वीज वितरणावर चीनच्या सायबर हल्ल्याचे पुरावे नाहीत

0
172

>> केंद्रीय वीजमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबईतील वीज वितरणावर चीनच्या सायबर हल्ल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचे काल केंद्र सरकारने स्पष्ट केले असून केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी मुंबईतील ‘पावर कट’ची घटना ही मानवी चूक असल्याचे सांगितले आहे.

चीनच्या सायबर हल्ल्याचा मुद्दा फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित नसून ते देशातही होऊ शकतो, असा इशारा महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला होता. मुंबईचा वीजपुरवठा खंडीत करण्यामागे चीन हॅकर्स असल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले होते. यानंतर सोमवारी यासंबंधी गृहमंत्रालयाने ऊर्जा विभागाला तपासाचा अहवाल दिला. यावेळी गृहमंत्री देशमुख यांनीही चिनी हॅकर्सने सायबर हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला. पण आता केंद्र सरकारने अशा कुठल्याही सायबर हल्ल्याचे पुरावे नसल्याचे म्हटले आहे.

केंद्रीय ऊर्जामंत्री सिंह यांनी, देशातल्या उत्तर आणि दक्षिण भागातील वितरण केंद्रांवर हल्ले झाले होते. पण मॉलवेअर आपल्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये पोहोचू शकले नसल्याचे सांगितले. तसेच हा सायबर हल्ला चीन किंवा पाकिस्तानने केल्याचे आपल्याकडे कोणतेही पुरावे नसल्याचे सिंह म्हणाले.

गेल्या वर्षी १२ ऑक्टोबरला मुंबईचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मुंबईचा जवळपास १० ते १२ तास वीजपुरवठा ठप्प होता. चिनी हॅकर्सनी सायबर हल्ला करून हा वीजपुरवठा खंडित केला होता, असे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले होते. गलवानमधील भार-चीन सैनिकांमधील रक्तरंजित संघर्षानंतर हा हल्ला केला गेला, असेही या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे उद्या या प्रकरणाचा तपास अहवाल विधिमंडळात सादर करणार आहेत.