संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून

0
3

12 ऑगस्टपर्यंत चालणार; ऑपरेशन सिंदूरवर चर्चा शक्य

संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी दिली. संसदेचे हे पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान असणार आहे. या अधिवेशनाच्या काळात संसदेच्या दोन्ही सभागृहात देशातील विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होणार असल्याची माहिती मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय कामकाज समितीने पावसाळी अधिवेशनाच्या संदर्भातील तारखांबाबत निर्णय घेतल्याचे मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.

एप्रिलमध्ये जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. अद्यापही भारत आणि पाकिस्तानमध्ये काही प्रमाणात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगाने विशेष सत्र घेण्याची मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, विशेष सत्र घेण्याबाबत केंद्र सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

आता संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून सुरू होणार असून, याच अधिवेशनादरम्यान ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होण्याची शक्यता आहे. याबाबत मंत्री किरेन रिजिजू यांनी संकेत दिले आहेत. आम्ही ऑपरेशन सिंदूरसह सर्व मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याचे किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे.