दाबोळीत उड्डाणपुलाच्या कामावेळी दोघांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी काँग्रेसची मागणी
एमव्हीआर या कंपनीतर्फे दाबोळी येथे जे उड्डाणपुलाचे (फ्लायओव्हर) काम चालू आहे तेथे कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आतापर्यंत दोघा जणांचा अपघाती मृत्यू झालेला असून, सरकारने आतापर्यंत कंपनीवर कोणतीही कारवाई केलेली नाही, असा आरोप काल गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. पोलिसांनी या प्रकरणी पुढील 10 दिवसांत एमव्हीआर कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा नोंदवला नाही, तर पोलीस मुख्यालयावर मोर्चा नेऊन पोलीस महासंचालक आलोक कुमार यांना घेराव घालणार असल्याचा इशारा पाटकर यांनी यावेळी दिला.
दाबोळी येथे उड्डाण पुलाचे काम चालू असताना 4 मार्च रोजी वरून एक बॅरिकेड कोसळून ते रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या स्वप्निल चिंदरकर नामक इसमावर कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला होता. उड्डाणपुलाचे बांधकाम करणाऱ्या एमव्हीआरच्या हलगर्जीपणामुळे त्यानंतर 28 मे रोजी मारुती जाधव नूाक आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे पाटकर म्हणाले. या दोघा व्यक्तींच्या मृत्यूला जबाबदार धरून कंपनीच्या सर्व संचालकांवर गुन्हा नोंद व्हायला हवा होता; मात्र तसे न करता पोलिसांनी कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर या प्रकरणी गुन्हा नोंद केला असल्याचे पाटकर म्हणाले.
एमव्हीआर कंपनीने पेडण्यापासून काणकोण, तसेच फोंडा आदी ठिकाणी महामार्गाचे काम केलेले असून, त्यांच्या हलगर्जीपणामुळे अन्य ठिकाणीही लोकांचे अपघाती मृत्यू झाले असल्याचे पाटकर म्हणाले. भाजप सरकारचे मित्र असलेल्या समर्थकांची ही कंपनी आहे. आणि म्हणूनच त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप पाटकर यांनी केला. मात्र, आता आम्ही गप्प बसणार नसून, 10 दिवसांच्या आत एमव्हीआर कंपनीच्या संचालकांवर पोलिसांनी जर गुन्हा नोंदवला नाही, तर आम्ही पोलीस महासंचालकांना घेराव घालू, असा इशारा पाटकर यांनी दिला.
यावेळी दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, तसेच पक्षाचे वास्को शहरातील नेते नंदादीप राऊत व वसंत नाईक हेही हजर होते.