वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

0
6

निष्काळजीपणामुळे राज्यात अपघातांची मालिका सुरुच; गेल्या 3 दिवसांत झालेल्या 4 अपघातांत 7 जणांचा मृत्यू

राज्यात अपघातांचे सत्र सुरुच असून, काल तिघा जणांचा अपघाती मृत्यू झाला. काल पहाटे सव्वाचारच्या सुमारास विर्नोडा येथे झालेल्या अपघातात वाहनचालक ठार झाला. त्यानंतर मांद्रेतील अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या सिद्धी शेटकर हिचा काल सायंकाळी 6 च्या सुमारास गोमेकॉत उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय काल दुपारी सांकवाळ येथे झालेल्या अन्य एका अपघातात एक 45 वर्षीय महिला जागीच ठार झाली. दरम्यान, गेल्या तीन दिवसांत झालेल्या 4 अपघातांत 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

सांकवाळमधील अपघातात 45 वर्षीय महिला ठार; पती, मुलगा जखमी

उपासनगर-सांकवाळ येथे काल दुपारी झालेल्या अपघातात एक 45 वर्षीय महिला जागीच ठार झाली. खासगी बसने दुचाकीला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. मृत महिलेचे नाव पिएदाद दोरादो (रा. शिंदोळे-सांकवाळ) असे आहे. वेर्णा पोलिसांनी बसचालकास ताब्यात घेतले आहे.
सविस्तर माहितीनुसार, सदर महिला ही पती व 12 वर्षीय मुलासमवेत दुचाकीवरून (क्र. जीए-06-क्यू-6734) जात होती, त्यावेळी उपासनगर-सांकवाळ येथे खासगी बसने (क्र. जीए-06-टी-4162) दुचाकीला धडक दिली. त्या धडकेबरोबर ते तिघेही रस्त्यावर कोसळले. त्यात पिएदाद दोरादो या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा पती आंतोनियो दोरादो व मुलगा जॉय दोरादो (12) जखमी झाला.
या अपघात प्रकरणी वेर्णा पोलिसांनी रामचंद्र शिंदे (40, रा. हेडलँड-सडा) याला ताब्यात घेतले आहे.