जनतेच्या पैशातून अयोध्येत चार वर्षांत राम मंदिर : विहिंप

0
119

पुढील तीन ते चार वर्षांत अयोध्येत राम मंदिर उभे राहणार असून ते सरकारी पैशांतून नव्हे तर जनतेने एकत्र केलेल्या पैशांतून उभारण्यात येणार असल्याचे विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस मिलींद परांदे यांनी काल येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

मंदिर उभे करण्यासाठी विश्‍व हिंदू परिषद सरकारी अथवा राजकीय ट्रस्टची स्थापना करू देणार नसल्याचेही परांदे यानी पुढे बोलताना स्पष्ट केले. मंदिर उभारणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने ज्या सूचना केलेल्या आहेत त्यानुसार सगळे काही व्हावे, असे विहिंपचे म्हणणे आहे. राम मंदिराचे काम सुरू होऊन ते पुढील चार वर्षांपर्यंत उभे राहणार आहे. मंदिर हे पूर्णपणे दगडांपासून बनवले जाणार असून लोकांनी जमवलेल्या विटांचाही त्यासाठी वापर केला जाणार आहे.

३० लाख सदस्य
विहिंपने सदस्य नोंदणी मोहीम हाती घेऊन देशभरात ३० लाख सदस्य बनवले आहेत, अशी माहितीही परांदे यांनी यावेळी दिली.

सीएएविषयी नाहक वाद
नागरिकता दुरुस्ती कायद्यात (सीएए) काहीही वाईट नसून विरोधक या प्रश्‍नावरून नाहक काही लोकांची दिशाभूल करीत असल्याचा दावा परांदे यानी यावेळी केला.
अफगाणिस्तान, पाकिस्तान व बांगलादेश हे तिन्ही देश मुस्लिम देश असून तेथे मुस्लिम अल्पसंख्यांक नाहीत. त्यामुळे त्या देशांत मुस्लिमांवर अत्याचार होण्याचा प्रश्‍नच नसल्याचे परांदे म्हणाले.