शेळ-मेळावली आयआयटी प्रकल्प…‘भुतखांब’ तर होणार नाही ना?

0
295
  • डॉ. राजेंद्र रा. साखरदांडे
    (साखळी)

…… हीच प्रगती सरकारला सत्तरीत आणायची का? शैक्षणिक प्रगती आयआयटी आल्याने होणार का? तिथे काम मिळेल पण क्लास-४ वाल्यांना प्रोफेसरचे काम मिळेल का? बरे, शेळ-मेळावलीवाल्यांना, सत्तरीवासीयांना, गोवेकरी मुलांना प्रवेश मिळणार का? नाही. सर्वकाही मेरीटवर पास झालेल्या भारतातील कुठल्याही मुलांना प्रवेश मिळेल व ज्याच्याजवळ लाखो रुपये असतील त्यांना….

गोव्यात घडलेली भयानक घटना- सावईवेरेचा नायलॉन प्रकल्प… शांततेने चाललेली चळवळ एकदम भयानक झाली… मानवी भावनेचा झालेला हलकल्लोळ … त्याचा उद्रेक ज्वालामुखीत झाला. नायलॉन ७७ प्रकल्प कंपनीला गुंडाळावा लागला. गोवा सरकार दोन पावले मागे, पाठीमागे सरकले… परत भुतखांब नंबर २ येणार का?
शेळ-मेळावलीचा आयआयटीचा शैक्षणिक प्रकल्प व तिथल्या लोकांनी केलेला विरोध, त्यात आता ठिणगी पडायला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक जागी या प्रकल्पाला विरोध झालेला आहे. सरकार याला शैक्षणिक प्रकल्प म्हणताहेत तर शेळ-मेळावलीचे लोक याला ‘‘मेगा प्रोजेक्ट’’ म्हणून समजतात.

सरकारने या मेगा-प्रोजेक्टविषयी काहीही स्पष्ट असे कधी सांगितलेच नाही. सर्वकाही जणू रिलायन्सचा ‘हिडन’ अजेंडाच आहे. वरवर सगळे सोपे… सोपे.. सरळ. शैक्षणिक प्रकल्प असेच भासवले जाते… पण हे तेवढे सरळ सोपे नाही.
सत्तरी तशी कुणी बघितली नाहीच. मी तिथे ८-९ वर्षे राहिलो. सत्तरीच्या कानाकोपर्‍यातून फिरलो. तिथल्या लोकांना मी भेटलो. तिथले नेते लोक माझे मित्रही झाले. सत्तरीतील कितीतरी ‘‘शेळ-मेळावली’’ला गेलेच नाही. सिनियर राजेच्या काळात सत्तरीचा विस्तार व कायापालट झाले. गावागावांत शंभर- पन्नास घरांकडे जाणारे रस्ते झाले… कदंब बसेस धावू लागल्या. घावें – नगरगाव गावांत ती कदंब व एसटी धावायला लागल्या तसा हा गाव ‘‘शेळ-मेलावली’’|
तुम्हाला आठवतेय तर बघा.. ज्या जमिनीत ‘आय.टी.आय.’ येऊ पाहात आहे तिथे २००८ साली होंडातला ‘एसीजीएल’ प्रोजेक्ट येऊ बघत होता. .. तेव्हाही तिथल्या गोवेकरांनी विरोधच केला होता… व आज १२ वर्षानंतर परत हीच जागा गोवा सरकारच्या डोळ्यात खुपत आहे. कां? असे इथे काय आहे? याचे उत्तर शोधावे लागेल. गोवेकर एकत्र येताहेत… आलेत. गोवेकर अशिक्षित राहिले नाहीत. हळूहळू त्यांनाही कळतेय. येवढेच त्यांना ते कुणीतरी सांगायला हवेय व ते कुणीतरी सापडलेत. यात एक गोष्ट स्पष्ट आहे व ती म्हणजे यात बिलकुल पक्षीय राजकारण नाही, याची ग्वाही त्या चळवळीचे नेते लोक देताहेत. गोवेकर एकजुट झालेले आहेत. या चळवळीचे नाव त्यांनी ‘‘सेळ-मेळावली पंचक्रोशी ग्राम बचाव आंदोलन’’ असे ठेवलेले आहे.

आता हा गाव कसा आहे.. ज्या जागेवर हा मेगा प्रोजेक्ट येत आहे… ती जागा कोणती व ह्या जागेत काय आहे??

  • ही जागा सरकारची आहे.
  • या जागेत त्या गावकर्‍यांनी बसवलेली घरे आहेत. कसलेल्या जमिनी आहेत.. कुळागरे आहेत… शेते आहेत. गावकर्‍यांकडे पाळीव जनावरे आहेत… माड, सोले, फणस, कोकम… कमवलेल्या जमिनी आहेत. पण कुणाहीकडे मालकी हक्क नाही. सगळेकाही ‘अल्वारा डॉक्युमेंट्‌स’.
    सरकार या ‘मेगा प्रोजेक्ट’करता २० लाख स्क्वेअर मीटर्स ही जागा व्यापू पाहते आहे. या जागेत गावच्या ‘जल्मी देवाचे पुरातन मंदिर आहे. गोवेकरांचा विरोध बघता सरकार आता १० लाख स्क्वेअर मीटरवर आले आहे. या ‘प्रकल्पा’विषयीची जाहीर ग्रामसभा अजूनपर्यंत झालेली नाही. हा विषय सुरू होऊन कितीतरी महिने झालेत, तरीदेखील या प्रकल्पाला ‘‘ग्रम पंचायत’’ची मान्यता नाही. जाहीर मागणी करूनही आजवर या विषयावर ग्रामसभा बोलवली गेली नाही. सरकार लोकांना या ‘मेगा प्रोजेक्ट’विषयी काहीही सांगत नाही. प्रोजेक्ट सुरू झाल्यावर हळूहळू तंबूत शिरलेला उंट हातपाय पसरायला लागणार व शेवट त्त्या्रब वर लाथ पडेल हे निश्‍चितच! प्रोजेक्टची ७०-८० घरे व इमारती बांधून झाल्यावर .. परिसर वाढत जाणार व मग हळुहलू हळुहळू आजुबाजूची आणखी जागा लागणारच.
    वाळपईत ‘‘नवोदय हायस्कूल’’चा परिसर १ लाख स्क्वे. मीटर जागेत बांधला गेला. ती जागाही ‘अल्वाराच’ जागा आहे. प्रकरण कोटीत आहे व तिथले जागा भोगणारे कोटीत जिंकण्याचा मार्गावर आहेत.

ते असो… ह्या जागेवर १६ लोकांचे नाव लागलेले होते. कदाचित २००८ साली उठाव झाल्यावर सरकार दरबारी त्यांची नावे खाली उतरवली गेलीत. आज त्यावर कुणाचेच नाव नाही. ही जागा फक्त सरकारचीच आहे. सगळेकाही प्लॅन करून चाललेय.
सरकार विरोध करणार्‍या गावकर्‍यांना त्याचे त्या जमिनीवरचे ‘कागदपत्र’ सादर करायला सांगताहेत. ह्यावर अशी माहिती निघते की गोवाभर जमिनीचे कागदपत्र फक्त पोर्तुगीज सरकारने बनवलेले आहेत, तेच देण्यात येत आहेत. म्हणजे गोवा सरकारने १९६१ साली स्वतंत्र झाल्यावरही आजवर त्या दिशेने काहीच केले नाही. मयेच्या गावकर्‍यांची चळवळ ही मालकीहक्का बद्दल होती. तसे झाले असते तर लोकांना त्यांची मालकीहक्काविषयीची कागदपत्रे मिळाली असती. कुठल्याही सरकारने याविषयी काहीही कार्यवाही केलेली नाही. तरीही जाणूनबुजून सरकार न दिलेल्या कागदपत्रांविषयीची विचारणा कशी करते?
किंचित मागे वळून बघू या….
या चळवळीत सुरुवातीला मोजकीच चार माणसे पुढे होती. उरलेल्या माणसांना काहीही पडले नव्हते. माहीतही नव्हते. गावात नेते मंडळीही नव्हती. सल्ला देणारे सत्तरीच्या बाकी महालातून आले, काही गोव्यातील, सत्तरीतील पर्यावरणी एकत्र आले. बैठका, कोपरा मिटिंग व्हायला लागल्या. लोकांना सगळे समजणे भाग होते.

या प्रोजेक्टची सत्तरीला गरज आहे का? हा प्रोजेक्ट याच गावात का? ह्या गावाच्या वसवलेल्या कसलेल्या जमिनीवरच का? विषय गावाचा नव्हता… विषय सत्तरीच्या लोकांचा नव्हता… विषय गोवेकरांचा होता. जागेचा मालकी हक्क हा विषय होता. बाब पुष्कळ पुढे गेली आहे.
गोवा सुंदर आहे. जंगल फक्त कमीच आहे. भारतातल्या प्रत्येक राज्यापेक्षा ही जंगल संपत्ती कमीच आहे. ह्या मागे ‘पुष्कळ कॉंक्रीट जमिनी’ वसवणारे महाभाग नरकासुर- बकासुरासारखे वखवखलेल्या तोंड पसरून राहिलेले देत उभे ठाकलेले आहेत व त्यात कोट्यांनी रुपयांनी माया जमवणारे आणखी कितीतरी कोटींची त्यात भर टाकू पाहात आहे.

आंदोलन चळवळ पसरते आहे. शेळ-मेळावलीचे लोक आज वाळपईच्या रस्त्यावर बसायला सुरुवात झालेली आहे. आपले घरचे काम सोडून घरातील गृहिणी बाहेर पडताहेत. ‘‘चले जाव’’च्या घोषणा निश्‍चितच स्वागतार्ह नाहीत. आपल्या जमिनीची कागदपत्रे मागताहेत. ‘‘मागील दारातून येणार्‍या प्रकल्पला त्यांनी ओळखलेय… त्याच्याबरोबर येणार्‍या संकटांना त्यांनी घेरलंय. आज राजकारणी लोक, सत्ताधारी मंत्री, गोव्याचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री चाट झालेत. ज्याचे भय वाटत नव्हते त्याचे रुपांतर, त्याचा वणवा होत चाललाय. हा वणवा सर्वांना जाळून टाकणार नाही ना? कुणाचेतरी वैयक्तिक नुकसान होणार हे निश्‍चित.

सालेलीचे क्रशर बद्दलचे सालेलीकरांचे आंदोलन सगळ्यांसमोर आहे. वर्षानुवर्षे होणारा सालेलकरी खाश्या बद्दलचा राग.. रोश त्या प्रकरणात बाहेर पडला. जनतेच्या भावनांचा उद्रेक झाला. डोंगरात क्रशरकडे गेलेला खा…चा जवान पोरगा गावकर्‍यांच्या उद्रेकापोटी दगडांनी मारला गेला. तसेच काही इथे घडणार नाही ना! ‘‘राजा रात्र काळी आहे… जागा रहा.’’
ढारढूर झोपलेला राजा जागा होतोय. काहीतरी घडतेय तेही गावकरी विचारपूर्वक पाय पुढे टाकताहेत… हेही त्यांना कळून चुकलेय…. सरकारी नेते मंडळींनी पाय पाठीमागे घ्यायला सुरुवात केलेली आहे.

आठवतेय तर बघा… मागे सत्तरीच्या सगळ्या पंचायतीच्या सरपंचांची बैठक झाली व त्यात मोठ्या व छोट्या खाश्याच्या मर्जीतील्या व ताब्यात सगळ्या सरपंचांनी ठराव पास केले… हा प्रश्‍न सत्तरीची चौफेर प्रगती करेल व हा प्रकल्प शैक्षणिक आहे… याने जगाच्या नकाशावर सत्तरीचे… गोव्याचे नाव होणार… टाळ्या वाजवा रे… सत्तरीवासी ढोल वाजवण्यात हुशार… ठोल ताशे घमाघम वाजायला लागले. शेळ-मेळावलीच्या लोकांनी गावात सभा घेतली. त्या सर्व सरपंचांचा समाचार घेतला. गावात या, बघा मग बोला… आमच्या गावात काय होणार… आमच्या गावाचा कायापालट होणार… उदरगत होणार. गावकरी सज्ज आहे. तुमचे गाव तुम्ही राखा… आमच्या गावात तुमची ढवळाढवळ नको. सगळ्या सत्तरीवासीयांना फतवे गेले… सगळे चूप बसले. नेते मंडळींना गावात यायचे सांगावे पाठवले गेले… गावात पाय ठेवायचे धारिष्ट्य दाखवले गेले नाही. धडक मोर्चे कुळणवर पोहोचले. मुख्यमंत्री गावात समजावयाला आले…. परत एकदा ‘‘चले जाव’’च्या घोषणांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत झाले. मान्यवरांनी काढता पाय घेतला.
परत एकदा गावकरी मंडळी ग्रामसभेची मागणी करू लागले… आजवर ग्रामसभा घेतली गेली नाही. गावकर्‍यांनी स्वतः गावांत आपली वेगळी ग्रामसभा बोलावली. कोविड काळातील भारतातील मोठी सभा व तीही ग्रामसभा गावांत झाली. निरनिराळे ठराव पास झाले… सरकारदरबारी पोचवले गेले. सरकार परत एकदा धृतराष्ट्रासारखे आंधळे झाले. त्यांना काही दिसत नव्हते.
आता मुद्द्याचे बोलू….

  • ही जागा इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये येते.
  • ही जागा बोंडला वाईल्ड फॉरेस्टच्या बफर झोनमध्ये येते.
  • महादयी, बोंडला, महावीर महाअभयारण्याच्या मध्ये येते.
  • तरीही सरकार त्याच जागेवर डोळा ठेवून आहे. का?
  • गावकरी म्हणतात, तुम्हाला हा ‘मेगा प्रोजेक्ट’ सत्तरीतच हवा… तर मग सत्तरीच्या डोंगराळ भागात बांधा. बंद झालेल्या खाणीच्या जमिनी ताब्यात घ्या व बांधा. हवे तर सत्तरीच्या जंगली भागात बांधा. पण ते नाही.
    राहता राहिला फक्त एक भाग… सत्तरीचा विकास… नेतेमंडळींचा ध्यास – सत्तरीचा विकास..!
    थोडे मागे चला…
    जी.आय.एम. सत्तरीच्या पर्येतील घोळ भागात आली… साखळी देसाईनगर व हाऊसिंग बोर्डच्या जवळ असलेल्या ह्या जागेवर राहणार्‍या धनगर लोकांना सरकारने हाकलून लावले… मोटे छोटे झालेत. आपल्याच बांधवांच्या मदतीला धावले नाही. राजेंद्र केरकरांनी आवाज उठवला तेव्हा कुठे त्यांना जागा दिली गेली.

जीआयएमने पर्ये गावची काहीच ‘उद्रगत’ केली नाही. पण साखळी गावाची प्रगती झाली. गावात या बड्या श्रीमंतीत लोळणार्‍या बेबंद पोरांची सोय करायची स्पर्धा लागली. त्यांच्याकरता सुखसोईंची ‘‘बार व रेस्टॉरेंट’ उबारली गेली. एसी बसवले गेले. आईस्क्रीमची दुकाने रात्री बारापर्यंत चालू राहिली. साखळीतल्या जीआयएमच्या डोंगराळ परिसरात जोडपी दिसायला लागली… चरस, गांज्याचा मुक्त संचार व्हायला लागला. जीआयएमची मुले गोळ्यांची प्रिस्क्रिप्शन मिळवायला साखळीतल्या डॉक्टरांकडे धावायला लागली… तिथली बिथरलेली पोरे बेधुंद होऊन गाड्यांनी राज्यातील बीच परिसरात मजा करू लागली… कुळणजवळ हणजुणेच्या कालव्यात नशेच्या धुंदीत त्यांची गाडीने लोटांगणे घातली… कुणीही दगावले नाही. पण साखळीची उदरगत झाली. आज कोविडमध्ये जीआयएम बंद झाले. डोक्यावर हात ठेवून बसलेत… सगळे काही स्तब्ध..!
हीच प्रगती सरकारला सत्तरीत आणायची का? शैक्षणिक प्रगती आयआयटी आल्याने होणार का? तिथे काम मिळेल पण क्लास-४ वाल्यांना प्रोफेसरचे काम मिळेल का? बरे, शेळ-मेळावलीवाल्यांना, सत्तरीवासीयांना, गोवेकरी मुलांना प्रवेश मिळणार का? नाही. सर्वकाही मेरीटवर पास झालेल्या भारतातील कुठल्याही मुलांना प्रवेश मिळेल व ज्याच्याजवळ लाखो रुपये असणार्‍यांना, कारण ते शिक्षण घ्यायला रुपये लागतात.

तेवढे आहेत… विचार करा. ही ती प्रगती आहे जी सत्तरीवासीयांची होणार?
तुटपुंज्या लाभासाठी केवढे मोठे नुकसान पुढच्या पिढीला वारसा म्हणून देणार याचा विचार करा.
साहेब लोकांनीही यावर परत एकदा फेरविचार करून निर्णय घ्यावा. गोव्याचा विकास करणार्‍यांनी दोन पावले मागे घ्यावीत. म्हणजे मग चार पावले पुढे निश्‍चितच घ्यायला मिळणार. प्रकरण शेकायच्या अगोदर काहीतरी शिका. नाहीतर नेते, मंत्री, मुख्यमंत्री झाले म्हणजे सर्वकाही झाले, असे वागू नका. लोकशाहीची कदर करा. राजा रात्र वैर्‍याची आहे.
मी एक डॉक्टर… आपल्याच डॉक्टरी विषयावर लिहिणारा… मग ह्या सामाजिक विषयावर लिहिण्याचे धारिष्ट्य केले. संपादकांची परवानगी घेऊन, डोळे फोडून, रात्र जागे राहून विविध लोकांची मते विचारून मी हा लेख लिहितोय.

ह्या विषयावरील व्यासंगी पर्यावरणी श्रीयुत् राजेंद्र केरकरजी, कथनात प्रामुख्याने भाग गेणारे वाळपईतील माजी आमदार व माझे मित्र अशोक परोबची ह्यांचे सुपुत्र श्री. विश्वेश प्रभू… यांचे आभार. विश्वेश पुढे मोठी प्रगती करणार हे निश्‍चित. सत्तरीतील विविध मुले आज वेगवेगळ्या विषयांत आपली ओळख दाखवत आहेत. पुढे येताहेत. सत्तरीवासीयांची व किंबहुना गोवेकरांविषयीची कळकळ त्यांना पुढे जाण्यास साह्य करील हे निश्‍चित.
‘‘शेळ- मेळावली पंचक्रोशी ग्राम बचाव आंदोलन’’च्या गावकर्‍यांना प्रणाम!!