राज्यातील 15 धबधबे निर्बंधासह खुले

0
5

राज्य सरकारने वन्यजीव अभयारण्यांमधील धोकादायक नसलेले राज्यातील 15 धबधबे काही निर्बंधांसह नागरिकांसाठी खुले केले आहेत. राज्यात पावसाळ्यात आत्तापर्यंत 8 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. सांगे येथील धबधब्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्यानंतर वनखात्याने वन्यजीव अभयारण्यांतील धबधबे नागरिकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. धबधब्यांवर जाण्यास बंदी असताना गेल्या रविवारी दूधसागर धबधब्याकडे जाण्यासाठी कुळे येथे मोठ्या संख्येने पर्यटक, नागरिकांनी गर्दी केली होती. नागरिकांसाठी खुले करण्यात आलेल्या 15 धबधब्यांपैकी 12 धबधबे सत्तरी तालुक्यातील आहेत. तर 3 धबधबे दक्षिण गोव्यातील आहेत.

म्हादई वन्यजीव अभयारण्य- पाली, हिवरे, चरावणे, गोळावली, सुर्ला, चिदंबरम, नानेली, उकायची खाडी -कुमठळ, मडयानी-गुळेली, खाडी -गुळेली, वझर – करंझोळ, भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य मायडा -कुळे, नेत्रावळी वन्यजीव अभयारण्य भाटी- नेत्रावळी आणि खोतीगाव वन्यजीव अभयारण्य कुस्के-खोतीगाव धबधब्याचा समावेश आहे. वन्यजीव अभयारण्यातील धोकादायक नसलेले 15 धबधबे नागरिकांसाठी खुले करण्यासंबंधीचा आदेश वनखात्याने जारी केला आहे. धबधब्यावर जाण्यासाठी अधिकृत तिकीट काउंटरवरून तिकीट घ्यावे, सुरक्षित अंतरावरून धबधब्याचे निरीक्षण करावे, पर्यावरणाचा आदर राखा, सभोवतालच्या परिस्थितीबाबत जागरूक राहा, अनुभवी लाइफ गार्ड आणि वनकर्मचाऱ्याच्या सूचनांचे पालन करावे, अशा अनेक सूचना करण्यात आल्या आहेत.