पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला

0
8

अंधाधुंद गोळीबारात 27 पर्यटकांचा मृत्यू; मृतांमध्ये 3 विदेशी पर्यटक; 20 हून अधिक पर्यटक जखमी; हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबा

जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन पर्वतरांगेच्या खोऱ्यात पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशवाद्यांकडून अंधाधुंद गोळीबार झाला. हा दहशतवादी हल्ला मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास झाला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात 27 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील पर्यटकांचा समावेश आहे. तसेच मृतांमध्ये तीन विदेशी पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचाही समावेश आहे. शस्त्रधारी दोन ते तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला, त्यात 20 हून अधिक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाच्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या आघाडीच्या संघटनेने घेतली आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर विदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरुन चर्चा करत महत्त्वाचे निर्देश दिले. त्यानंतर, शहा हे तातडीने श्रीनगरकडे रवाना झाले. तेथे त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली.

पहलगाममधील बैसरन पर्वतरांगेच्या खोऱ्यात फक्त पायी किंवा घोड्यावरून जाता येते. निसर्गसौंदर्यामुळे या भागाला मिनी स्वित्झर्लंड म्हटले जाते. हे एक अत्यंत प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून येथे पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास पहलगामच्या बैसरन पर्वतावर दोन ते तीन दहशतवादी पोलीस/सुरक्षा दलांच्या गणवेशात आले आणि त्यांनी एका पर्यटकाला त्याचे नाव व धर्म विचारला आणि नंतर त्याच्या डोक्यात गोळी झाडली. यानंतर त्यांनी इतर पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार करत घटनास्थळावरून पलायन केले. या हल्ल्यात 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये काही विदेशी पर्यटक व स्थानिक नागरिकांचाही समावेश होता. या हल्ल्यात काही पर्यटक गंभीररित्या जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयांत उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या घटनेनंतर, सुरक्षा दलांनी पहलगाममधील हल्ला झालेल्या भागाला वेढा घातला आहे. तसेच हेलिकॉप्टरमधूनही पाळत ठेवली जात आहे.

नाव आणि धर्म विचारून गोळीबार
पहलगाममध्ये पोलिसांच्या वेषात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना आपला निशाणा बनवला. पर्यटकांची नावे आणि धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या वेळी एक नवविवाहित जोडपेदखील दहशतवाद्यांच्या हल्ल्यातून सुटले नाही. या जोडप्यातील पुरुषाला आधी त्याचा धर्म विचारला आणि मग त्याला गोळ्या घालण्यात आल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले. ही महिला आपल्या पतीला वाचवण्यासाठी लोकांना आवाहन करत होती; पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

अमित शहांनी घेतली उच्चस्तरीय बैठक
या घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा दिल्लीहून श्रीनगरला पोहोचले. तेथे त्यांनी राजभवनात लष्कर आणि प्रशासन अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली.

हल्लेखोरांना सोडणार नाही : पंतप्रधान मोदी
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. या घृणास्पद कृत्यामागे सहभागी आहेत, त्यांना आम्ही सोडणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अढळ आहे आणि तो आणखी बळकट होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

हल्लेखोरांवर कठोर कारवाई : शहा
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने मी व्यथित झालो आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. या भ्याड दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांना माफ केले जाणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी आहे. दहशतीविरोधात संपूर्ण देश एकत्र आहे. सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य झाल्याचे खोटे दावे करण्याऐवजी जबाबदारी स्वीकरत भक्कम पावले उचलावीत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.