भारतीय तटरक्षक दलाचे मत
गुजरातच्या पोरबंदर किनार्यानजीक पेटवून दिलेल्या संशयास्पद पाकिस्तानी जहाजावरील दिसून आलेले चौघेजण मच्छीमार वाटत नव्हते. त्यांच्याजवळ मच्छीमारी जाळीही नव्हती अशी प्रतिक्रिया भारतीय तटरक्षक दलाने व्यक्त केली आहे.गांधीनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना तटरक्षक दलाचे कमांडर कुलदीप सिंग शेओरन यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाकिस्तानचे सदर जहाज मच्छीमारी जहाज असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र भारतीय तटरक्षक दलाने पाठलाग केल्यानंतर ते उडवून देण्यात आले. काही वेळात ते बुडाले. अजूनही त्यावरील कर्मचार्यांचा व जहाजाच्या अवशेषांचा शोध घेण्याचे काम चालू आहे.
सदर जहाजावरील व्यक्ती दहशतवादी होते काय असे विचारले असता शेओरन यांनी या प्रकरणाचे तपासकाम भारताच्या विविध गुप्तचर यंत्रणा करीत असून या यंत्रणा सर्व बाजूंचा शोध लावेल, असे ते म्हणाले. शुक्रवारच्या घटनेनंतर गुजरातच्या संपूर्ण किनारपट्टीवर कसून टेहळणी चालू असल्याचेही त्यांनी सांगितले.