अर्भकावस्थेतील संस्कार

0
3

जीवन संस्कार

  • प्रा. रमेश सप्रे

संस्कारांचं रूप बदललं तरी स्वरूप नि उद्देश एकच असतो- नवजात अर्भकाचं हार्दिक स्वागत करायचं नि कृतज्ञतेच्या भावनेनं प्रेमानं त्याचं लालन-पालन-पोषण नि तोषण म्हणजे त्याला आनंदात ठेवून त्याच्यावर विविध संस्कार घडवून त्याचा निरोगी विकास घडवणं.

‘जन्मना जायते शूद्रः संस्कारात्‌‍ द्विज उच्यते।’ असं एक जीवनसूत्र आहे. यात ‘शूद्र-द्विज’ हे अर्थातच जातिवर्णवाचक शब्द नाहीयेत. हे शब्द संस्कृतिवाचक म्हणजे संस्कृतीची- सुसंस्कृततेची अवस्था दाखवणारे आहेत. साऱ्या मानवजातीला विकासाचा अधिकार आहे. हा विकास संस्कारातून होतो.
स्थलकालानुसार संस्कार वेगळे असू शकतात, पण त्यांचा उद्देश एकच असतो. तो म्हणजे, माणसाचं पिल्लू (अर्भक) म्हणून जन्मलेल्या जिवाला माणुसकी असलेला माणूस किंवा मानवता असणारा मानव बनवणं. सध्या ही माणुसकी किंवा मानवता धोक्यात आल्याचे सर्वत्र दिसून येतेय. याचं कारण, संस्कारांचं वहन-अभिसरण-सिंचन नीट होत नाही. पारंपरिक संस्कारांचे एकतर यांत्रिक उपचार बनून राहिलेयत, त्यातील खरे ‘संस्कार’ लयास गेले आहेत. प्रत्येक संस्काराचा भव्य इव्हेंट करण्याच्या नादात (क्वचित नशेत) आपण संस्कारातील सुसंस्कृत बनवणारी दिव्यता जणू हरवून बसलो आहोत. यालाच स्वामी विवेकानंदांनी प्रत्येक मुलातील ‘अंगभूत दिव्यता’ (पोटेन्शिअल डिव्हिनिटी) म्हटली आहे, जिची अभिव्यक्ती म्हणजेच संस्कार किंवा शिक्षण. पालक-शिक्षक-समाजातील वडील मंडळी यांचे कर्तव्य आहे असे संस्कार घडवणे.
परंपरेनुसार चालत आलेले संस्कार कालानुसार सुधारायला हवेत. तसे ते बदलतातही. पण दुर्दैव म्हणजे असे बदल केवळ सांगाड्यात होतात. आतील प्राणतत्त्व विसरले जाते.

याच पार्श्वभूमीवर आपण जीवन-संस्कारांवर सहचिंतन करत आहोत. आपले ‘सोळा संस्कार’ ही जीवनाच्या विकासाच्या दृष्टीने दिली गेलेली एक दिशा आहे. प्रत्यक्ष जीवनात पावलोपावली घडणारे (किंवा घडवायला हवेत असे) अनेक महत्त्वाचे संस्कार आहेत.
सोळा संस्कारांतील जन्मपूर्व संस्कार अनु. गर्भाधान- पुंसवन- सिमंतोन्नयन पाहिल्यावर आता क्रमाने येतात ते अर्भक (इन्फंट) अवस्थेतील संस्कार.

  • जातकर्म संस्कार ः मुलाचं मातेच्या गर्भाशयातून बाहेरील जगात प्रवेश करणं ही त्या मुलाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. सुरक्षित पण काहीशा अवघडलेल्या अवस्थेतून त्यामानाने असुरक्षित नि व्यापक विश्वात प्रवेश करणे हे एखाद्या अंतराळवीराच्या गुरुत्वाकर्षण नसलेल्या अंतरीक्षातून गुरुत्वाकर्षण असलेल्या पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करण्यासारखेच असते. त्या छोट्या जिवाच्या दृष्टीने ही एक धक्कादायक (ट्रॉमॅटिक) अनुभूती किंवा परिस्थिती असते. याचा निसर्गसुलभ प्रत्यय म्हणजे रडणे नि स्वतःला नव्या वातावरणाशी जोडून घेणे.
    मुलाचे हे पहिले रडणे (फर्स्ट क्राय) त्याच्यासाठी आवश्यक नि इतर संबंधितांसाठी आनंददायी असते. ‘आनंद’ या अप्रतिम चित्रपटातील तो अमर संवाद आठवतो ना?
    ‘ज्यावेळी मी जन्मलो तेव्हा मी रडत होतो नि इतरजण मात्र हसत होते. पण ज्यावेळी मी मरेन त्यावेळी मी आनंदानं हसत असेन नि तुम्ही सर्व मंडळी रडत असाल.’ हेच ते सफलसंपूर्णसार्थक- जीवनाचं सूत्र- ‘जेव्हा तुम्ही मराल त्यावेळी कोण प्रामाणिकपणे म्हणजे अगदी आतून रडतील…’ (हू विल्‌‍ क्राय व्हेन्‌‍ यू डाय). हे आतून रडणं म्हणजे अगदी आतड्यातून- पोटातून असतं. केवळ डोळ्यातून नि ओठातून नसतं. एखाद्या रुदालीसारखं म्हणजे भाडोत्री रडणाऱ्यांसारखं! यालाच तुकोबा म्हणतात ‘मोले घातले रडाया। नाही आसू नाही माया॥’
  • हे सांगायचं कारण म्हणजे, असं यशस्वी जगणं नि धन्यतेनं मरणं हाच तर जीवन-संस्कारांचा मुख्य उद्देश असतो. असो.
    तर जातकर्म संस्कारात नवागताचं स्वागत असतं. यासाठी निरनिराळे विधी असतात. अर्भकाच्या कानात ‘ॐ’ किंवा असाच एखादा मंत्र उच्चारला जातो. त्याच्या जिभेला मधाचं बोट लावलं जातं. आतून जरी आईपासून दुरावलेलं असलं तरी आईच्या छातीची ऊब नि स्पंदनं हे त्या नवजात बालकासाठी आनंदाचं निधान (ठेवा) असतं. शिवाय जीवनसत्त्व असणारं अमृतासारखं आईचं दूध असतंच. ही एकप्रकारची संस्कारवाहिनीच असते. पण तिचं पावित्र्य नि गांभीर्य लक्षात घेतलं जात नाही.
    आठवतो का तो ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील प्रसंग? त्या तिघांतील एक (शहाणा) मूर्ख म्हणतो- ‘जन्मल्यानंतर काही वेळातच मी इंजिनिअर झालो. कारण आजोबांनी मला पाहून जाहीर करून टाकलं की माझा हा नातू इंजिनिअर बनणार!’ यातला विनोदाचा भाग सोडला तरी मुलांच्या भावी शिक्षण-व्यवसाय याविषयीचे निर्णय अजूनही पालक मंडळी कसे घेतात नि मुलांच्या जीवनाच्या दृष्टीने ते किती वैफल्यग्रस्त करणारे (फ्रस्ट्रेटिंग) असते, ही दुर्दैवी वस्तुस्थिती दाखवणाराच हा प्रसंग आहे. एका अर्थाने उत्स्फूर्त नि उन्मुक्त जीवनविकासासाठी हे मारक आहे.
    यासंदर्भात जपान देशाचे उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. ‘करिअर की मूल?’ या प्रश्नाचे उत्तर ‘करिअर’ निवडल्यामुळे ‘मूल होऊ द्यायला’ (आई बनायला) अनेक स्त्रिया तयार नाहीत. याचा परिणाम जपानची लोकसंख्या हळूहळू कमी होण्यात दिसून येऊ लागला. म्हणून तेथील शासनातर्फे गर्भवती स्त्रीला (भावी मातेला) कृतज्ञतेनं दत्तक घेतलं जातं. सर्व दृष्टीनं अनुकूल अशी व्यवस्था नि वातावरण तिच्यासाठी तयार केलं जातं. यात आपल्या जन्मपूर्व संस्कारांसारखाच अनुभव त्या भावी मातेला नि तिच्यातील गर्भावस्थेतील जिवाला दिला जातो. आईचा आहार, विहार (मनोरंजन), निवास इ. गोष्टी शासनाच्या खर्चाने आयोजित केल्या जातात. भावी मातेच्या भोवतीचे वातावरण अतिशय आल्हाददायी, आनंदी असेच असते. ज्यावेळी मुलाचा जन्म होतो त्यावेळी साऱ्या राष्ट्रातून एक मूक हुंकार उमटतो- ‘आनंदी बालक, राष्ट्राचा अभिमान!’ (हेल्दी चाइल्ड इज नेशन्स प्राइड!)
    खरोखर, जन्मपूर्व (प्रीनेटल्‌‍) संस्कारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच महत्त्व नवजात अर्भकांच्या आगमनाला नि जीवनालाही आहे. अर्भक अवस्थेतले इतर संस्कारही त्याच्या प्रकृतीचा नि विकासाचा विचार करणारे आहेत.
  • नामकरण संस्कार ः म्हणजे मुलाला नाव ठेवण्याचा कार्यक्रम. याला ‘बारसं’ असंही म्हणतात. आजोबांचे आनुवंशिक गुणधर्म नातवात येतात या कल्पनेनं मुलाला पाळण्यात आजोबांचं नाव ठेवतात. व्यवहारातलं नाव निराळं असतं. या संस्कारासाठी नातेवाईक, शेजारी, मित्रमंडळी यांना आमंत्रित केलं जातं. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, मूल-बाळ-अपत्य असं सामान्य नाम जाऊन मुलाला स्वतःचं असं नाव मिळतं. त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाला आरंभ होतो.
  • निष्क्रमण संस्कार ः नवजात शिशूला घराबाहेर मंदिरात, निसर्गात तसेच नातेवाइकांकडे नेलं जातं. जीवनातली त्याची ही पहिली बाहेरची फेरी (निष्क्रमण) असते. पंचमहाभूतांशी प्रत्यक्षाप्रत्यक्ष परिचय हे या निष्क्रमण संस्काराचे उद्दिष्ट असते.
  • अन्नप्राशन संस्कार ः आईचं दूध नि इतर द्रव पदार्थांचं सेवन करणारं मूल घन पदार्थ (भात, खीर, पायस इ.) खातं. हळूहळू आईच्या दुधाची गरज कमी होत जाते. अर्भकाची सामान्य जाणीव वाढत जाते. आपल्या नावालाही ते प्रतिसाद देऊ लागतं.
  • चूडाकर्म संस्कार ः म्हणजे जावळ काढणे. जीवनातलं पहिलं मुंडन केलं जातं. हे कापलेले केस कुळागर, शेत, मंदिर अशा परिसरात जाळून पुरले जातात.
  • कर्णवेध संस्कार ः कानाची पाळी (इअरलोब्ज) टोचून एखादी सोन्याची रिंग किंवा मोत्याची (बिक) बाळी घातली जाते. एकप्रकारे हे ॲक्युपंक्चरच असतं. आरोग्यवान श्वसनासाठी या कर्णवेधाचा (कान टोचण्याचा) उपयोग होतो.
    असे छोटे-मोठे विधी (संस्कार) अर्भकावस्थेत (इन्फंट) घडवले जातात. यामुळे अर्भकाला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व प्राप्त व्हायला आरंभ होतो. ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया पुढे बालकावस्थेत अधिक गतिमान होते.
    एकूण काय, जात-पंथ-धर्म-संस्कृती-देश-काल यानुसार संस्कारांचं रूप बदललं तरी स्वरूप नि उद्देश एकच असतो- नवजात अर्भकाचं हार्दिक स्वागत करायचं नि कृतज्ञतेच्या भावनेनं प्रेमानं त्याचं लालन-पालन-पोषण नि तोषण म्हणजे त्याला आनंदात ठेवून त्याच्यावर विविध संस्कार घडवून त्याचा निरोगी विकास घडवणं. हे एकूणच मानवी जीवनाचं सार्थक करणारं कार्य नव्हे का?