पितृपक्षानंतरच मंत्रिमंडळात फेरबदल : सदानंद तानावडे

0
3

सध्या पितृपक्ष सुरू झालेला असून, त्यामुळे पुढील पंधरवड्यात राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना होण्याची शक्यता नसल्याचे प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांशी बोलताना काल स्पष्ट केले.

राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलांबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू असून, त्याबाबत काल तानावडे यांना पत्रकारांनी प्रश्नी विचारला होता. त्यावेळी पितृपक्षात मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली जाण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. पितृपक्षात अशा गोष्टी केल्या जात नाहीत. त्यामुळे मंत्रिमंडळाची फेररचना ही पितृपक्षानंतरच होईल, असे संकेत तानावडे यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्र्यांनीही आपणाकडे मंत्रिमंडळ फेररचनेचा विषय काढलेला नाही. पितृपक्ष असल्यामुळे त्यांनाही घाई नसावी, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

अन्य एका प्रश्नावर बोलताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व आपण प्रचारासाठी जाणार असल्याचे तानावडे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात गोव्यातून प्रचारासाठी किमान एक प्रमुख पदाधिकारी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.