजकेच लोक आहेत. झाडे लावा, झाडे जगवा, भू-जल-वन संपत्तीचे संरक्षण नि संवर्धन करा, प्लास्टिकचा वापर कमी करा. कचऱ्याची विल्हेवाट लावा, प्रदूषणविरहितच उद्योग उभारा, प्राणीहत्येवर बंदी घाला, प्राण्यांना त्यांच्या निवासात राहण्याचे संरक्षण द्या, सर्व नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करा, त्यांना संरक्षण द्या अशी जागृतीची चळवळ तरुणपिढीमध्ये निर्माण करून निसर्गसंपत्ती- सौंदर्याला नवी ऊर्जा प्राप्त करून देण्याकरिता मानवजात पुढे जात राहिली तरच जगाचा निभाव येत्या भविष्यकाळात लागू शकेल हे जागतिक सत्य आहे! म्हणून ‘जो जे वांच्छील, तो ते लाहो प्राणीजात’ अशी स्थिती प्राप्त व्हायला हवी.