मालमत्ता अन्‌‍ कौटुंबिक वादातून श्रवणचा खून?

0
8

मालमत्ता विक्रीला श्रवणचा होता तीव्र विरोध; वडिलांनी श्रवणविरुद्ध तब्बल 5 वेळा नोंदवली होती पोलीस तक्रार

नगरगाव येथील श्रवण देविदास बर्वे याचा खून त्याचे वडील आणि भाऊ यांनीच केल्याचे स्पष्ट झाले असून, थंड डोक्याने कट रचून त्यांनी श्रवणला संपवल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या बाजूला वडील व भावाने श्रवणचा खून का केला याचे कारणही आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. गेल्या पाच वर्षांपासून श्रवण व देविदास ह्या पिता-पुत्राचे संबंध चांगले नव्हते. त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. त्यामुळे वडिलांनी श्रवणविरुद्ध तब्बल 5 वेळा पोलिसांत तक्रारही नोंदवली होती. याशिवाय खुनामागे मालमत्तेचा वाद हेही प्रमुख कारण असल्याचा संशय आहे. कारण देविदास बर्वे व उदय बर्वे हे गेल्या तीन वर्षांपासून स्वत:ची एक मालमत्ता विकण्याचा प्रयत्न करत होते; मात्र श्रवण त्याला तीव्र विरोध करत होता. मालमत्ता विकल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा श्रवणने त्यांना दिला होता. दरम्यान, या खून प्रकरणी देविदास बर्वे व उदय बर्वे यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी काल पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत खूनाचा घटनाक्रम सविस्तरपणे मांडला. 15 एप्रिल रोजी आंबेडे-नगरगाव येथील श्रवण देविदास बर्वे (24) या तरुणाचा खून झाला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी त्याच्या वडिलांना घराच्या अंगणात त्याचा मृतदेह दिसून आला होता. पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी काल दिलेल्या माहितीनुसार, श्रवण बर्वे याचे वडील देविदास बर्वे व भाऊ उदय बर्वे यांनी कट रचून त्याचा खून केला. त्यासाठी त्यांनी कामगार वासुदेव ओझरेकर याची मदत घेतली. या प्रकरणी वासुदेव ओझरेकर याला ताब्यात घेत्ल्यानंतर त्याने पोलिसांना खुनाची कबुली दिली आणि खुनाचा कट श्रवणचे वडिल व भावानेच रचल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे कौशल यांनी सांगितले. देविदास बर्वे याने त्यासाठी 13 एप्रिल रोजी वासुदेव ओझरेकर याची भेट घेतली होती. श्रवण बर्वे याच्याबरोबर सतत होणारी भांडणे, वाद, तसेच आर्थिक परिस्थिती ही या खुनामागील कारणे असण्याची शक्यता कौशल यांनी व्यक्त केली असून, त्याबाबत तपास चालू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मृतदेहाजवळ दोरी आढळलेली असली तरी खुनासाठी दोरीचा वापर करण्यात आलेला नसून, हातानेच गळा दाबून खून करण्यात आला असल्याचे शवचिकित्सा अहवालातून स्पष्ट झाले असल्याचे कौशल म्हणाले. या प्रकरणी तपास चालू असून, कदाचित आणखी काही जणांना या प्रकरणी अटक होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

अन्‌‍ पहिला संशयित लागला गळाला
मंगळवारी सदर खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली होती. त्यासाठी 18 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी 15 जणांना चौकशीअंती सोडून देण्यात आले. त्यानंतर आणखी दोघा अल्पवयीन मुलांना सोडून देण्यात आले. मात्र संशयावरून वासुदेव ओझरकर याला अधिक चौकशीसाठी डिचोली पोलीस स्थानकात ठेवण्यात आले. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याचा श्रवणच्या खुनात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शनिवारी त्याला अटक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणातील पहिला संशयित पोलिसांच्या गळाला लागला. दरम्यान, वासुदेव ओझरेकर याचा या खुनामधील सहभाग हा स्थानिकांसाठी आश्चर्यचकित करणारा ठरला आहे.

दरम्यान, या खुनामागे वडिलांचा सहभाग असण्याची संशय कुणालाही नव्हता. कारण त्यांनी संपूर्णपणे पोलिसांना या कामी सहकार्य केले होते. बुधवारी सकाळी पणजीत श्रवणवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली होती. नगरगाव या ठिकाणी बर्वे यांच्या मालकीची जमीन असताना सुद्धा श्रवणवर पणजीत अंत्यसंस्कार का केले, याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केला होता.

वासुदेवने पिता-पुत्राचे फोडले बिंग
वासुदेव ओझरेकर याच्या चौकशीदरम्यान खुनामागे श्रवणचे वडील देविदास व त्याचा भाऊ उदय यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. 13 एप्रिल रोजी खुनाचा कट रचण्यात आला. तिघांची एकत्र चर्चा झाली व श्रवणचा काटा काढण्याचे निश्चित झाले. त्यानुसार सोमवारी रात्री तिघांनी मिळून त्याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

13 रोजी रचला खुनाचा कट
पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 एप्रिल रोजी श्रवण बर्वे याच्या खुनाचा कट रचनात आला. या कटात तिघांचा समावेश असल्याचे प्रथमदर्शी आढळून आलेले आहे.

पिता-पुत्रावरही प्रश्नांचा भडिमार
वासुदेव ओझरेकर याच्यानंतर शनिवारी देविदास बर्वे, उदय बर्वे यांना वाळपई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्रथम दर्शनी मिळालेल्या पुराव्यानुसार त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केल्यानंतर त्यांचा या खुनातील सहभाग स्पष्ट झाला. त्यानंतर त्यांना शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. खुनामागे वडील व भाऊ हेच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर असल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

वडिलांवरच होता स्थानिकांचा संशय
श्रवणच्या खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिकांचा संशय हा वडील देविदास बर्वे यांच्यावरच होता. या खुनामागे वडिलांचा हात असण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली होती. कारण गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यामध्ये सातत्याने खटके उडत होते. या संदर्भातील तक्रारी वाळपईच्या पोलिस स्थानकात अदखलपत्र गुन्हा म्हणून नोंद झाल्या होत्या. वडील व श्रवण यांच्यामध्ये सातत्याने बिनसत असल्यामुळे हा खून करण्यामागे त्याचे वडीलच असण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली होती व ती शेवटी खरी ठरली.

कुटुंबापासून वेगळा राहत होता श्रवण
श्रवण हा आपल्या कुटुंबीयांपासून वेगळा राहत होता आणि कुटुंबीयांशी जास्त संबंधही ठेवत नव्हता. वडील देविदास बर्वे हे कधी कधी अधूनमधून त्याला जेवण नेऊन द्यायचे, अशी माहिती अक्षत कौशल यांनी दिली.

मालमत्ता विक्रीला श्रवणचा विरोध
प्राप्त माहितीनुसार, देविदास बर्वे वउदय बर्वे हे गेल्या तीन वर्षापासून आपली एक मालमत्ता विकण्याचा प्रयत्न करीत होते; मात्र श्रवण हा त्याला सातत्याने अडथळा निर्माण करीत होता. सदर जमीन विकण्यासाठी अनेक वेळा अनेकांशी बोलणी झाली होती; मात्र श्रवणचा जमीन विक्रीला तीव्र स्वरूपाचा विरोध होता. मालमत्ता विकण्याचा प्रयत्न केला, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्याने अनेकवेळा वडिलांनी दिला होता. त्यामुळे वडील व त्याच्यात वारंवारपणे खटके उडत होते, अशी माहिती समोर आली आहे.

अनेक वेळा पिता-पुत्रामध्ये उडाले खटके
गेल्या दोन वर्षांमध्ये श्रवण आणि त्याच्या वडिलांमध्ये अनेकवेळा भांडणे आणि खटके उडाले होते. या संदर्भातील तक्रारी वाळपईच्या पोलीस स्थानकात नोंदही झाल्या होत्या. अदखलपत्र गुन्हा म्हणून तीन तक्रारींची नोंद पोलीस स्थानकात झाली होती, अशी माहिती प्राप्त झालेली आहे. त्यामुळे श्रवण हा नगरगाव या ठिकाणी राहत होता, तर त्याचे वडील देविदास, भाऊ उदय बर्वे व आई होंडा येथील एक घरात राहत होते. अधूनमधून त्यांचे येणे-जाणे होते. मात्र ज्या दिवशी हा खून झाला त्या दिवशी सदर कुटुंबीय होंडा या ठिकाणी होते, अशी जी माहिती पोलिसांना सुरुरवातीला देण्यात आली होती; ती मात्र चुकीची होती.

‘मी माझ्या मुलाला कशाला मारणार’
शनिवारी रात्री उशिरा वाळपई पोलिसांनी देविदास बर्वे याला अटक केल्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी वाळपईच्या सरकारी सामाजिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना खुनाचे कारण विचारले असता, या प्रकरणात आपल्याला गोवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मी माझ्या मुलाला कशाला मारणार असा सवाल देविदास बर्वे याने केला होता.