हरयाणातील भाजप सरकारवर कॉंग्रेसने मांडलेला अविश्वास ठराव विधानसभेत फेटाळला गेला. कॉंग्रेसने विधानसभेत मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर सरकारविरोधात हा अविश्वास ठराव मांडला होता. पण या ठरावाच्या बाजूने ३२ तर सरकारच्या बाजूने ५५ मते पडली.
विधानसभेत कॉंग्रेसने सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडल्यानंतर त्यावर चर्चा झाली. या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडल्या. सभागृहात कॉंग्रेसच्या सर्व आमदारांनी सरकारच्या विरोधातील अविश्वास ठरावाचे समर्थन केले. तर भाजप आणि जननायक जनता पक्षाचे आमदार अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात उभे झाले. अविश्वास ठरावावर जवळपास ६ तास जोरदार चर्चा झाली. यानंतर ठरावावर मतदान झाले. यात अविश्वास ठरावाच्या बाजूने कॉंग्रेसची ३० आणि दोन अपक्ष मळून ३२ मते पडली. तर ठरावाविरोधात भाजपची ४०, जजपाची १० व अपक्ष ५ अशी मते पडली. विधानसभा अध्यक्षांचे मत मोजण्यात आले नाही. हरयाणा विधानसभेत एकूण ९० पैकी ८८ आमदार अविश्वास ठरावावेळी उपस्थित होते. विधानसभेत कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी ठराव मांडला.