देशातील व्याघ्र गणना पूर्ण

0
107

>> देशात 3,167 वाघ असल्याची पंतप्रधान मोदींची माहिती

गेल्या अनेक महिन्यांपासून देशातली वाघांच्या संख्येची मोजणी करण्याचे सुरू असलेले काम पूर्ण झाले आहे. व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या वाघांची संख्या जाहीर केली. देशात आज घडीला 3 हजार 167 वाघ असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. व्याघ्र प्रकल्प सुरू होऊन पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने म्हैसूरमध्ये एका मेगा इव्हेंटमध्ये पंतप्रधान मोदी यांनी काल रविवारी 9 एप्रिल रोजी नवीन आकडेवारी जाहीर केली आहे. 1 एप्रिल 1973 ला जिम कॉर्बेट अभय अरण्यातून इंदिरा गांधींनी व्याघ्र प्रकल्प सुरू केला होता. त्यावेळी म्हणजे 1973 मध्ये वाघांची संख्या 268 होती. मात्र आज घडीला ही संख्या 3 हजार 167 झाली आहे. देशभरात 53 व्याघ्र प्रकल्प असून आज घडीला जगभरातील एकूण वाघांच्या संख्येपैकी 70 टक्के वाघ भारतात आहेत. ही संख्या दरवर्षी 6 टक्क्‌‍यांनी वाढत आहे,

याआधी 2008 मध्ये वाघांची संख्या 1401 होती. त्यानंतर वाघांचे संवर्धन करण्यासाठी मोहीम चालवण्यात आली. यानंतर आता ही संख्या 3 हजार 167 इतकी झाली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनीही वाघ वाचवण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला होता. तसेच वाघ वाचवण्याच्या संरक्षण मोहिमेत इतरही अनेक नामवंत लोक सहभागी झाले. त्यामुळे आज वाघांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येते आहे.
1 एप्रिल 1973 ला इंदिरा गांधी यांनी हा प्रोजेक्ट टायगर सुरू केला होता. वाघ वाचवण्यासाठी ही मोहीम होती. कारण तेव्हा भारतात 268 वाघ उरले होते.

मोदी कर्नाटक दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रविवारी कर्नाटक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जंगल सफारी केली. यावेळी मोदी यांनी कर्नाटकमधील निसर्गरम्य बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील वन्यजीवांची पाहणी केली.