>> राज्यात गेल्या २४ तासांत सापडले केवळ १३८ रुग्ण; ७ जणांचा कोरोनाने घेतला बळी; सक्रिय रुग्णसंख्या २३१६ वर
तब्बल तीन महिन्यांनंतर प्रथमच राज्यात दीडशेपेक्षा कमी कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. गेल्या चोवीस तासांत नवीन केवळ १३८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी ३० मार्च रोजी दीडशेपेक्षा (१२७) कमी कोरोनाबाधित सापडले होते. त्यानंतर एप्रिलच्या सुरुवातीपासून कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रभाव वाढल्याने राज्यात सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत होती. दरम्यान, राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ३१६ पर्यंत खाली आली आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये ६ रुग्ण आणि उत्तर गोव्यातील खासगी इस्पितळात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या बळींच्या संख्येत घट होत असून, राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३ हजार ०४६ एवढी झाली आहे.
चोवीस तासांत १३८ रुग्ण
राज्यात गेल्या काही दिवसांत स्वॅबच्या नमुन्यांच्या तपासणीच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या चोवीस तासांत केवळ २४८७ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील १३८ नमुने कोरोनाबाधित आढळून आले. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६६ हजार २३६ एवढी झाली आहे.
फोंड्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण
फोंडा येथे सर्वाधिक (१५१) सक्रिय कोरोना रुग्ण आहेत, तर मडगावातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १२७ एवढी झाली आहे. राजधानी पणजी परिसरात १०२ रुग्ण, कांदोळी येथे ११५ रुग्ण, साखळी येथे १२८ रुग्ण, काणकोण येथे ११४ सक्रिय रुग्ण आहेत. इतर भागांतील सक्रिय रुग्णांची संख्या शंभरपेक्षा कमी आहे.
३२ जण इस्पितळांत दाखल
राज्यातील इस्पितळांत दाखल करण्यात येणार्या रुग्णांची संख्या बरीच कमी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत नव्या ३२ रुग्णांना इस्पितळांत दाखल करण्यात आले आहे.
३२६ जण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनामुक्त होणार्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. काल आणखी ३२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत, तर चोवीस तासांत इस्पितळांमधून ३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बर्या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६० हजार ८७४ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७७ टक्के एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन १०६ रुग्णांनी गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे.