पाकिस्तानला लागून असलेल्या चार राज्यांमध्ये गुरुवार दि. 29 मे रोजी सायंकाळी मॉक ड्रिल केले जाणार आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान व गुजरात या चार राज्यांमध्ये हे मॉक ड्रिल केले जाईल. या दरम्यान, लोकांना सतर्कतेचा इशारा दिला जाऊ शकतो. केंद्र सरकारने सिव्हिल डिफेन्स सर्व्हिसेसना (नागरी सुरक्षा सेवा जसे की, अग्निशमन दल, बचाव पथके) या चार राज्यांमध्ये मॉक ड्रिल करण्याचा आदेश दिला आहे.
भारत पाकिस्तानबरोबर 3,300 किलोमीटरची सीमा सामायिक करतो. जम्मू-काश्मीरमधील उभय देशांमधील सीमारेषेला नियंत्रण रेषा म्हणजेच एलओसी म्हटले जाते, तर पंजाब, राजस्थान व गुजरातमधील उभय देशांमधील सीमेला आंतरराष्ट्रीय सीमा (आयबी) म्हटले जाते. या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून सातत्याने कुरापती चालू आहेत. पाकिस्तानी लष्कराने अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. दोन्ही देशांमधील तणावामुळे सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा स्थितीत या राज्यांमध्ये मॉक ड्रिल केले जाणार आहे.
भारताने दहशतवाद्यांविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकचे धाबे दणाणले आहेत. पाकिस्तान सध्या दहशतीखाली आहे. भारत पुन्हा एकदा एका बाजूला मॉक ड्रिल आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानवर हल्ला तर करणार नाही ना? असा प्रश्न पाकिस्तानी जनतेला पडला आहे.