सदाफुली

0
3
  • मीना समुद्र

गुलाबासारखा ‘फुलांचा राजा’ म्हणून मिळणारा मान सदाफुलीला नसतो. गंधहीनतेमुळे कुणी जवळही घेणार नसतं. वाऱ्यावादळाचे, ऊनपावसाचे प्रसंग येतात, पण तिचं हसू मावळत नाही. तिला उगवतीची आस नसते आणि मावळतीची भीती.

अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोनी जाती,
कोण तयांची महती गणती ठेविली असे…
हे किती खरे आहे. फुलांबाबतही आणि मानवी जीवनाबाबतही! कितीतरी हजारो-लाखो-करोडो फुलं रोज फुलत असतात. काहींचे जीवन चारसहा दिवसांचे, तर काहींचे मात्र काही तासांपुरते. मे फ्लॉवरसारखी फुलं दीर्घकाळ टवटवीत राहतात. निशिगंधा, शेवंतीसारखी फुलं झाडावरून काढली तरी छान ताजीतवानी राहतात. सहाआठ दिवस अगदी सर्वांगानं हसत असल्यासारखा झेंडूही ताजेपणा टिकवून राहतो. मोगरा, जाई-जुईसारखी फुलं भरभरून सुगंध देतात आणि आपली झोळी रिकामी झाली, आपले काम झाले असे समजून कोमेजून जातात. माणसांची आयुष्येही अशीच- कुणाची सार्थकी लागतात, तर कुणाची निरुपयोगी ठरतात… आणि सुकल्या फुलांसारखी गंधहीन, रंगहीन होऊन जातात.

शिरीष, गुलमोहर, बहावा यांसारख्या अनेक झाडांचे फुलणे आणि त्यांचा बहरही हंगामी. प्राजक्त, जाई-जुई, सायली, कुंदा, जास्वंद, मोगरा ही सारी एका दिवसाचे आयुष्य असणारी फुले. त्यात त्यांचा बहरही ऋतुमानाप्रमाणे बदलणारा. कधी बहर, कधी शिशिर- अशा स्वरूपाचा. काही उन्हानं उमलणारी, तर निशिगंधासारखी काही चांदण्यात हसणारी. चंद्रविकासी आणि सूर्यविकासी कमळांसारखी- विकसणारी, विलसणारी. गुणविशेषत्वाचे दर्शन घडविणारी- रात्रीचे काही तास उमलून आपल्या मंद सुगंधाने, शुभ्र सौंदर्याने, आकार-प्रकाराने आणि मंद मंद झुलण्याने मनाला मंत्रमुग्ध करणारी, शुभशकुन सांगणारी.

मी ‘सांगणारी’ असं म्हटलं खरं, पण फुलांना बोलता कुठं येतं? परवाच प्रसिद्ध निसर्गप्रेमी पाश्चात्त्य कवी वर्ड्‌‍सवर्थ यांचं एक वाक्य वाचलं- ‘फुलांना बोलता येत नाही हे केवढं मोठं दुर्दैव! गाणारा गुलाब, गुणगुणणारा मोगरा, कुजबुजणारी शेवंती! किती मजा आली असती नाही?’ खरंच खूप मजा आली असती असं वाटलं!
मग वाटलं, फुलं आपल्या रंगानं, गंधानं बोलतात की आपल्याशी! चांदण्यारात्री पाय मोकळे करायला बाहेर पडावं तर मोगऱ्यानं उघडलेल्या पसाऱ्याचा वर्षाव करत तो सुगंधी झोतानं आपलं स्वागत करतो आणि ‘पाहिलीस का ती चांदणफुलं, माझ्याच आकाराची? त्यांच्याजवळ चमक आहे आणि माझ्याजवळ गंध आहे. ती चमक तुझ्या डोळ्यांना सुखावेल आणि माझा गंध तुझ्या घ्राणेंद्रियालाच नव्हे तर गात्रागात्रांना सुखावेल’- असं म्हणतो आहे असं वाटतं.

खिडकीशी लावलेली रातराणी वाऱ्याच्या झोताबरोबर हळूच हसत मनाला उल्हसित आणि तृप करणाऱ्या गंधलहरींनी कुजबुजते. केसांत माळलेल्या जाईजुईंचे गजरे आणि देवाला वाहिलेले हार जास्त सुंदर कसं दिसू ते सांगत असतात. अबोलीचा, विशेषतः रतन अबोलीचा रंग तिच्याकडे बोलावतो. सोनचाफा तर हात खेचून घेऊन जातो आणि उंचावरून काढला की नाकाशी थेट संवाद साधतो. मधुमालतीचे वेलीवरून झुकलेले झुबके मंदगंधाने आणि गुलाबी पांढऱ्या रंगांच्या छटांनी लक्ष आकर्षून घेतात आणि आपली कहाणी सांगू लागतात. गणशवेलाची लालचुटूक इवली-इवली फुलं देठातल्या मधाशी परिचय करून देतात. कॅक्टसला उन्हाळ्यात आलेली तलम रंगीत फुलं आपली कलाकुसर दाखवतात आणि काट्यावर फुलणाऱ्या या फुलांचे बोल ऐकत आणि पाहत राहावेसे वाटतात. निरनिराळ्या लहानमोठ्या रंगीबेरंगी फुलपाखरांचे हितगूज तर फुलांशी नित्य चालू असते. गोष्टीत गुंगावून फुले त्यांच्या पायात परागाचे घुंगरू बांधतात. सावरीच्या लाल पेल्यातला मध खाताना तर गप्पांच्या नादात आपल्या वेड्यावाकड्या स्थितीचंही भान राहत नाही. बुलबुलांना फुलांच्या गोड गोष्टींनीच गोड गळा दिलाय.

वाऱ्यावर फुले हलतात, डुलतात. उन्हाशी, वाऱ्याशी, पाऊसथेंबांशी केवढी त्यांची दोस्ती. या साऱ्यांशी ती गप्पा मारतात, हसतात, खिदळतात. फुले बोलतात. लालचुटूक, पिवळी, गुलाबी, जांभळी, केशरी जास्वंद विचारते- ‘कुठला रंग शोभून दिसतो आम्हाला?’ कुणीतरी ‘लाल’ म्हणून सांगितल्यावर तिने तो जास्तीत जास्त वेळा आणि असंख्य ठिकाणी घातलेला दिसतो ना आपल्याला! बकुळी तर आपल्या असंख्य आठवणी जपून ठेवते.
सगळी फुलं आपापल्या किंवा निसर्गाच्या मर्जीनुसार उमलतात. चोनचाफा, कमळ, मोगरा अशी सकाळी; तगर, गुलाबासारखी दुपारी; शेवंती, गुलबक्षी, रातराणी संध्याकाळी अशी अंतराअंतराने उमलतात. त्यावरून फुलांचे घड्याळ ही कल्पना स्वीडनमधल्या कार्ल लिनियसला सुचली. 1748 साली त्याला सुचलेली ही कल्पना 1903 साली प्रत्यक्षात आली ती स्कॉटलंडमधल्या एडिनबरो येथे. फुलांनी तास, मिनिट, सेकंद या उमलण्याच्या वेळेनुसार ही घड्याळे तयार झाली. कर्नाटक, गुजरात, पंजाब, हैदराबाद, पुणे, श्रीनगर अशा शहरांमधली फुलांची घड्याळे उमलून वेळ सांगतात. जैविक घड्याळ, प्रकाशसंवेदना आणि हवामानबदलाचा त्यांच्यावर होणारा परिणाम, सेंद्रीय शेती, पराग सिंचनप्रक्रिया हेही सांगतात, दर्शवतात.

परवा काही पंक्ती वाचल्या- सदाफुलीबद्दल. सदाफुली मात्र नावाप्रमाणे कुठल्याही हवामानात, कुठल्याही हंगामात उमलते. पण इतर फुलांसारखी ती देवाला वाहत नाहीत किंवा केसांतही माळत नाहीत. तरी ती सदा बहरत राहते. स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी फुलत राहते. कधी डोंगरमाथ्यावर, कधी कडेकपारीत तर कधी निगुतीने राखलेल्या घराभोवतीच्या बगिचात. कधी कुंड्यातून तर कधी मातीतून हिचं गुडघाभरच उंच होणारं रोप- त्यावर पांढऱ्या, गुलाबी, गडदगुलाबी रंगांच्या पाच पाकळ्यांची ही फुलं छोट्याशा देठावर तळहात पसरावा तशी उमलून हसत असतात. गुलाबासारखा ‘फुलांचा राजा’ म्हणून मिळणारा मान तिला मिळणार नसतो. गंधहीनतेमुळे कुणी जवळही घेणार नसतं. वाऱ्यावादळाचे, ऊनपावसाचे प्रसंग येतात, पण तिचं हसू मावळत नाही. तिला उगवतीची आस नसते आणि मावळतीची भीती. पण ती फुलते, बहरते तसेच भोवतीचं सारं विसरून, कधी पचवून स्त्रीनंही बहरत राहावं, संसारातल्या चढउतारावर मात करत हसतमुखानं कर्तव्यकर्म करत आनंदानं जगावं असा संदेश सदाफुलीच्या निमित्ताने त्या लिहिणारीला सांगायचा असावा असं वाटलं.