दहावी इयत्तेच्या विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात यंदा बदल करण्यात आला होता. मात्र, त्याच्या नव्या स्वरुपाची माहिती ऑक्टोबर महिन्यातच विद्यालयांना देण्यात आली होती, असे गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत व सचिव भागिरथ शेटये यांनी काल पत्रकारांना सांगितले.
हा पेपर खूप कठीण असल्याचा दावा त्यांनी नाकारला. प्रश्नपत्रिका छाननी समितीने आपल्या अहवालात या प्रश्नपत्रिकेतील केवळ २० टक्के प्रश्न कठीण होते. ५० टक्के प्रश्न सोपे तर ३० टक्के प्रश्न जास्त सोपेही नव्हे व जास्त कठीणही नव्हते, असे नमूद केल्याचे त्यांनी सांगितले.
विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाचे वाचन केले होते त्यांना हा पेपर लिहिताना अडचण येण्याचा प्रश्न नसल्याचा दावा शेटये यांनी केला.
ज्या विद्यार्थ्यांनी पर्यायी पद्धतीने उत्तर दिलेले आहे अथवा ज्यांना प्रश्न समजलेला आहे असे त्यांनी लिहिलेले उत्तर वाचल्यानंतर दिसून येईल अशा परीक्षार्थींना गुण देण्यात येणार असल्याचेही शेटये यांनी यावेळी सांगितले.