देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असा अंदाज भारतीय वेधशाळेने वर्तवला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन यंदा लवकर झाले आहे ही त्याचीच चाहुल आहे. एकीकडे देश उष्णतेच्या लाटेने होरपळत असताना अचानक अवकाळी पावसाने गोव्यापासून दिल्लीपर्यंत सर्वत्र दाणादाण उडवली. त्यातून सावरत असतानाच नैऋत्य मोसमी येऊन दाखल झाला. केरळमध्ये एक जूनच्या सुमारास दरवर्षी पाऊस येत असतो आणि गोव्यात तो चार ते पाच जूनच्या दरम्यान पोहोचत असतो. यंदा मात्र केरळमध्ये आठ दिवस आधी म्हणजे 24 मे रोजी मोसमी पाऊस दाखल झाला आणि बघता बघता गोव्यातही येऊन ठेपला. महाराष्ट्रात पाच जूनला पाऊस पोचत असतो. यंदा तो 25 मे रोजीच जाऊन ठेपला. मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावासाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस लवकर दाखल झाल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले. शेतांमध्ये पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्याचे पेरण्यांचे नियोजन ढासळले आहे. बागायतदारांच्या उभ्या पिकांचेही पावसाने मोठे नुकसान केले आहे. कांदा पिकाची वाताहत झाली आहे. एकीकडे शेतकऱ्यापुढे ही संकटे उभी ठाकली असताना शहरांमधून वेगळेच प्रश्न समोर आले. एफएमसीजी कंपन्यांचे नियोजन कोलमडले. उष्णतेच्या लाटेच्या अपेक्षेने आईसक्रीम आणि शीतपेयांची तडाखेबंद विक्री होईल ह्या अपेक्षित असलेल्या कंपन्यांना मोठा फटका बसला. पाऊस लवकर का आला ह्याचे उत्तर म्हणून भारतीय वेधशाळेने मेडन ज्युलियन ऑसिलेशन ह्या स्थितीकडे बोट दाखवले आहे. रोलंड मेडन आणि पॉल ज्युलियन यांनी 1971 साली संशोधिलेल्या ह्या हवामान स्थितीकडे त्यामुळे लक्ष वेधले गेले आहे. नैऋत्य मोसमी पाऊस गेल्यावर्षीही सरासरीपेक्षा अधिक झाला होता. यंदाही जर तो वेधशाळेच्या अंदाजाप्रमाणे सरासरीपेक्षा अधिक होणार असेल तर सलग दोन वर्षे त्याने ही मजल मारल्याचे स्पष्ट होईल. एरव्ही एल निनो आणि एल निनामुळे सरासरीपेक्षा पाऊस कमी होत असल्याने शेतकरी हवालदिल होत असतो. परंतु गेल्यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस झाल्याने गहू आदींचे विक्रमी पीक आले आहे. यंदाही अशाच प्रकारे खरीप आणि रबी हंगामात विक्रमी पीक होईल अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केलेली आहे. सन 2025 – 26 मध्ये 354 दशलक्ष टन धान्योत्पादन होईल अशी सरकारची अपेक्षा आहे. हवामानशास्त्र जसजसे प्रगत होत चालले आहे, तसतशी वेधशाळांच्या भाकितामध्ये अचूकता येऊ लागली आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांनाही मिळू लागला आहे. भारताने आता आपले स्वतःचे ‘भारत फोरकास्ट’ हे मॉडेल विकसित केले आहे. त्यानुसार आता अधिकाधिक स्थनिक भागासाठीचे हवामानविषयक अंदाज वर्तवता येऊ शकतील. आजवर प्रत्येकी बारा किलोमीटर क्षेत्राचे अंदाज आपली हवामान यंत्रणा वर्तवू शकत होती. आता रडारांची संख्या दुप्पट झाल्याने दर सहा कि. मी. क्षेत्रासाठीचे स्थानिक अंदाज वर्तवता येऊ शकतील असे नुकतेच केंद्रीय भूविज्ञान मंत्री जितेंद्रसिंग यांनी सांगितले आहे. शेतकरी, मच्छीमार यांना प्रत्यक्ष जमिनीवर ह्या हवामानविषयक नवतंत्रज्ञानाचा लाभ मिळाला पाहिजे. तर त्याच्या आधारे ते योग्य पूर्वनियोजन करू शकतील. जून ते सप्टेंबर ह्या काळात दरवर्षी होणाऱ्या पावसाच्या नोंदी ठेवण्यात आलेल्या आहेत. 1971 ते 2020 ह्या प्रदीर्घ काळातील नोंदींची सरासरी काढण्यात येते, जिला लाँग पिरिएड एव्हरेज म्हणजेच एलपीए संबोधले जाते. त्या सरासरीच्या तुलनेत दरवर्षी पाऊस जास्त होईल की कमी होईल ह्याचे अंदाज वर्तवले जातात. त्यामुळे यंदा एलपीएपेक्षा जास्त म्हणजे 106 टक्के पाऊस ह्या काळात होईल असे भारतीय हवामान विभागाचे म्हणणे आहे. गेल्या एप्रिल महिन्यात हवामान विभागाने यंदा सरासरीच्या 105 टक्के पाऊस होईल असे म्हटले होते. आता त्यांनी त्यात आणखी वाढ केलेली आहे. येत्या जून महिन्यातच आठ टक्के जास्त पाऊस हवामान विभागाला अपेक्षित आहे. मात्र, सध्या झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे सर्वत्र मोठे नुकसान झाले आहे. पाऊस जास्त होणे म्हणजे पिकांना जास्त पाणी मिळणे हे जरी खरे असले तरी तो बेभरवशाचा असल्याने कधी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला तर होत्याचे नव्हतेही होऊ शकते. देशातील 36 विभागांपैकी 31 विभागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असे हवामान विभाग म्हणतो आहे. ह्या अतिरिक्त पाण्याचा फायदा पिकांना व्हावा, उन्हाळ्यात वापरण्यासाठी जलाशयांमधील जलसाठवणूक वाढावी ह्या दृष्टीने आता विविध यंत्रणांनी आपले नियोजन करावे लागेल. जास्त पाऊस होत असताना तो लहरीपणाने होणार असल्याने अधूनमधून पूरस्थितीलाही सामोरे जाऊ शकते. ह्या सगळ्याचा विचार करून येणाऱ्या पावसाळ्याला सामोरे जाण्याची सज्जता प्रशासनाने ठेवावी.