कॉलेज कुमारी आणि पालक

0
178

– डॉ. स्वाती आणवेकर

मुली जेव्हा नुकत्याच तारुण्यात पदार्पण करतात त्या वेळेस त्यांची मानसिक स्थिती अगदीच गुंतागुंतीची झालेली असते म्हणूनच कदाचित ‘सोळावं वरिस …’ अशी उपमा या वयोगटाच्या मुलींना देण्यात आली असेल बहुदा! या वयोगटातील मुली या बर्‍याच शारीरिक व मानसिक स्थित्यंतरांमधून जात असतात, म्हणूनच एक स्त्री म्हणून तिने स्वतःला या काळात जपणे नितांत गरजेचे असते.

शीतलचा कॉलेजचा आज पहिलाच दिवस. दहावीत पंचाण्णव टक्के मिळाले तिला आणि तिने मुंबईतल्या एका मोठ्या प्रसिद्ध कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण कॉलेजमधून घरी परत आल्यापासून शीतल थोडी उदास आणि घाबरलेली वाटत होती हे तिच्या आईच्या लगेच ध्यानात आले.
आई ः बाळा शीतल अगं रोज इतकी बडबड करतेस, आज कॉलेजचा पहिला दिवस असूनदेखील तू इतकी गप्प कशी? एवढी उदास का दिसतेस? काही बिनसले आहे का कॉलेजमध्ये तुझे?
शीतल ः आई, मी उद्यापासून कॉलेजला जाणार नाही. मी दुसर्‍या कुठल्यातरी कोर्सला ऍडमिशन घेते गं!
आई ः अगं, असं वेड्याासारखं काय बोलतेस? तू इतकी हुशार आहेस. सुरुवातीला जरी अभ्यास आणि पुस्तकं पाहून तुला टेंशन आलं असलं तरी पुढे सवयीने सगळं उत्तम होईल आणि बघ, बारावीतही उत्कृष्ट मार्कस् मिळवशील तू!
शीतल ः आई, मला अभ्यासाचे टेन्सन नाही गं, मला वेगळ्याच गोष्टीची भीती वाटते आहे.
आई ः आज कॉलेजमध्ये काय झाले ते सविस्तर सांग बघू मला.
शीतल ः अगं आई अकरावी-बारावीच्या मुलांना पुढच्या वर्गात शिकणारी सिनियर्स बराच त्रास देतात, विशेषतः मुलींची भयंकर छेड काढतात. येता-जाता शिट्या मारतात, अश्‍लील गाणी म्हणतात, अश्‍लील कॉमेंट्‌स पास करतात. रॅगींगवर बंदी असली तरी हे असले प्रकार कॉलेजमध्ये कायमच चालतात वाटतं, म्हणून मला कॉलेजला जायची भीती वाटते गं.
आई ः अगं हे प्रकार जर सारखे सुरू असतील तर मग आपण त्यावर काहीतरी उपाय नक्कीच काढू या. यावर घाबरून कॉलेज सोडणे हा मुळीच उपाय नाही बरं का शीतल? तो विचार तू मनातून आधी काढून टाक बघू!
मुली जेव्हा नुकत्याच तारुण्यात पदार्पण करतात त्या वेळेस त्यांची मानसिक स्थिती अगदीच गुंतागुंतीची झालेली असते म्हणूनच कदाचित ‘सोळावं वरिस …’ अशी उपमा या वयोगटाच्या मुलींना देण्यात आली असेल बहुदा! या वयोगटातील मुली या बर्‍याच शारीरिक व मानसिक स्थित्यंतरांमधून जात असतात, म्हणूनच एक स्त्री म्हणून तिने स्वतःला या काळात जपणे नितांत गरजेचे असते.
या वयात मुली जेव्हा शारीरिक बदलांना सामोर्‍या जात असतात तेव्हा त्यांच्या मानसिक घडणीमध्येसुद्धा बराच बदल होत असतो. मुलींच्या शरीरामध्ये जेव्हा विशिष्ट बदल घडतात तेव्हाच मासिक पाळीचीदेखील सुरुवात होते आणि हॉर्मोन्सच्या प्रभावामुळे स्त्रीसुलभ गुणधर्म म्हणजेच लज्जा, संकोच, भीती हे गुणही तिच्या स्वभावामध्ये उतरतात.
या वाढत्या वयात मुलगी आणि भावी स्त्री म्हणून देखील तिच्यावर बर्‍याच जबाबदार्‍या असतात.
अजूनही आपल्या समाजात मुलगी वयात यायला लागली की आईवडील आणि घरच्या मंडळींचे टेंशन वाढू लागते. आजदेखील असे बघण्यात येते की मुलगा कितीही काळ घराबाहेर असला आणि रात्री कितीही उशिरा आला तरी आईवडलांना फिकिर नसते. पण मुलगी मात्र कामावरून सात-साडेसात वाजेपर्यंत घरी पोहचली नाही तर मात्र घरातल्यांची धाकधुक वाढू लागते. तसेच आजकालची बिघडत चाललेली सामाजिक परिस्थिती पाहिली तर आजच्या पालकांचे काही चुकते आहे, असे म्हणणेसुद्धा योग्य ठरणार नाही. म्हणूनच आपल्या मुलींना बुद्धीसोबतच शरीरानेही सक्षम बनवायचे असेल तर त्यांना शालेय शिक्षणासोबतच स्वसंरक्षणाचे प्रशिक्षणदेखील देणे ही आजच्या काळाची गरज आहे आणि या बदलाची सुरुवात मुलींच्या वाढत्या वयातच होणे अत्यावश्यक आहे.
बरे, जसजशी मुलगी मोठी होते… कौमार्यात पदार्पण करते तसे घरच्या मंडळींचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलतो. तिने शिक्षणात तर अव्वल असायलाच हवे पण त्याचबरोबर काही घरांमध्ये तर तिच्याकडून घरकामांचीदेखील अपेक्षा केली जाते. घरातील महत्त्वाच्या कामांमध्ये तिने हातभार लावावा अशी आईवडीलांची अपेक्षा असते. तर काही ठिकाणी तर जेवण बनविणे, घरची साफसफाई करणे अशी कामे हमखास तिला करायला सांगितली जातात. म्हणजे शिकता शिकता तिला घरकामही करणे भाग असते. कदाचित सहनशीलता आणि समजूतदारपणा हे गुण स्त्रियांच्या अंगी उपजतच असल्याने या मुली बिचार्‍या सर्व अपेक्षा हसतमुखाने पूर्ण करत असतात.
स्त्रीच्या शरीरमनाची घडणच अशी आहे की वयात आल्यापासून तिच्यावर एक मुलगी म्हणून बरीच बंधने लादली जायची आणि आजच्या जमान्यातदेखील लादली जातात. सध्या जरी मुलींची सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती पूर्वीपेक्षा बरीच सुधारलेली असली तरीदेखील काही बाबतीत समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे अशक्यच आहे.
आज मुली प्रत्येक क्षेत्रात नावलौकीक कमवत आहेत मग ते शैक्षणिक, खेळ, कला असो अथवा देशरक्षणाचे कार्य असो त्या कुठेही कमी नाहीत. प्रत्येक क्षेत्रात त्या आपली कामगिरी चोख बजावत आहेत आणि खरोखरच प्रत्येक राष्ट्राच्या प्रगतीमध्ये त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीचा मोठा वाटा आहे.
वाढत्या वयात जर आपण मुलींवर अवाजवी जबाबदार्‍या न लादता त्यांना त्यांचे आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्याचे स्वातंत्र्य दिले, तसेच त्यांचा आहार आणि इतर गरजांकडे लक्ष पुरविले तर त्या आपली शैक्षणिक कारकीर्द उत्तम प्रकारे घडवून समाजात मानाचे स्थान प्राप्त करतील, यात काही शंका नाही. अर्थात आपले योग्य मार्गदर्शन एक जबाबदार पालक या नात्याने आपण त्यांना करायलाच पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की तिला कायम बंधनात, दडपणात ठेवणे! उलट तिला सर्व गोष्टींचा सारासार विचार करून पावले उचलण्याची मुभा द्यायलाच हवी. जिथे तिचे पाऊल चुकीच्या मार्गावर पडत आहे असे वाटेल तिथे आपण वाटाड्याची भूमिका बजावून तिला योग्य मार्ग दाखवला पाहिजे. पण ती एक मुलगी आहे व मुलीच्या जातीला एवढे स्वातंत्र्य बरे नव्हे असे विचार मात्र तिच्या प्रगतीत अडथळा आणू शकतात.
लेखाचा शेवट करताना काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर दाखवण्यात येणार्‍या एका विज्ञापनाची इथे आठवण झाली, त्यात एका तान्ह्या मुलीचे हात-पाय बांधून ठेवलेले असतात. डोळे बांधलेले असतात. मग एक आवाज सांगतो… उघडा तिचे डोळे… सोडा तिला बंधनामधून … पाहू द्यात तिला हे जग… असेच काहीसे तरी आणि मग त्या चिमुकलीचे हातपाय सोडले जातात आणि डोळ्यावरील पट्टीदेखील काढली जाते आणि मग ती वडलांचे बोट धरून चालू लागते.