जगातील आठव्या क्रमांकावरील आणि आशियातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ‘अँटिलिया’ ह्या सत्तावीस मजली आलिशान निवासस्थानापासून पाच – सहाशे मीटरवर गेल्या पंचवीस फेब्रुवारीला आढळलेल्या हिरव्या स्कॉर्पिओ जीपचा मालक हिरेन मनसुख काल कळवा खाडीत मृतावस्थेत आढळला. वरवर पाहता हा मृत्यू संशयास्पद वाटत असला तरी त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, ह्या मृत्यूमुळे सदर धमकी प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे.
गेल्या पंचवीस फेब्रुवारीला ‘अँटिलियापासून’ जवळ ही बेवारस जीप आढळताच सिक्युरिटी मॅनेजरने पोलिसांना कळवले. पोलिसांना त्यात वीस – पंचवीस जिलेटिन कांड्या मिळाल्या, काही वाहनांच्या नंबरप्लेट मिळाल्या आणि धमकीचे एक पत्रही मिळाले. गाडीतील स्फोटकांमुळे व ह्या प्लेट अंबानींच्या सुरक्षा ताफ्यातील वाहनांच्या क्रमांकांच्या असल्याने ह्या प्रकरणाला विलक्षण गांभीर्य प्राप्त झाले. ‘हा केवळ ट्रेलर आहे, आम्हाला बिटकॉइनच्या माध्यमातून पैसे हस्तांतरित करणार नसाल तर आपल्या मुलांच्या वाहनाला आमचे वाहन धडकेल’ अशी कोणाच्याही मनात धडकी भरवील अशी धमकी त्या पत्रात देण्यात आली होती. जैश उल हिंद ह्या संघटनेने टेलिग्रामवरून संदेश प्रसारित करून ह्याची जबाबदारी घेत असल्याचेही जाहीर केले. ह्या सगळ्या घटनाक्रमामुळे हा दहशतवादी संघटनेकडून केला गेलेला खंडणीचा प्रकार असावा असा संशय बळावला होता. परंतु नंतर जैश उल हिंदने आम्ही काफिरांकडून पैसे घेत नाही म्हणत आमचा ह्याच्याशी काहीही संबंध नाही असे स्पष्टीकरण दिल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
स्कॉर्पिओ तेथे उभी करून एका इनोव्हा कारमधून पळ काढणार्या व्यक्तीचे दर्शन सीसीटीव्हीत घडले. चालक एका इनोव्हातून पळाला असे स्पष्ट झाले. पोलिसांनी जीप मालकाचा शोध चालवला आणि हिरेन मनसुख ह्या कार डेकॉर आस्थापनाच्या मालकापर्यंत ते पोहोचले. आपली ही जीप वर्षभर बंदच होती. ती विकण्यासाठी घेऊन चाललो असता वाटेत बंद पडली. नंतर आपण तिथे पुन्हा गेलो तर कार चोरीला गेली होती असे त्याने पोलिसांना सांगितले. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हा हिरेनच मृतावस्थेत सापडला आहे.
ही आत्महत्या पोलिसांच्या संशयाची सुई आपल्यावर वळल्याने केली गेली का, की ह्या प्रकरणासी जोडले गेल्याने झालेली सामाजिक अप्रतिष्ठा जिव्हारी लागल्याने ती केली गेली. किंवा खरोखरच एखादी दहशतवादी संघटना ह्यामागे आहे आणि तिने ह्या कारमालकाचा काटा काढला, ह्यातील सत्य शोधणे हे पोलिसांचे काम आहे. प्रथमदर्शनी तरी हा आत्महत्येचा प्रकार दिसतो. अंबानींना मिळालेल्या धमकीमागे काही दिवसांपूर्वी दिल्लीत इस्रायलच्या दूतावासापुढे बॉम्बस्फोट घडवणारी जैश उल हिंद नव्हती तर नेमके कोण होते? शेतकर्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही धमकी दिली गेली का, त्यामागे खलिस्तानवादी किंवा माओवादी आहेत का असे अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. अशावेळी हिरेन मनसुखच्या आत्महत्येमागचे कारण काय असावे हा नवा प्रश्न तपास यंत्रणांपुढे उभा झाला आहे. बिटकॉइन हस्तांतरणासाठी जो तपशील दिलेला होता तो खोटा असल्याचेही तपासयंत्रणेने शोधून काढलेले आहे. म्हणजेच ही धमकी खरोखरच दहशतवादी संघटनेने दिली होती का ह्याविषयी आता संशय निर्माण होतो. पुढील तपासात हा सगळा उलगडा होणे गरजेचे आहे. येथे प्रश्न कोण्या एका उद्योगपतीच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा नाही. मुंबईतील सर्वोच्च सुरक्षा असलेल्या एका विभागामध्ये स्फोटकांनी भरलेली एक कार भरदिवसा बिनदिक्कत ठेवली जाते आणि त्यामागील गूढ उकलले जाऊ शकत नसेल तर ते तपास यंत्रणांचे मोठे अपयश असेल.