ओलिसांच्या सुटकेसाठी बीएलएकडून पाकला आज दिवस अखेरपर्यंत मुदत

0
3

जाफर एक्सप्रेसमधील 50 जणांना ठार मारल्याचा दावा

पाकिस्तानमधील अशांत अशा बलुचिस्तान प्रांतात फुटीरतावाद्यांनी सुमारे 450 प्रवाशांना घेऊन पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसवर हल्ला करून त्यातील शेकडो प्रवाशांचे मंगळवारी अपहरण केले होते. अपहरण कांडानंतरही पाकच्या कैदेत असलेल्या बलुचच्या राजकीय नेत्यांची व अन्य कैद्यांची सुटका न केल्याने बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) आता निर्वाणीचा इशारा दिला आहे. गुरुवार दिवसअखेरपर्यंत त्यांची सुटका न केल्यास ओलीस ठेवलेल्या पाकिस्तानी सैनिक व अन्य सुरक्षा दल कर्मचाऱ्यांना ठार मारू, असा इशारा बीएलएने दिला आहे.

बीएलएने 214 प्रवाशांना ओलीस ठेवले होते. त्यात प्रामुख्याने पाकच्या लष्करी जवानांचा समावेश आहे. त्यापैकी 50 जणांना ठार मारल्याचा बीएलएने केला आहे. दुसऱ्या बाजूला रेल्वेतील प्रवाशांची सुटका करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराचे प्रयत्न सुरू असून, काही प्रवाशांची सुटका करण्यात यश आले आहे. तसेच पाक लष्कराने केलेल्या कारवाईत आतापर्यंत 27 बंडखोरांना ठार केले.

काल या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या बलुचिस्तान लिबेरशन आर्मीने जाफर एक्स्प्रेसवरील हल्ल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या पहिल्या दृश्यात फुटरतावाद्यांनी रेल्वे रुळांवर स्फोट घडवून आणत जाफर एक्स्प्रेसला थांबण्यास भाग पाडल्याचे दिसत आहे. त्यानंतर बलुच लिबेरशन आर्मीच्या लोकांनी रेल्वेवर गोळीबार केला आणि व्हिडिओच्या शेवटी ते रेल्वेतील प्रवाशांना बाहेर काढून त्यांना ताब्यात घेत असल्याचे दिसत आहे.
पाकिस्तानातील क्वेट्टा आणि सिबी दरम्यान 100 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा बोलान बोगदा आहे. या दरम्यान 17 रेल्वेस्थानके आहेत. येथे आव्हानात्मक भूभागामुळे गाड्या अनेकदा मंदावतात. याचाच फायदा घेत मंगळवारी बलुचिस्तानमधील फुटीरतावाद्यांनी जाफर एक्स्प्रेसवर हल्ला करत प्रवाशांचे अपहरण केले होते.
या अपहरणकांडाच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी सुरक्षा दलांनी किमान 27 फुटीरतावाद्यांना ठार केले असून, 155 प्रवाशांची सुटका केली आहे. ह्या बचाव मोहिमेदरम्यान 37 प्रवासी जखमी झाले असून, त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ओलीस ठेवलेल्या प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात बीएलएने काही मागण्या केल्या आहेत. त्यात पाकिस्तानपासून स्वातंत्र्य द्या, ही प्रमुख मागणी केली आहे. तसेच बलुचिस्तानमध्ये ज्या सोन्याच्या खाणी व अन्य साधनसंपत्ती आहे, त्याचा उपयोग आमच्या प्रांताचा विकास करण्यासाठी केला जावा, अशीही मागणी बलुचिस्तानने केली आहे. याशिवाय बलुचिस्तानमध्ये पाकच्या कोणत्याही सुरक्षा एजन्सीचा प्रभाव नसावा, या प्रांतात सुरक्षा एजन्सीचा प्रतिनिधी नसावा, ही प्रमुख मागणी आहे. यासह चीन सरकारने बलुच प्रांतात सुरू केलेल्या सीपीईसी प्रकल्पावर बलुचिस्तानी लोक नाराज आहेत. या प्रकल्पाद्वारे बलुच प्रांतातील खनिजे लुटली जात असल्याचा येथील लोकांचा दावा आहे.