- डॉ. मनाली महेश पवार
मुले काय खातात हे तेवढेच महत्त्वाचे आहे. जंक फूड, फास्ट फूड, बेकरी प्रोडक्ट या गोष्टी आहाराचा भाग असू नयेत. त्याने भूक लागल्यासारखी होते पण पोषण होत नाही. त्यामुळे मुलांचे आरोग्य टिकवण्यासाठी व मुलांना घडविण्यासाठी मुलांच्या सवयी बदलण्याची नितांत गरज आहे.
मे महिन्याची सुट्टी म्हणजे मामा-आत्याकडे राहायला जाणे, लग्नसमारंभाच्या निमित्ताने नातेवाइकांच्या घरी जाणे, हिंडणे-फिरणे, रानमेवा खाणे- कैरी, आंबे, काजू, जांभळं, करवंदं वगैरे. तसेच भरपूर गोष्टीची पुस्तकं वाचणे, उन्हातान्हात फिरणे-खेळणे… ना ॲलर्जी, ना डिहायड्रेशन; ना कसले क्लास ना प्रोजेक्ट… पूर्ण वर्षभर अभ्यास करायचा आणि मे महिना मजेत घालवायचा. ना ताण, ना टेंशन!
आज घराघरांत चित्र एकच- प्रत्येकाच्या हातात मोबाईल. अगदी मूल जन्माला आल्यापासून काहीजण गाणं-मंत्र मोबाईलवर लावून देतात, इथपासून त्यांची मोबाईलशी जवळीक होते. स्क्रीन टाईम वाढला- वाचनाचा टाईम कमी झाला. स्क्रीन टाईम वाढला आणि खेळण्याचा टाईम नगण्यच झाला. स्क्रीन टाईमचा खाण्यावरदेखील तेवढाच परिणाम झाला. आहार-विहार, आचार-विचार, ताण-तणाव यांतून एकंदरीत मुलांच्या सवयींचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. मुलं निरोगी-तंदुरुस्त नसून मशीन बनत चालली आहेत. आज संस्कारवर्गसुद्धा मुलांना पैसे भरून घ्यावे लागतात. यावर प्रत्येक पालकाने नाही तर प्रत्येकानेच विचार-विनिमय करणे गरजेचे आहे.
मुलं सतत व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टा इत्यादींवर असतात. कधी पाहावं तेव्हा वेळ मिळाला की मुलं लोळत पडलेली हातात मोबाईल घेऊन दिसतात. मित्र-मैत्रिणींबरोबर मिसळत नाहीत. नीट जेवत नाहीत. फक्त फास्ट फूडच खातात. लवकर झोपत नाहीत. घरातल्यांशी नीट बोलत नाहीत. नेहमी चीडचीड करतात. बहुतेक घरांतून अशा या तक्रारी वाढत चालल्या आहेत. या नुसत्या तक्रारी नाहीत, ही आजारपणाचीच लक्षणे आहेत. नवनवीन आजार उत्पत्तीची ही जणू नांदीच आहे.
मुले तनाने व मनानेही दुरुस्त असावीत. गुटगुटीत मुलं ही नेहमी निरोगी-तंदुरुस्त असतातच असे नाही. उंचीच्या प्रमाणापेक्षा मूल जाड असेल तर ते शक्तिवान नसतेच. त्या मुलाचे कुपोषण सुरू असल्याची ती लक्षणे आहेत असे समजावे.
मूल नीट जेवत नाही ही तक्रार करण्याआधी ते फास्ट फूड, पॅकॅटबंद पदार्थ किती खाते ते पाहावे. त्याचप्रमाणे मुलाचा स्क्रीन टाईम किती आहे तेही पाहावे. मुलाची हालचाल किती व झोप किती हेही पाहावे.
मूल वयाप्रमाणे वाढायला हवे. त्याला भूक लागायला हवी व भूक लागल्यावरच खाण्याची सवय असायला हवी. अभ्यासाबरोबर मुलांनी पळण्याचे खेळ भरपूर खेळावेत. त्यांना शांत व पुरेशी झोप मिळते का? घर व शाळा यांतील अंतर किती? प्रत्येकालाच चांगली शाळा-कॉलेज हवे म्हणजे नेमके काय हवे? हे पालकांनी पाहायला हवे.
जर मूल अशक्त किंवा खुरटलेले दिसत असेल तर ते वेळच्या वेळी खात नाही. फास्टफूड अधिक खाते. स्थूल असेल तर खेळण्याऐवजी त्याला लोळणे पसंत असेल. यातून वारंवार आजारी पडत असेल तर ते मूल ‘ना-दुरुस्त’ समजायला हरकत नाही.
- मुले आपसूक वाढतात. पण त्यांच्या शारीरिक व मानसिक वाढीची स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये असतात. त्यामुळे मुलांचे संगोपन डोळसपणे करावे लागते. मूल वाढवणे ही सोपी गोष्ट नाही. आज मुलांना घडवायचे असेल तर आधी पालकांनी स्वतःला घडवायला हवे. काही सवयी कुटुंब म्हणून प्रत्येकाने स्वतःला लावून घेतल्या पाहिजेत.
- प्रत्येक महिन्याच्या 1 तारीखला प्रत्येकाने आरशासमोर उभं राहून स्वतःला न्याहाळावे. चेहरा तुकतुकीत असेल, लाल असेल म्हणजे डोळे आतून लाल, नखे लाल असल्यास स्वतःला तंदुरुस्त समजावे. ज्यांचे चेहरे पांढुरके, फिकट, निस्तेज दिसतील, अशक्तपणा वाटत असेल त्यांची ॲनेमियाकडे जाण्याची वाटचाल सुरू आहे असे समजावे. अशा लहान-थोरांनी दर सहा महिन्यांनी जंताचे औषध घ्यावे. अधिकच थकवा जाणवत असेल तर वैद्याचा सल्ला घ्यावा.
- वारंवार जीभ फुटते व तोंड येते किंवा ओठांच्या कडा फाटतात तर ‘ब’ जीवनसत्त्वाची कमतरता आहे असे समजावे.
- बोटांच्या सांध्यांचा रंग मागच्या बाजूने काळपट गडद झाला असेल तर फॉलिक ॲसिडचा अभाव समजावा.
- पालेभाज्या, वेगवेगळ्या कोशिंबिरी, हंगामी फळे रोज खाण्याने ही लक्षणे दूर होतात.
- आपण जे खातो त्याचा आहाररस तयार होतो व या आहाररसातून रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र आदी धातू तयार होतात. म्हणजेच एकूण आपण जे खातो त्यापासून आपले शरीर बनते. जसा आहार तसे आपले शरीर. अन्न हे शरीराच्या पोषणाकरिता आहे. त्यामुळे गरजेपेक्षा कमी खाण्याने किंवा अति खाण्यानेही शरीराचे कुपोषण होते.
- वाढत्या वयात शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रथिने, उष्मांक, लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे अशा सर्व घटकांची गरज असते. ज्यांना या गोष्टी पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते व सर्दी-खोकल्याचे, जुलाबाचे आजार त्यांना वारंवार सतावतात.
मुले वाढत असताना त्यांनी खूप खेळावे, नाचावे, उड्या माराव्या आणि आपल्या ऊर्जेचा पुरेपूर वापर करावा. अभ्यासातदेखील ऊर्जेची गरज असते. या ऊर्जेसाठी मुलांना प्रथिने आणि उष्मांकाचा अनिर्बंध पुरवठा व्हायला हवा. शाळेत दर दोन-अडीच तासांच्या अंतराने असलेल्या मधल्या सुट्टीचे प्रयोजन हेच आहे. मधल्या सुट्टीत खाल्लेला डबा मुलांना पुढचे अडीच तास सतर्क ठेवतो. सरकारने माध्यान्ह आहाराचे जे प्रयोजन केले आहे त्यात चौरस आहाराचा विचार व्हायला हवा.
त्यामुळे मुलांना चौरस आहार मिळावा यासाठी शाळेत जाताना मुलांचा डबा विचारपूर्वक तयार करायला हवा. सगळ्या गोष्टी एकाच वेळी देता येणार नाहीत, म्हणून आठवड्याच्या डब्याचे नियोजन हवे. मुलांच्या हातात चिप्सची पाकिटे देण्यापेक्षा त्यांच्या खिशात शे-दीडशे ग्रॅम शेंगदाणे द्या. हे शेंगदाणे त्यांना सतत ऊर्जा देत राहणार.
पालकांचे मुलांकडे लक्ष असले पाहिजे. केवळ कौतुक करू नये तर शाबासकीबरोबर त्यांच्या सवयी सुधाराव्यात, यासाठीही प्रयत्न करावेत.
मूलांप्रति पालकांची भूमिका - ‘लवकर निजे, लवकर उठे’ हे सूत्र कायम लक्षात ठेवावे. आपल्या मुलाला झोप पूर्ण झाल्यानंतर ताजेतवाने वाटते का? किंवा आपल्या मुलाची झोप पूर्ण होते का? हे पालकांनी पाहावे. सूर्योदयानंतरची झोप ही खरी झोप नसते. त्यामुळे मुलांनी रात्री कमीत कमी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत झोपण्याची सवय लावावी म्हणजे सूर्योदयापूर्वी ते उठेल.
- मुलं वेळ झाली म्हणून खातात का खरीच भूक लागल्यावर खातात, याकडे पालकांनी लक्ष द्यावे. हल्ली मुलांचा पुरेसा व्यायाम, हालचाली नसल्याने त्यांना नैसर्गिकरीत्या भूक लागत नाही. त्यामुळे बळेबळे खाल्ले जाते, जे पचतही नाही. त्यामुळे अपचनाचा त्रास होणे, आहाररसाचे रक्तात रूपांतर होण्याऐवजी चरबीत रूपांतर होणे यासारखे प्रकार घडतात.
- मुले काय खातात हे तेवढेच महत्त्वाचे आहे. पोळी-भाजी, वरण-भात की फास्ट फूड, जंक फूड? जंक फूड, फास्ट फूड, बेकरी प्रोडक्ट इत्यादी आहाराचा भाग असू नये. त्याने भूक लागल्यासारखी होते पण पोषण होत नाही.
त्यामुळे मुलांचे आरोग्य टिकवण्यासाठी व मुलांना घडविण्यासाठी मुलांच्या सवयी बदलण्याची नितांत गरज आहे.