>> लोकसभेतील भाषणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती; विविध योजनांद्वारे आतापर्यंत 40 लाख कोटी रुपये लोकांच्या खात्यात जमा
लोकांनी आम्हाला दिलेल्या संधीचा योग्य उपयोग केला आणि आतापर्यंत 40 लाख कोटी रुपये लोकांच्या खात्यावर जमा केले. जनतेचा पैसा जनतेसाठी वापरण्याचा आम्ही प्रयत्न केला. बचत आणि विकास हे आमचे मॉडेल आहे. आम्ही सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेची विरोधकांनी खिल्ली उडवली, पण त्याच माध्यमातून सरकारी कार्यालयातील भंगार विकून 2300 कोटी रुपये कमावले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल लोकसभेत विरोधकांना टोला लगावला. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधानांनी विरोधकांच्या अनेक आरोपांवर उत्तरे दिली.
विरोधकांवर टीका करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेची काही जणांनी खिल्ली उडवली. पण आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो की या मोहिमेमुळे देशात स्वच्छता नांदू लागली आहे. याच स्वच्छता मोहिमेमुळे अलीकडच्या काळात सरकारी कार्यालयांतून विकल्या जाणाऱ्या भंगारातून 2300 कोटी रुपये वसूल झाले आहेत. महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे आम्ही फक्त विश्वस्त म्हणून काम करतोय.
जे लोक गरीबांच्या झोपड्यांमध्ये जाऊन फोटोसेशन करतात आणि मनोरंजन करतात, त्यांना संसदेत गरिबांबाबत काही बोलले गेले तर ते त्यांना कंटाळवाणेच वाटणार, असा टोला मोदींनी लगावला. एखादी समस्या ओळखता येणे ही एक बाब आहे, पण जबाबदारी घेऊन ती समस्या सोडवणे, त्यासाठी प्रयत्न करणे ही वेगळी बाब आहे, असेही मोदी म्हणाले.
गेल्या दहा वर्षांपासून भारत हा उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. आम्ही इथेनॉलच्या निर्मितीचा निर्णय घेतला आणि त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची आयात कमी झाली. त्यावरील खर्च कमी झाला. या निर्णयामुळे 1 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे आणि ते सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खिशात गेले आहेत. गेल्या दहा वर्षांत एकही घोटाळा झाला नाही. या काळात सरकारचे लाखो कोटी रुपये वाचले, असेही मोदींनी नमूद केले. आम्ही देशाचा पैसा हा शिश महाल बांधण्यासाठी वापरला नाही, तर तो देश घडवण्यासाठी वापरला. पायाभूत सुविधांचे बजेट 1.80 लाख कोटी रुपये होते. आज ते बजेट 11 लाख कोटी रुपये आहे, असेही त्यांनी सांगितले.
10 कोटी बनावट लाभार्थी बाहेर काढले
या आधीच्या सरकारच्या काळात देशातील 10 कोटी बनावट लोकांच्या नावाखाली अनेक योजनांचा लाभ घेतला जायचा. आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्या 10 कोटी बनावट नावांवर आम्ही फुली मारली. त्या त्या योजनांचे खरे लाभार्थी आम्ही शोधून काढले. त्यामुळे सुमारे 3 लाख कोटी रुपये हे चुकीच्या लोकांच्या हाती जाण्यापासून वाचले. आता हे 3 लाख कोटी रुपये कोण खात होते हे मी सांगणार नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.
25 कोटी लोक गरिबीतून बाहेर
राष्ट्रपतींचे अभिभाषण सर्वसामान्यांना विकसित भारताबद्दल प्रेरणा देणारे आहे. त्यावर कुणी टीका केली, कुणी त्याची प्रशंसा करणे ही बाब स्वाभाविक आहे. पाच दशके आपण गरिबी हटाओच्या घोषणा ऐकल्या आहेत; पण आमच्या सरकारच्या काळात 25 कोटी लोक हे दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले. त्यासाठी योजनाबद्ध गोष्टी कराव्या लागतात, असे पंतप्रधान म्हणाले.