ऋतूबदल आणि नैराश्य

0
303
  • डॉ. मनाली म. पवार
    (सांतइनेज, पणजी)

वातावरणातील बदलामुळे येणार्‍या नैराश्याला ‘सिझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर’ म्हटले जाते. त्यात हिवाळ्यात येणारे औदासिन्य किंवा नैराश्य ही समस्या प्रामुख्याने जाणवते. हिवाळ्यात दिवस छोटा आणि रात्र मोठी असते. त्यामुळे झोपण्या-उठण्याचे चक्र बिघडून जाते. त्यामुळे व्यक्तीला थकवा जाणवतो

ऋतुमान किंवा वातावरण बदलाचे परिणाम शरीरावर चटकन दिसून येतात. कारण ते दृश्य स्वरूपातील असतात. पण बदलत्या हवामानाचा परिणाम हा मनःस्वास्थ्यावरही होत असतो. पण बदलत्या वातावरणाचे मनावर होणारे परिणाम चटकन दिसून येत नाही. अनेक वेळा असे दिसते की हिवाळा सुरू होण्याची चाहूल लागली की काही व्यक्तींचे मानसिक संतुलन डळमळीत होऊ लागते. मानसिक असंतुलन म्हणजे काही अगदी ठार वेडे नाही पण त्यांना नैराश्य येते. मनाचे संतुलन घटल्याने अनेकांना त्यांच्याबरोबर नेमके काय होत आहे, त्यांना कसला त्रास होत आहे, हेच कळेनासे होते. नैराश्य किंवा उदासीनता इतक्या उच्च थराला जाऊन पोहोचते की काही व्यक्ती आत्महत्येच्या निर्णयाप्रत येऊन पोहोचतात. त्यात ह्या वर्षी कोरोना महामारीच्या भीतीचे सावट तसेच या समस्येचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते.
वातावरणातील बदलामुळे येणार्‍या नैराश्याला ‘सिझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर’ म्हटले जाते. त्यात हिवाळ्यात येणारे औदासिन्य किंवा नैराश्य ही समस्या प्रामुख्याने जाणवते. हिवाळ्यात दिवस छोटा आणि रात्र मोठी असते. त्यामुळे झोपण्या-उठण्याचे चक्र बिघडून जाते. त्यामुळे व्यक्तीला थकवा जाणवतो. हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असल्याने आपल्या मेंदूत मेलॅटोनिन संप्रेरके अधिक प्रमाणात तयार होते. त्याचा संबंध झोपेशी असल्याने ते सतत आपल्याला झोप आल्याची जाणीव करून देते. कारण झोपेशी निगडित या हार्मोनचा संबंध सूर्यप्रकाश व अंधार यांच्याशी असतो. या काळात सूर्य लवकर मावळत असल्याने मेंदूमध्ये मेलॅटोनिन तयार होते. त्यामुळेच संध्याकाळ होताच आपल्याला झोप यायला लागते. आपण झोपण्याचा प्रयत्नही करतो. या काळात शरीराची सक्रियता कमी होते. आपल्याला लवकर दमायलाही होते. याला वैद्यकीय भाषेत ‘सीझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर’ असे म्हटले जाते.

मुख्य कारणे …

  • नैसर्गिक प्रकाशाची कमतरता –
    लोक थंडी वाजू नये म्हणून खिडक्या-दरवाजे बंद करूनच घरातच दडून बसलेले असतात. त्यामुळे नैसर्गिक सूर्यप्रकाश कमी प्रमाणात मिळतो. शरीराचे स्वतःचे एक घड्याळ असते जे गडबडते व उदास वाटू लागते.
  • मेलॅटोनिनची पातळी – वातावरणातील बदल शरीरातील मेलॅटोनिनच्या पातळीत बदल घडवून आणतात आणि आपल्या झोपेचे वेळापत्रक आणि मूड किंवा स्वभाव, कल या विषयांत महत्त्वाची भूमिका बजावतात.
  • लिंग आणि वय – पुरुषांच्या तुलनेत दुःखी महिलांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक असते. पण पुरुषांमध्येही याची गंभीर लक्षणे पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांपेक्षा हिवाळ्यातील नैराश्य हे तरुणाईला अधिक प्रमाणात ग्रासते असे दिसून येते.
  • कौटुंबिक पूर्वेतिहास – आनुवंशिकतादेखील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. ज्यांच्या रक्ताच्या नात्यांमधील कोणीही व्यक्ती दुःखी किंवा नैराश्याने ग्रस्त असेल तर त्या व्यक्तीला नैराश्य येण्याची शक्यता अधिक असते.

प्रमुख लक्षणे ः-

  • सुस्ती किंवा उत्तेजित होणे
  • थकवा किंवा शक्तिपात होणे
  • समाजात मिसळण्यास अडचणी
  • नकारात्मकतेविषयी अतिसंवेदनशील होणे
  • अति झोप
  • भुकेचे स्वरूप बदलणे. कर्बोदके अधिक असलेला आहार घेणे
  • लोकांपासून लांब राहणे
  • हताश वाटणे
  • इतर गोष्टी आणि आपल्या कामातील रुची कमी होणे
  • झोप लागण्यात अडचणी
  • लक्ष केंद्रित करण्यात अडचणी
  • सतत आत्महत्येचे विचार डोकावणे
    बचाव कसा कराल?…
    या प्रश्‍नाचे उत्तरही निसर्गातच दडलेले आहे. उदा. ग्रीष्म ऋतूत सूर्याची उष्णता वाढल्याने अंगाची काहिली होऊ लागते. शरीरातील रसभाव कमी होतो. मात्र, याच ग्रीष्म ऋतूत आंबा, द्राक्षे, कलिंगड यांसारखी रसरशीत फळेही निसर्ग देतो. असेच काहीसे शरद ऋतूत घडते. या ऋतूत पित्तप्रकोप होतो हे खरे. दिवसा सूर्याची तीव्रता जाणवत असली तरी रात्री तितक्याच शीतलतेने परिपूर्ण असतात. शिवाय याच काळात ‘अगस्थ्य’ नावाच्या तार्‍याचा उदय होतो. त्याच्या प्रभावामुळे पाणी विषरहित होते. या स्वच्छ, पवित्र, विषरहित पाण्याला ‘हंसोदक’ म्हणतात. हे पाणी पिणे, स्नानादी क्रियांसाठी वापरणे, या पाण्याने अवगाहन करणे अमृतोपम असते.
  • नैसर्गिक सूर्यप्रकाशात वेळ घालवा…
  • ‘डी’-जीवनसत्त्व मिळवण्यासाठी सूर्यप्रकाशात बसावे.
  • नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा करावी.
  • संतुलित व पौष्टिक आहाराचे सेवन करावे.
  • आकाशात चंद्र- तारे दिसू लागण्याच्या काळात चंद्रकिरणांचे सेवन करावे. म्हणजेच अंगावर चांदणं घ्यावे.
  • या काळात खारीक, बदाम, खसखस, साखर वगैरे पौष्टिक द्रव्यांबरोबर उकळवलेले दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवून संपूर्ण ऋतूत प्यावे. दूध मुळात शीत असते. चंद्राच्या शीतलतेने पित्तसंतुलनासाठी श्रेष्ठ ठरते.
  • दूध, घरचे लोणी-साखर, साजूक तूप या गोष्टी अमृतोपम आहेत.
  • मुगाचे लाडू, नारळाची वडी, गोड भात, उकडीचे मोदक, दुधी हलवा, कोहळेपाक, हे सर्व गोड पदार्थही मनाला आल्हाद देणारे आहेत.
  • कारले, कडवे वाल, मेथीची भाजी या चवीला कडवट असणार्‍या भाज्याही अधून-मधून खाण्याने अग्नी संद्युक्षित राहतो आणि पित्तशमनही होते.
  • मनुका, अंजीर, खडीसाखर, साळीच्या लाह्याही सेवन कराव्या.
  • फळांमध्ये शहाळ्याचे पाणी, नारळाचे दूध, आवळा, डाळिंब, सफरचंद, केळे, ऊस यांना अधिक प्राधान्य द्यावे.
  • मोरावळा, गुलकंद, दाडिमावलेह सेवन करणे पथ्यकर.
  • भाज्यांमध्ये दुधी, तोंडली, घोसाळी, दोडकी, भेंडी, कोहळा, पडवळ, चाकवत, पालक अशा पचायला हलक्या व शीतल स्वभावाच्या भाज्या निवडाव्यात.
  • उकळून गार केलेले पाणी प्यावे. पाणी उकळताना त्यात चंदन, वाळा, अनंतमूळ वगैरे शीतल द्रव्ये टाकावीत.
    अशा प्रकारे या दिवसात ऋतूचर्या व दिनचर्येचे पालन केल्यास औदासिन्य, नैराश्य दूर होते व मन प्रसन्न, आनंदी राहते.
    त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचे म्हणजे वाढलेला पित्तदोष शास्त्रोक्त पद्धतीने विरेचनाद्वारे बाहेर काढणे. तसेच मृदूविरेचन चालू ठेवणे म्हणजे शरीरशुद्धी होऊन मन प्रफुल्लित राहते.
  • नियमित पादाभ्यंग करण्यानेही झोप शांत लागते व नैराश्य दूर होते.
  • शतावरी चूर्ण, अविपत्तीकर चूर्णासारखी औषधे वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावी.
  • जागरण, उन्हात जाणे टाळणे, धूम्रपान, मद्यपान, मांसाहार वर्ज्य करणे.