मारेला जहाजावरील ६६ गोमंतकीय खलाशी मुंबईला उतरले ः श्रीपाद

0
140

 

काही दिवसांपूर्वी मुंबईत आलेल्या मारेला डिस्कव्हरी’ या विदेशी जहाजावरील ६६ गोमंतकीय खलाशांना केंद्रिय गृहमंत्रालयाने बुधवारी परवानगी दिल्याने सर्व ६६ खलाशी काल तेथे उतरल्याचे उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रिय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले.

मारेला हे जहाज आज गुरूवारी युरोपला रवााना होणा असून त्यापूर्वीच सर्व सोपस्कार पूर्ण करून या जहाजावरील गोमंतकीयांना राज्यात परत आणावे अन्यथा त्यांना जहाजाबरोबर युरोपला जावे लागणार असल्याचे त्यांच्या  कुटुंबीयांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांना परत आणण्यासाठीचे सोपस्कार विनाविलंब पूर्ण केले जावेत अशी मागणी केंद्रीय मंत्री श्री. नाईक व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली होती.

राज्य सरकार तसेच श्रीपाद नाईक यांनी केंद्रिय गृहमंत्रालयाशी संपर्क साधल्यानंतर गृहमंत्रालयाने त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे काल वरील जहाजावरील ६६ खलाशांना मुंबई बंदरावर उतरता आले. आता महाराष्ट्र सरकारने त्यांना १४ दिवस सामाजिक विलगीकरणात ठेवल्यास त्यांना तेथे रहावे लागणार असल्याचे नाईक म्हणाले. नंतर गोव्यात येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा होणार असून राज्यात आल्यानंतरही येथे त्यांना सामाजिक विलगीकरणासाठी विशेष खोल्यांत ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, वेगवेगळ्या देशांत असलेल्या अन्य खलाशांचा देशात परतण्याचा मार्गही लवकरच मोकळा होणार असल्याचे श्री. नाईक म्हणाले.