राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाला तर ९२ जण बाधित सापडले आहेत. तसेच गेल्या चोवीस तासांत ७१ जण कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली असून ती ९५० एवढी झाली आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता ३१९१वर पोहोचली आहे.
गेल्या चोवीस तासांत राज्यात ५४९० जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,७३,५२६ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६१ टक्क्यांवर खाली आले आहे. इस्पितळांतून काल ८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
चोवीस तासांत ७१ कोरोनामुक्त
गेल्या चोवीस तासांत कोरोनामुक्त झालेल्याची संख्या ७१ असून सध्या राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,६९,३८५ एवढी झाली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. तसेच काल नव्याने इस्पितळात ९ जणांना भरती करण्यात आले.
काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने ८३ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला.
सध्या राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मडगाव व पणजी येथे असून त्यांची संख्या प्रत्येकी ६७ आहे. कासावलीत ५३, बेतकी येथे ५० रुग्ण इतर ठिकाणी ५० पेक्षा कमी रुग्ण आहेत. तर मयेत रुग्णसंख्या शून्यावर आली आहे.
आतापर्यंत इस्पितळात उपचार घेतलेल्यांची संख्या २८,९८४ एवढी असून गृहविलिनीकरणात राहिलेल्यांची संख्या १,२१०६५ एवढी आहे. राज्यात आतापर्यंत ११,८३,५३० एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.