राम मंदिर सोहळा राजकीय : राहुल गांधी

0
3

>> पंतप्रधान मोदी, भाजप, आरएसएसवर टीका; 22 जानेवारीला उपस्थित न राहण्याचा निर्णय

अयोध्येतील 22 जानेवारीचा रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम हा राजकीय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपचा निवडणूक कार्यक्रम बनवण्यात आला आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. त्यामुळेच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा काल तिसरा दिवस होता. ही यात्रा नागालँडच्या कोहिमा येथे पोहोचली असून, तेथे त्यांनी पत्रकारांशी केला. अयोध्येतील प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाशी संबंधित प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले, ‘आरएसएस आणि भाजपने 22 जानेवारीचा कार्यक्रम पूर्णपणे राजकीय आणि नरेंद्र मोदींचा कार्यक्रम बनवला आहे. हा संघ आणि भाजपचा निवडणूक कार्यक्रम झाला आहे. त्यामुळेच काँग्रेस अध्यक्षांनी आणि अन्य नेत्यांनी या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

आम्ही सर्व धर्मांसोबत आहोत. हिंदू धर्माशी संबंधित प्रमुख धर्ममार्तंडांनी देखील (शंकराचार्य) हा राजकीय कार्यक्रम असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि आरएसएसच्या राजकीय कार्यक्रमाला उपस्थित राहणे आमच्यासाठी खूप अवघड आहे. तथापि, काँग्रेस पक्षातील कोणत्याही व्यक्तीला प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी जायचे असेल, तर ते जाऊ शकतात, असेही राहुल गांधी म्हणाले.

विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ची स्थिती चांगली असून, या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल. ‘इंडिया’ निवडणुका चांगल्या प्रकारे लढेल आणि जिंकेल, असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी वेगळ्याच जगात राहतात : भाजप
22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीकेनंतर भाजपने मंगळवारी त्यांच्यावर हल्ला चढवला. राहुल गांधी एका वेगळ्याच जगात राहतात आणि खोटे बोलून आपण यातून सहिसलामत सुटू शकतो, असे त्यांना वाटते, अशी टीका केली.